Sunday, February 16, 2025

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आद्याक्षर: ‘आ’.

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आजचे आद्याक्षर आहे: ‘आ’.

आराम
• फारसी मूळ: آرام (Ārām)
• मराठी अर्थ: विश्रांती, सुख

आवाज
• फारसी मूळ: آواز (Āvāz)
• मराठी अर्थ: ध्वनी

आशिक
• फारसी मूळ: عاشق (Āshiq)
• मराठी अर्थ: प्रेमी

आलिशान
• फारसी मूळ: عالی‌شان (Ālīshān)
• मराठी अर्थ: भव्य, शानदार

आमदनी
• फारसी मूळ: آمدنی (Āmadnī)
• मराठी अर्थ: उत्पन्न

या अद्याक्षराने सुरू होणारी ही यादी कदाचित परिपूर्ण नाही. आपल्यालाही काही शब्द माहित असल्यास कमेंट मध्ये लिहावेत. 


— तुषार भ. कुटे


Wednesday, February 12, 2025

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आद्याक्षर: ‘अ’.

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आजचे आद्याक्षर आहे: ‘अ’. 


1. अक्कल

    • फारसी मूळ: عقل (Aql)

    • मराठी अर्थ: बुद्धी, समजूत

2. अदब

    • फारसी मूळ: ادب (Adab)

    • मराठी अर्थ: शिष्टाचार, विनय

3. अमल

    • फारसी मूळ: عمل (Amal)

    • मराठी अर्थ: कृती, कार्य

4. अमीर

    • फारसी मूळ: امیر (Amir)

    • मराठी अर्थ: श्रीमंत, धनवान

5. अदालत

    • फारसी मूळ: عدالت (Adalat)

    • मराठी अर्थ: न्यायालय

6. अंदाज

    • फारसी मूळ: اندازہ (Andaza)

    • मराठी अर्थ: अटकळ

7. अमल

    • फारसी मूळ: عمل (Amal)

    • मराठी अर्थ: कृती, कार्य    

8. अदब

    • फारसी मूळ: ادب (Adab)

    • मराठी अर्थ: शिष्टाचार, विनय


या अद्याक्षराने सुरू होणारी ही यादी कदाचित परिपूर्ण नाही.  आपल्यालाही काही शब्द माहित असल्यास कमेंट मध्ये लिहावेत. 


— तुषार भ. कुटे


जिज्ञासा

संगणक तंत्रज्ञानाची पुढची आणि सर्वात अद्ययावत पायरी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान होय. मागच्या दशकातच या तंत्रज्ञानाने जगावर पाय रोवायला सुरुवात केली आणि आज ते सर्वच क्षेत्रांमध्ये अधिराज्य गाजवायला सज्ज झालेले आहे. अर्थात यातून कलाक्षेत्र देखील सुटलेले नाही. सृजनशीलता हा मानवाचा पायाभूत गुण आहे. परंतु हा गुणसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेने हळूहळू आत्मसात करायला घेतल्याचे दिसते. याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मराठीमध्ये लिहिले गेलेले हे पहिलेच पुस्तक, “जिज्ञासा”.
तंत्रज्ञान म्हणजे इंग्रजी. हेच समीकरण सर्वांना पक्के ठाऊक असते. परंतु आज तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकंदरीत माहिती दळणवळणामध्ये ४०% देखील इंग्रजीचा वापर होत नाही. अर्थात उरलेल्या ६० टक्क्यांमध्ये जगातील जवळपास सर्व भाषा येतात. यामध्ये मराठी देखील आलीच. कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये आपल्याला माहिती देऊ शकते किंवा तयार करू शकते याचा उत्तम नमुना या पुस्तकाद्वारे आपल्याला वाचायला मिळतो. संपादक विनोद शिंदे यांनी संगणकाच्या या कृत्रिम मेंदूचा वापर करून या पुस्तकात सर्वच क्षेत्रातील विविधअंगी माहिती सुटसुटीतपणे दिलेली आहे. यातून या तंत्रज्ञानाचा एकंदरीत आवाका आपल्याला ध्यानात येईल. पहिलाच लेख रतन टाटा यांच्यावर लिहिलेला आहे. मराठी भाषा, शेअर मार्केट, मोबाईल तंत्रज्ञान, कॉर्पोरेट जग, जीवनशैली, राजकारण, लोककला, मनोरंजन, महिला सुरक्षा, तणावमुक्ती, हवामान, ऑटोमोबाईल उद्योग, समाजमाध्यमे, विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, चालू घडामोडी, प्रेमकथा अशा निरनिराळ्या विषयांवर याद्वारे लिहिलेले लेख आपल्याला इथे वाचता येतात. विशेष म्हणजे ते कृत्रिमरीत्या लिहिले गेले असले तरी त्यात कृत्रिमपणा मात्र अजिबात जाणवत नाही. यातूनच या तंत्रज्ञानाची कमाल आपल्याला ध्यानात येऊ शकते.. विशेष म्हणजे एआयने लिहिलेल्या काही कविता देखील या पुस्तकाच्या शेवटी आपण वाचू शकतो. त्यामध्ये इंटरनेटद्वारेच पायरसी शोधण्याचा प्रयत्न केला तर ती जवळपास ०% येईल! अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आता उत्तम कृत्रिम सर्जनशीलता देखील होऊ लागलेली आहे, असं दिसतं! हे पुस्तक म्हणजे मानवजातीला एक उत्तम धडा आहे. याद्वारे प्रत्येक कामासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे पर्याय आहे… हे ठामपणे आपल्याला दिसून येते.
अशा विविध विषयांची आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मराठी वाचकांना ओळख करून दिल्याबद्दल संपादक विनोद शिंदे यांचे विशेष आभार. किमान एकदा तरी या पुस्तकातील मजकूर प्रत्येकाने वाचायलाच हवा, असा आहे!

— तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #परीक्षण #तंत्रज्ञान #कृत्रिम_बुद्धिमत्ता



Saturday, February 8, 2025

मातृभाषा बदलण्याचे फॅड

इतिहास असं सांगतो की प्रत्येक भाषेला स्वतःची किंमत असते. किंबहुना ती किंमत ती भाषा बोलणाऱ्यांनी ठरवलेली असते. कधीतरी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. मागील दोन हजार वर्षांच्या भाषिक इतिहासामध्ये डोकावलं की कळतं की प्रांताप्रांतागणित भाषा बदलत गेल्या. एका भाषेवर दुसऱ्या भाषेचा प्रभाव दिसून आला. शिवाय भाषांमधील आदान प्रदान देखील होत गेले. विविध भाषिकांच्या मानसिकतेमुळे काही भाषा लयास गेल्या. आणि या पुढील काळात देखील त्या जाऊ लागतील. दुसरी भाषा आपल्यापेक्षा श्रेष्ठ. आणि ती बोलली की आपल्याला भरपूर पैसा मिळेल मान मिळेल अशी अनेकांची समजूत असते. यातूनच भाषेचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आज भारतीय समाजाची मानसिकता बघितली तर याची उत्तम प्रचिती येईल अशी परिस्थिती आहे.
मातृभाषेतील शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण हे सर्वांनाच माहित आहे. पण जेव्हा मातृभाषेचे स्टेटस कमी होतं तेव्हा ती भाषा बोलणाऱ्यांचं स्टेटस देखील त्यांच्या मनात कमी होत असतं. अर्थात ही गोष्ट आपल्या मराठी भाषेला देखील लागू आहे. ज्ञानेश्वरांसारख्या महान प्रज्ञावंताची, शिवरायांसारख्या महान योद्धाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अद्वितीय व्यक्तीची भाषा म्हणजे मराठी. लोकसंख्येची आकडेवारी पाहिली तर मराठी भाषिकांची संख्या वाढते आहे. परंतु मराठीवर प्रेम करणाऱ्या आणि खरोखर मराठीमध्ये बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे वाटते.
इंटरनेट युगाचा प्रारंभ झाल्यानंतर इंग्रजी वेगाने वाढायला लागली. कारण तंत्रज्ञानाचे ज्ञान हे इंग्रजीमध्येच उपलब्ध होते. संगणकाची भाषा देखील इंग्रजी होती. आणि याच कारणास्तव इंग्रजीचे भारतातील महत्त्व देखील वाढू लागलं. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या काळात देखील इंग्रजीचं जितकं महत्त्व होतं त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक महत्त्व आज भारतामध्ये आहे. त्याचे कारण हेच. मातृभाषेतील मातृभाषेतून शिक्षण घेतलेले ९० टक्क्यांवर अधिक लोक इंग्रजी भाषेशी संबंधित व्यवसायामध्ये आज आहेत. त्यांना वाटतं इथून पुढे आता इंग्रजीत चालणार. पण आमची भाषा तर मराठी. मग आमचा वंश जगाच्या स्पर्धेत कसा टिकू शकतो? या प्रश्नाचे उत्तर नवमराठी पालक स्वतःच्या पद्धतीने शोधताना दिसत आहेत.
पुण्यामधल्या एका उद्यानामध्ये काही लहान मुले खेळत होती. त्यांना बघून जवळूनच आपल्या आई-वडिलांसोबत चालणारी एक छोटी मुलगी पळत आली. आणि तिने इंग्रजीमध्ये विचारले, ‘मी तुमच्याबरोबर खेळू का?’ मुलांना इंग्रजीतल्या त्या वाक्याचा अर्थ समजला नाही. तिने वेगळ्या पद्धतीने विचारले. ही मुलगी कुठल्या ग्रहावरून आली आहे? अशा पद्धतीचे भाव त्या मुलांच्या चेहऱ्यावर होते. तिचा अट्टाहास पाहून मुले तिथून पळून गेली. त्या मुलीच्या चेहऱ्यावर नाराजीची एक छोटीशी छटा दिसून आली. तिचे आई-वडील तिला घेऊन गेले. तेही तिच्याशी इंग्रजीतच बोलत होते. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की दोघेही आई-वडील एकमेकांशी मराठीमध्ये बोलताना दिसले. कदाचित मुलीला आपल्या आई-वडिलांच्या मातृभाषेचा अर्थात मराठीचा काहीच गंध नसावा. म्हणजे लहानपणापासूनच ते तिच्याशी फक्त इंग्रजीत बोलत असावेत असं दिसलं. शेवटपर्यंत मी त्यांचं निरीक्षण करत होतो. ती मुलगी एकही शब्द मराठीमध्ये बोलली नाही. तेव्हा माझा समज पक्का झाला.
मागे एकदा एक आजी आजोबा भेटले होते. ते आपल्या नातीबद्दल अतिशय उत्साहाने बोलत होते. आमच्या मुलीला मराठी बोलता येत नाही बरं का! असं अभिमानाने सांगत होते. खरंतर ही अभिमानाची नाही तर लाज वाटण्याची गोष्ट आहे, असं आम्ही मनातल्या मनात म्हटलं. आजी-आजोबांना याचा देखील अप्रूप वाटत होतं की आम्हाला तिच्याशी बोलण्यासाठी इंग्रजीचा वापर करावा लागतो. एकंदरीत याही मुलीची परिस्थिती पहिल्या मुलीसारखी होती. लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या मातृभाषेपासून दूर ठेवायचं म्हणजे त्यांची मातृभाषा आपोआपच इंग्रजी होईल, असं काहीसं गणित.
यामध्ये आणखी एक गंमत मला विशेषत्वाने आढळून आली. आई वडील दोघेही मराठी परंतु मुलगी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलते. ही गोष्ट अधिक हास्यास्पद वाटत होती. नंतर त्याचं कारण देखील समजलं. दोघांना फारसं इंग्रजी बोलता येत नाही. पण आपल्या मुलीला मोठ्या इंग्रजी शाळेत घातले. त्यामुळे मराठी सारखी गावठी भाषा बोलून कसं चालेल? असा विचार करून इंग्रजी येत नसल्याने ते तिच्याशी बिहारची राज्यभाषा असणाऱ्या हिंदीमध्ये बोलत होते. कधी कधी अशा गोष्टी देखील चिड आणतात. विशेष म्हणजे मुलाच्या शाळेमध्ये देखील शिक्षक त्यांच्याशी हिंदीमध्येच बोलायचे. मला इथे हिंदी आणि मराठी भाषेचं तुलना करायची नाही. पण एकंदरीत इतिहास बघितला तर समृद्धी कोणाच्या वाटेला आहे, हे तुम्हाला देखील समजेल. कोणती भाषा कोणत्या प्रकारच्या प्रांताची आहे? या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला शोधता येईल.
सांगायचं तात्पर्य असं की नवपालक आपल्या मुलाला ‘ग्लोबल सिटीझन’ करायच्या नादात आपल्या मातृभाषेला तुच्छ लेखत आहेत, याची वारंवार प्रचिती येते. इंग्रजी भाषा शिकल्याने प्रगती होते हे खर आहे. पण त्यासाठी आपली मातृभाषा बदलण्याचं जे फॅड आज दिसतय, ते खरोखर हास्यास्पद असंच आहे.

— तुषार भ. कुटे


 

अर्ली इंडियन्स

ऐतिहासिक कालखंडामध्ये जितके आपण मागे जात राहतो तितके पुरावे क्षीण आणि दुर्बल होऊन जातात. मग अशा इतिहासाची मांडणी करताना संशोधकांचा कस लागतो. यातून नवनव्या संशोधनपद्धती विकसित होतात. तर्कपद्धतीचा अवलंब केला जातो. आणि इतिहासाची मांडणी होते. भारतीयांचा ज्ञात इतिहास अडीच हजार वर्षांपासून सुरू होतो. बौद्ध-जैन धर्माचा उदय आणि मौर्य साम्राज्याची स्थापना इथून भारतीय इतिहास सुरू होतो, असे म्हणतात. परंतु भारतामध्ये पहिल्या बुद्धिमान मानवाचे अर्थात होमो सेपियन्सचे आगमन सुमारे ६५ हजार वर्षांपूर्वी झाले होते. मग या उरलेल्या ६२ हजार पाचशे वर्षांमध्ये नक्की काय झाले? याचा शोध घ्यायचा असल्यास आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करता येऊ शकतो.
अनुवंशशास्त्राच्या आधारे वानरांच्या प्रजातीतून विकसित होत असलेला किंबहुना झालेला बुद्धिमान मानव अर्थात होमो सेपियन्स आफ्रिकेतून हळूहळू बाहेर पडला, हे सिद्ध झालेले आहे. विविध मार्गांचा अवलंब करून जगाच्या इतरत्र भागामध्ये पोहोचत गेला. डार्विनपासून सुरू झालेला हा प्रवाह पुढील कित्येक दशके अनेक अनुवंशशास्त्रज्ञांनी पुढे प्रवाहित ठेवला. यातून नवनवे विचार, संशोधन पुढे आले. इतिहास उमजत गेला. तर्कवितर्क लढवले गेले. पारंपारिक समजुतींना तडे देखील बसले. परंपराच्या विरोधात संशोधनांचे तात्पर्य आल्यामुळे वादविवाद देखील झाले. परंतु संशोधकांनी सत्य शोधण्याचा आटोकात प्रयत्न केला. आजही विज्ञानाच्या आधारे सिद्ध होत असलेल्या अनेक संकल्पनांना परंपराधिष्टीत लोकांचा विरोध आहे. त्यातीलच अनेक प्रश्नांची उत्तरे टोनी जोसेफ यांनी ‘अर्ली इंडियन्स’ या पुस्तकांमध्ये विज्ञानाचा आधार घेत स्पष्टपणे मांडलेली आहेत.
एकेकाळी भारतामध्ये जगातील सर्वात प्रगत संस्कृतींपैकी एक संस्कृती आनंदाने नांदत होती. ती म्हणजे ‘हडप्पा संस्कृती’. अनेक अनुवंशशास्त्रज्ञ, पुरातत्त्ववेत्ते यांनी हडप्पावर सखोल संशोधन केले आहे. त्यातून विविध निष्कर्ष देखील काढलेले आहेत. भारतातील ही प्राचीन संस्कृती भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने पाया होती. हे देखील त्यांनी सिद्ध केले आहे. किंबहुना यावर सर्वांचेच एकमत असल्याचे दिसते. हजारो वर्षे गुण्यागोविंदाने नांदल्यानंतर हळूहळू हडप्पा संस्कृती लयास गेली. आणि भारतातील इतर भागांमध्ये संचारत गेली. हडप्पा विकसित होण्याच्या आधीदेखील भारतामध्ये मानव संस्कृती नांदत होत्या. पण हडप्पा संस्कृती ही मैचा दगड ठरली.
इराणच्या झेग्रोस परिसरातून आर्यवंशीय लोकांचे भारतामध्ये स्थलांतर झाले आणि यानंतरच हळूहळू हडप्पा संस्कृती लयाला गेली, असे म्हटले जाते. या ऐतिहासिक संकल्पनेचे विस्तृत विवेचन टोनी जोसेफ यांनी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच जीनोम म्हणजे काय, याची विस्तृत स्पष्टीकरण वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे त्यांनी दिलेले आहे. ते अगदी बारकाईने वाचावे लागते. कधी कधी काही गोष्टी डोक्यावरून देखील जाऊ शकतात. परंतु तात्पर्याने डीएनएच्या आधारे एखाद्या मानवी समूहाचा वंश काढता येऊ शकतो, असं टोनी जोसेफ यांनी सिद्ध केले आहे.
या पुढील प्रकरणामध्ये भारताच्या विविध भागांमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचा अभ्यास करून येथे मानवाचा वावर किती प्राचीन होता, याचे विस्तृत विवेचन वाचायला मिळते. पुस्तकाच्या जवळपास निम्म्या भागामध्ये हडप्पा संस्कृती वरील विस्तृत संशोधन लेखकाने मांडलेले आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेल्या हडप्पा, मोहेंजोदारो, राखीघडी, धोलाविरा, कालीबंगन, मेहरगड अशा विविध स्थळांचा अभ्यास केलेला दिसतो. या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंद्वारे त्या काळाची संस्कृती कशी होती, तसेच त्यांचा अन्य भागांशी व्यापार कशा पद्धतीने होत होता? याची देखील माहिती मिळते. तत्कालीन भौगोलिक रचनेचा तसेच वातावरणाचा अभ्यास करून हडप्पा संस्कृतीची एकंदरीत प्रगती लेखकाने मांडलेली आहे. काही गोष्टी तर्काच्या आधाराने तर काही विज्ञानाने सिद्ध केलेल्या दिसतात. भारतामध्ये सध्या वापरात असलेल्या चार प्रकारच्या भाषांपैकी इंडो-युरोपियन आणि द्रविडी भाषांमधील फरक अथवा साम्य तसेच हडप्पा लिपी आणि द्रविडी लिपी मधील साम्य यावरून विविध तर्क लेखकाने येथे विस्तृतपणे मांडलेले आहेत. हडप्पाची लिपी आजही कोणत्याही संशोधकाला वाचता आलेली नाही. अनेक संशोधकांनी आपल्या हयातीत बरेच परिश्रम करून देखील त्यांना हडप्पा चित्रलिपीचा अर्थ लावता आलेला नाही. कदाचित हडप्पाचा बहुतांश इतिहास हे चित्रलिपी वाचला वाचता आल्यानंतरच उर्वरित जगाला समजेल, असे दिसते. म्हणजेच एका अर्थाने अजूनही हडप्पाकालीन भारतीयांचा परिपूर्ण इतिहास आपल्याला ज्ञात नाहीच.
जनुकशास्त्राचा आणि रसायनशास्त्राचा आधार घेऊन लेखकाने हडप्पा संस्कृतीतील लोकांविषयी विविध तर्क मांडलेले आहेत. शिवाय आर्य खरोखर भारताबाहेरून भारतामध्ये आले होते का? याचे देखील सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेले आहे. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय फरक देखील यात मांडलेला दिसतो.
सरस्वती नदीची गोष्ट आणि हडप्पाकालीन चित्रलिपी याविषयी बहुतांश इतिहास अभ्यासकांना उत्सुकता असते. ही उत्सुकता शमवण्याचे काम देखील पुस्तकातील काही प्रकरणांमध्ये होते. एकंदरीत सव्वादोनशे पानांचे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने केलेला विस्तृत अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे. भारतीय इतिहासाला एक वेगळी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो.

— तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #परीक्षण #पुस्तक_परीक्षण


 

Tuesday, February 4, 2025

हो चि मिन्ह

विसाव्या शतकामध्ये देशादेशांमधील लढायात अनेक घटना घडल्या. जगामध्ये दोन महायुद्ध झाली. परंतु कोणत्याही महायुद्धामध्ये थेट सहभाग न घेतल्याने अमेरिका प्रगतीच्या पायऱ्या चढू लागली, असं म्हणतात. हळूहळू त्यांना वर्चस्वाची नशा चढू लागली. आणि याच कारणास्तव बहुतांश देशांवर राज्य करण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले. परंतु अन्य देशांवर हल्ला करत असताना काही देशांनी अमेरिकेला देखील जेरीस आणले होते. त्यातील पहिला देश म्हणजे क्युबा आणि दुसरा व्हिएटनाम. व्हिएटनाम या देशाने गनिमी कावा अर्थात गुरिल्लावॉरचे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतले, असे अनेक लेखक लिहितात. याविषयी निश्चित माहिती नाही. पण या तंत्राचा वापर करून व्हिएटनामने अमेरिका सारख्या देशाला देखील नमवले, हे ऐतिहासिक तथ्य आहे. अर्थात यामागे भक्कम नेतृत्वाचा पाठिंबा होता, हे सत्य देखील नाकारायला नको.
आजच्या व्हिएटनामचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे हो चि मिन्ह यांचे हे छोटेखाणी चरित्रात्मक पुस्तक. याद्वारे हो चि मिन्ह यांच्या एकंदरीत कारकीर्दीचा अंदाज बांधता येऊ शकतो. एकेकाळी इंडोचायना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई भागामध्ये व्हिएटनामची शेजारच्या प्रबळ देशांकडून गळचेपी होत होती. अर्थातच मागील शतकामध्ये सातत्याने स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या शेकडो देशांपैकी व्हिएटनाम हा देखील एक देश होता. अर्थात स्वातंत्र्याच्या दृष्टीने पाऊले टाकत असताना लोक चळवळ होणे अत्यंत गरजेचे होते. याच लोक चळवळीतून व्हिएटनाममध्ये राष्ट्रप्रेमी युवकाचा उदय झाला. त्यानेच विविध मार्गांचा अवलंब करत देशवासियांना एकत्र केले आणि. नवा व्हिएटनाम उभारला. शिवाय इंडोचायना मधील आपल्या जवळच्या कंबोडिया आणि लाओस या देशांमध्ये देखील समविचारी सरकारे सत्तेत आणली. त्याचीही गोष्ट या पुस्तकामध्ये वाचता येते.

--- तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #पुस्तक_परीक्षण


 

Sunday, February 2, 2025

सीबीएसई आणि महानगरपालिका

मराठी भाषेतील शिक्षण म्हणजे अतिशय फालतू आणि दुय्यम दर्जाचं, अशा अंधश्रद्धा मागच्या काही वर्षांपासून वेगाने फोफावत आहेत. आणि आता शासकीय यंत्रणा देखील त्याला पद्धतशीरपणे खतपाणी घालताना दिसत आहेत. पैशावाल्याचं पोरग इंग्रजीतून शिकणार आणि गरिबाचं पोरगं मराठीतून शिकणार, ही समाजाची मानसिकता बनत चाललेली आहे. मातृभाषेतील शिक्षण केव्हाही श्रेष्ठच जे हृदयापर्यंत भिडतं असं जवळपास प्रत्येक भाषा तज्ञाचे मत आहे. परंतु आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही. वारेमात पैसा ओतून मिळवलेलं सीबीएसईतील इंग्रजी भाषेतील शिक्षण म्हणजेच श्रेष्ठ, असं अनेकांना वाटतं. त्यातूनच आता महानगरपालिका देखील तथाकथित गरीब मुलांसाठी इंग्रजी भाषेतलं सीबीएससीतल शिक्षण देण्यासाठी सज्ज होत आहेत.
या शाळांमध्ये आता क्रीडा कक्ष, संगीत खोली, इलेक्ट्रिक खोली, नृत्य कला, हस्तकला, सामान्य विज्ञान, जीवशास्त्र भौतिकशास्त्र, संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय अशा सुविधा महानगरपालिका करून देणार आहे. अशा वेळी एक प्रश्न पडतो की, या शाळा सध्याच्या मराठी शाळांमध्ये त्यांना देता येत नाहीत का? ज्यांनी कोणी या निर्णयासाठी हातभार लावला असेल ते सर्वच जण आपल्या मातृभाषेतून शिकलेले असावेत, याची मला शंभर टक्के खात्री आहे. पण तरी देखील नवीन पिढीला इंग्रजीतून शिकण्याचा हट्टहास का? हा गहण प्रश्न आहे. इंग्रजीतून शिकणं आणि इंग्रजी शिकणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. ज्यांची सांगड आपल्या समाजाला कदाचित अजूनही घालता येत नाही. त्यातूनच शासकीय यंत्रणांची देखील अशी भयानक मानसिकता तयार होते. एखाद्या परकीय भाषेतून शिक्षण घेणं किती अवघड असतं तेही अतिशय लहान मुलाला…  याची कल्पना कदाचित महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याला नसावी. मातृभाषेतूनच उत्तम शिक्षण दिलं, इंग्रजीचेही धडे दिले तर मूल चांगली प्रगती करू शकेल. परंतु याचा विचार कोणालाही करायचा नाही. स्वतःची उदो उदो करण्याच्या नादात शिक्षण क्षेत्राचे वाटोळं करायला बहुतांश मंडळी टपलेली आहेत असंच दिसतं. मागील बऱ्याच वर्षांपासून अनेक पालकांनी इंग्रजीतून शिक्षण अतिशय अवघड जातं म्हणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमांमध्ये टाकल्याची असंख्य उदाहरणे आहेत. या मागची नक्की कारणे काय? याचे उत्तर महानगरपालिकेच्या तथाकथित शिक्षण तज्ञांनी घ्यायला हवीत. त्यावर विचार करायला हवा. आत्ताची शिक्षणयंत्रणा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन व्हायला हवे. मराठी शाळेतील शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात? शिवाय त्यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे? याचा विचार व्हायला हवा. जर मराठी भाषेतूनच शिक्षकांना समस्या असतील तर इंग्रजीतून काय होणार? या प्रश्नाचे देखील उत्तर शोधायला हवे. शाळा इंग्रजी केली आणि सीबीएससी बोर्डाला जोडली की शिक्षण दर्जेदार होत नाही. फक्त स्वतःचा उदो उदो होतो. यातून महानगरपालिका काही शिकेल, याची सध्यातरी शाश्वती वाटत नाही.

--- तुषार भ. कुटे

#मराठी #शिक्षण #इंग्रजी #मातृभाषा

Saturday, February 1, 2025

जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं

प्रत्येक शतकाचा कालखंड हा वेगवेगळ्या घटनांनी तसेच निरनिराळ्या साम्राज्यांच्या इतिहासकथांनी व्यापलेला आहे. या प्रत्येक कालखंडामध्ये निरनिराळ्या देशांनी, संस्कृतींनी आपला ठसा उमटवला. कोणताच एक देश अथवा खंड सातत्याने जगावर राज्य गाजवू शकला नाही किंवा तेथील साम्राज्यांनी वाटसरुंनी अथवा बुद्धिमंत्तांनी देखील सातत्याने एकाच प्रदेशातून प्रगती केली नाही. आज जरी युरोप-अमेरिकासारखे खंड प्रगतीच्या वाटेवर पहिल्या स्थानावर असले तरी कोणी एकेकाळी आशिया खंड म्हणजे जगाच्या समृद्धीचा आणि भरभराटीचा प्रदेश होता. त्याचीच गोष्ट सांगणारा हा ग्रंथ म्हणजे डॉ. स्टुअर्ट गार्डन लिखित ‘जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं’.
माध्यमिक शिक्षणामध्ये इतिहासाच्या पुस्तकांमधून मध्ययुगीन मला जगाचं दर्शन झालं. यात अनेक प्रवासी आणि साम्राज्याची माहिती होती. परंतु ती त्रोटक आणि तुरळकच. उदाहरण घ्यायचं झालं तर चिनी प्रवासी फहियान आणि ह्युएनत्संग यांचे देता येईल. ह्युएनत्संग याने प्रवासाचा भला मोठा टप्पा गाठत भारत भ्रमंती केली होती. अनेक ठिकाणी भेटी देऊन नोंदी केल्या होत्या. यातून तत्कालीन भारत व इथली राज्यव्यवस्था कशी होती याची माहिती मिळते. इसवी सन ५०० ते १५०० या कालखंडामध्ये आशिया हा एक विस्मयजनक एकसंध आणि विविध शोधांनी गजबजलेला होता! जगभरातील पाच मोठी शहरे ही इथल्या पाच वेगवेगळ्या साम्राज्यांच्या राजधान्या होत्या. समृद्धी आणि भरभराटी याचेच दुसरे नाव म्हणजे आशिया खंड होते. भारतीय आणि चिनी संस्कृती तसेच अरब जगत याच्या केंद्रस्थानी होते. याच काळामध्ये गणिताची, भूमितीची आणि विज्ञानाच्या विविध शाखांची प्रगती आशिया खंडातून होत गेली. अनेक तत्त्वज्ञाने, विचारधारा तयार झाल्या. साहसी वाटसरूंनी, प्रवाशांनी जग धुंडाळले आणि यातूनच विचारधारांचा प्रसार विविध देशांमध्ये होत गेला. या कालखंडात जीवन व्यतीत केलेल्या माणसांच्या संशोधनावर प्रत्येक प्रकरण आधारित आहे. ह्युएनत्संग, इब्न फदलान, इब्न सीना, इब्न बतुता, मा हुआन, बाबर, टोमे पिरेस अशा विविध व्यक्तींच्या चित्रणातून हे पुस्तक क्रमाक्रमाने साकारलेले आहे. यातील बहुतांश जणांची चरित्रे ही प्रेरणादायी आणि आशा-आकांक्षांनी भरलेली आहेत, ज्यामुळे आपण वाचताना आश्चर्यचकित होऊन जातो!

--- तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #इतिहास #परीक्षण #पुस्तक_परीक्षण