Thursday, January 1, 2026

“अनस्टॉपेबल अस” - खंड दुसरा

लाखो वर्षांच्या सेपियन्सच्या प्रवासामध्ये घडलेल्या घडामोडींचे वर्णन युवाल नोवा हरारी यांच्या ‘अनस्टॉपेबल अस’ या ग्रंथशृंखलेमध्ये अनुभवता येते. पहिल्या खंडामध्ये माणसाने जग कसं जिंकलं? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. याच्याच पुढे जग न्याय का नाही? या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या खंडामध्ये मिळते.
मनुष्य हा पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांमधील एक प्राणी असला तरीही त्याने आपल्या मेंदूच्या बळावर अकल्पित अशी प्रगती करून दाखवली. आणि या प्रगतीचा वेग अजूनही वाढतोच आहे. आपल्या मेंदूच्या बळावर त्याने पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील अनेक प्राण्यांवर नियंत्रण मिळवले. यातूनच तो जग जिंकायला लागला. हजारो वर्षांच्या प्रगतीच्या कालखंडामध्ये अनेक चढ उतार अनुभवत माणसाने स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आणि यातूनच न्याय-अन्यायाची संकल्पना उदयास झाली. अनेक समस्यांवर त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर तोडगा काढला. नवनवीन शोध लावले. त्यातून त्याचा आत्मविश्वास बळवला गेला. चांगल्या वाईट गोष्टींची जाण होत गेली. कोणता प्राणी आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि कोणता नाही? त्याला कळायला लागले. हळूहळू तो शेती करू लागला. काही वर्षांमध्येच शेतीतील पिके देखील त्याच्या नियंत्रणाखाली आली. “ट्रायल अँड एरर” पद्धतीचा वापर करून तो शिकत गेला आणि स्वतःचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळा अस्तित्व त्याने तयार केलं. हळूहळू त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होत गेले. दुष्काळ, पूर, प्राण्यांची रोग, माणसांचे रोग, असंतुलित आहार, कष्टाची काम, उपद्रवी कीटक, झाडांना होणारे रोग, युद्ध आणि गुलामगिरी यासारखी संकटे त्याने अनुभवली. त्यातूनही तो शिकला. माणसांमध्येही काही बुद्धिमान लोक राजे बनू लागले. इतर लोक हळूहळू त्यांचे गुलाम झाले. एक प्रकारची राज्यव्यवस्था तयार झाली. मालमत्ता नावाची संकल्पना उदयास साली. नोकरशाही तयार झाली. शिक्षणाची सुरुवात झाली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी नियम तयार झाले. आणि यातूनच न्यायाची संकल्पना देखील उदयास आली. अर्थात हे नियम सर्वांनाच समान पद्धतीने लागू झाले नाहीत. लाखो लोक अतिशय थोडक्यात लोकांचं अर्थात राजांचं, नेत्यांचं ऐकू लागले. हेच राजे नेते न्याय देणारे ठरले. परंतु न्यायाची संकल्पना समानतेकडे झुकली नाही. कदाचित आजही समाजव्यवस्थेतील ही परिस्थिती बदललेली नाही.
अशा विविध गोष्टींचा ऊहापोह करण्याचे काम रंगीत चित्रांद्वारे “अनस्टॉपेबल अस” च्या या खंडामधून होते. इतिहास हा नेहमी शिकवणारा असतो, बोध देणारा असतो. अर्थात इतिहासाच्या मांडणीतूनच तयार झालेला हा ग्रंथ बऱ्याच वेगवेगळ्या शिकवण्या देतो. आणि कदाचित याही पुढे आपली प्रगती न थांबविणारा सेपियन “अनस्टॉपेबल” म्हणूनच राहील, असे दिसते.

पुस्तकाचे नाव: अनस्टॉपेबल अस - खंड दुसरा 
लेखक: युवाल नोआ हरारी 
अनुवाद: प्रणव सखदेव 
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन

— तुषार भ. कुटे


 

Friday, December 26, 2025

आर्टिफिशियल इंटेलिजन्स: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानव यांच्या सहअस्तित्वाचे कोडे

मागच्या जवळपास दोन वर्षांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये होत असलेल्या नवनवीन तंत्र उदयाचा, घडामोडींचा आणि वेगवान स्पर्धेचा अभ्यास करताना या तंत्रज्ञानाची भविष्यातील व्याप्ती माझ्या ध्यानात यायला लागली होती. हे तंत्रज्ञान मानवी प्रगतीसाठी वरदान ठरत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला त्याचे नवनवे धोके देखील निर्माण होताना दिसत आहेत. एआयचे पितामह जेफ्री हिंटन यांनी याविषयी आधीच जनजागृती सुरू केलेली आहे. परंतु त्याचा फारसा प्रभाव झालेला दिसत नाही. युवाल नोवा हरारी, स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या विद्वानांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासाबाबत विविध मुद्दे उपस्थित केलेले आहेत. निक बॉस्ट्रॅम यांच्या सुपरइंटेलिजन्स या पुस्तकामधून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भविष्यातील वापर अधिक ठळकपणे समोर यायला लागला. या तंत्रज्ञानाबद्दल जुजबी माहिती असली तरी आजही आपण भारतीय त्याबद्दल फारशा गांभीर्याने बोलत नाही, किंबहुना विचारही करत नाही. म्हणूनच या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी हा पुस्तकरुपी यज्ञ मी हाती घेतला.
आपण एका अशा युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे मानवी इतिहासाला कलाटणी देणारी, आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत व्याख्यांना आव्हान देणारी आणि आपल्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता असलेली एक नवीन शक्ती उदयास येत आहे – ती शक्ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. काही दशकांपूर्वी विज्ञानकथांचा विषय वाटणारी ही संकल्पना आज आपल्या दैनंदिन जीवनाचा, आपल्या अर्थव्यवस्थेचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या जागतिक राजकारणाचा अविभाज्य भाग बनली आहे. आपल्या हातातील स्मार्टफोनपासून ते आपल्याला सेवा देणाऱ्या चॅटबॉट्सपर्यंत, आणि वैद्यकीय निदानापासून ते स्वयंचलित वाहनांपर्यंत, कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या अवतीभवती, अनेकदा आपल्या नकळत, कार्यरत आहे. तिचा विकास थक्क करणाऱ्या वेगाने होत आहे आणि तिची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे.
ही प्रगती निःसंशयपणे अनेक संधी आणि फायदे घेऊन येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मानवाच्या अनेक मोठ्या समस्या (उदा. रोगराई, गरिबी, हवामान बदल, अज्ञान) सोडवण्याची, आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याची, वैज्ञानिक शोधांना गती देण्याची, आणि मानवी क्षमतांना एका नव्या उंचीवर नेण्याची अफाट क्षमता आहे. हे सर्व पाहता, एका उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याची आशा पल्लवित होते.
परंतु, या नाण्याच्या दुसरी बाजूही तितकीच, किंबहुना अधिक, महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची ही वाढती शक्ती आणि स्वायत्तता आपल्यासोबत काही अत्यंत गंभीर आणि मूलभूत प्रश्न घेऊन येत आहे. जर यंत्रे मानवापेक्षा अधिक बुद्धिमान झाली, तर काय होईल? त्यांच्यावर आपले नियंत्रण राहील का? त्यांची ध्येये मानवी मूल्यांशी आणि हितांशी सुसंगत असतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा अनियंत्रित वाटणारा विकास आपल्याला एका अशा भविष्याकडे तर घेऊन जात नाहीये, जिथे मानवजातीचे स्थान, तिचे स्वातंत्र्य, तिची ओळख आणि कदाचित तिचे अस्तित्वच धोक्यात येईल?
"आर्टिफिशियल इंटेलिजन्स: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानव यांच्या सहअस्तित्वाचे कोडे" हे पुस्तक याच गंभीर आणि काहीशा अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांचा ऊहापोह करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या पुस्तकाचे शीर्षक जाणीवपूर्वक काहीसे धक्कादायक आणि विचारप्रवर्तक ठेवले आहे. 'मानवतेचा अंत' याचा अर्थ केवळ पृथ्वीवरून मानवी प्रजातीचा शारीरिक विनाश होणे, असाच मर्यादित नाही. तो त्याहून अधिक व्यापक आणि सूक्ष्म असू शकतो. तो कदाचित आपल्या स्वातंत्र्याचा, आपल्या स्वायत्ततेचा, आपल्या निर्णयक्षमतेचा, आपल्या अस्तित्वाच्या उद्देशाचा, किंवा 'मानव' म्हणून असलेल्या आपल्या अद्वितीय ओळखीचाही अंत असू शकतो. हे पुस्तक या विविध शक्यतांचा, त्यांच्यामागील कारणांचा, आणि त्यांच्या संभाव्य परिणामांचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
या पुस्तकाचा उद्देश केवळ भीती निर्माण करणे किंवा निराशावाद पसरवणे हा नाही. तसेच, तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीला विरोध करणे हाही नाही. तंत्रज्ञानाचा विकास हा अटळ असतो, आणि त्याला थांबवणे शक्य नसते. पण त्याला योग्य दिशा देणे, त्याचे नियमन करणे, आणि त्याचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवताना त्याचे धोके कमी करणे, हे आपल्या हातात नक्कीच असते. या पुस्तकाचा उद्देश आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयाबद्दल समाजात एक सखोल, माहितीपूर्ण आणि चिकित्सक चर्चा सुरू व्हावी. आपण ज्या शक्तिशाली तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहोत, त्याच्याबद्दल आपण अनभिज्ञ किंवा उदासीन राहून चालणार नाही. आपल्याला त्याचे स्वरूप, त्याची क्षमता, त्याच्या मर्यादा, आणि त्याचे संभाव्य धोके यांची स्पष्ट जाणीव असायला हवी.
या पुस्तकातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी सखोल माहिती वाचकांना मिळेलच परंतु याबरोबरच हे तंत्रज्ञान काय करू शकते? तसेच त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा? मानव आणि एआयचा समन्वय कसा साधता येईल? या सर्व प्रश्नांची सुटसुटीत उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी सातत्याने जाणून घेण्यासाठी उत्सुक असणारे वाचक पुस्तक वाचून झाल्यानंतर याकडे पाहण्याचा एक समर्पक दृष्टिकोन तयार करतील, अशी मला आशा आहे. 

--- तुषार भ. कुटे

#एआय #मराठी #पुस्तक #मधुश्री_पब्लिकेशन #tusharbkute 


 

Friday, December 19, 2025

पायथॉन प्रोग्रॅमिंग : नवीन आवृत्ती

"पायथॉन प्रोग्रॅमिंग" या पुस्तकाच्या सुरुवातीच्या आवृत्त्या संपल्यानंतर नवीन पुस्तकामध्ये काही गोष्टी नव्याने समाविष्ट करायच्या होत्या. त्याकरिता सध्या पायथॉन प्रोग्रॅमर म्हणून नव्याने तयार झालेल्या नोकऱ्यांकरता आवश्यक असलेल्या मूलभूत कौशल्यांवर काम करायला सुरुवात केले. आणि त्यातूनच पायथॉन तंत्रज्ञान विकासातील आणखी काही टप्प्यांचा विचार केला. याचाच वापर करून हे नवीन मुद्दे पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये समाविष्ट केले. उदाहरणार्थ, विविध प्रकारचे एडिटर्स, पीप, मेन्यू बेस्ड प्रोग्रॅम्स, पॅकेज मॅनेजमेंट अशा विविध संकल्पनांचा या पुस्तकामध्ये समावेश करून नवीन आवृत्ती यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये प्रकाशित केली आहे. आधीच्या आवृत्त्यांची असणारी तीनशे रुपये किंमत याही आवृत्तीमध्ये तशीच ठेवलेली आहे. पायथॉन ३.१४ प्रकाशित झाल्यानंतर त्यातील नव्या संकल्पनांचा आधार घेऊन या पुस्तकामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. 
सध्या तरी पायथॉन प्रोग्रॅमिंगची ही नवीन आवृत्ती पुणे पुस्तक महोत्सवामध्ये बुकविश्वच्या स्टॉल क्रमांक एच ५६ वरच उपलब्ध आहे. पायथॉन शिकण्यासाठी उत्सुक असणारे वाचक या सुधारित नवीन आवृत्तीची या ठिकाणावरून खरेदी करू शकतात.

--- तुषार भ. कुटे



Thursday, December 18, 2025

प्रॅक्टिकल डेटा सायन्स

पायथॉन प्रोग्रॅमिंगचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये तुम्ही डेटा सायन्स चे पुस्तक लिहिणार आहात का? अशी अनेक जणांकडून विचारण्यात आली होती. खरंतर त्याआधीच डेटा सायन्सच्या मराठी पुस्तकावर मी काम चालू केले होते. परंतु प्रशिक्षणाच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकामुळे पुस्तकावर काम करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. तरीदेखील अधून मधून छोट्या छोट्या संकल्पनांवर काम करत विविध प्रकारची माहिती मराठीमध्ये लिहून काढत गेलो. पुस्तकाचा असा विशिष्ट साचा ठरला नव्हता. परंतु वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून आलेल्या अनुभवामुळे पुस्तकाची व्यवस्थित मांडणी करता आली. "प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या पुस्तकामध्ये कोणकोणत्या संकल्पनांचा समावेश असावा, याची अनुक्रमे सविस्तरपणे मांडणी केली. पायथॉन प्रोग्रॅमिंग प्रमाणेच डेटा सायन्स मध्ये देखील सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा पद्धतीने मराठीतून लिहीत गेलो. सुमारे ९०% पेक्षा अधिक संकल्पना या पायथॉनद्वारे प्रॅक्टिकलचा आधार घेऊन पुस्तकात मांडल्या. अगदी सिद्धांतिक दृष्टिकोनापासून प्रात्यक्षिकांपर्यंतचा डेटा सायन्सचा प्रवास या पुस्तकामध्ये मांडला. विदा विश्लेषणाच्या तसेच संख्याशास्त्राच्या विविध संकल्पनांना मराठीतून सहज आणि सोप्या पद्धतीत मांडण्याचा अनुभव पहिल्या पुस्तकाप्रमाणेच विलक्षण होता. आणि अखेरीस दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुस्तकाची सविस्तर मांडणी पूर्ण झाली. विदा विज्ञान म्हणजे काय पासून या विषयातील प्रकल्प व्यवस्थापनापर्यंतचा प्रवास "प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या पुस्तकांमध्ये मी सविस्तरपणे मांडण्यात यशस्वी ठरलो, असे मला वाटते. 
बऱ्याच दिवसांनी म्हणजे तब्बल तीन वर्षानंतर तंत्रज्ञान विश्वातील माझे पुढचे पुस्तक तयार झाले आणि प्राकृत प्रकाशनाने ते प्रकाशित देखील केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पाया मांडल्या गेलेल्या डेटा सायन्सची प्रात्यक्षिकांद्वारे या पुस्तकातून सखोल मांडणी केली आहे. सध्या तरी हे पुस्तक पुणे पुस्तक महोत्सवांमध्ये केवळ बुक विश्वच्या स्टॉल क्रमांक H५६ वर उपलब्ध आहे. 
या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी "प्रॅक्टिकल डेटा सायन्स"चा निश्चितपणे नवतंत्रज्ञांना चांगला उपयोग होईल, तेव्हाच या पुस्तकाचे सार्थक झाले असे मी समजेल.

--- तुषार भ. कुटे


 

Monday, December 8, 2025

महाभारताची अजरामर कथा आता 'AI' च्या युगात

आपल्या भारतीय संस्कृतीत रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचे स्थान अढळ आहे. ही महाकाव्ये आपण टीव्हीवर अनेकदा पाहिली आहेत, पण आता हीच कथा एका पूर्णपणे वेगळ्या आणि अत्याधुनिक स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जिओ स्टार आणि कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कने मिळून 'महाभारत: एक धर्मयुद्ध' ही नवीन वेब सिरीज जिओ हॉटस्टारवर आणली आहे. या सिरीजची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात वापरण्यात आलेले 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान.

अलीकडेच या सिरीजचे निर्माते आणि कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे संस्थापक विजय सुब्रमण्यम यांनी 'मनीकंट्रोल'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत यामागचा रंजक प्रवास उलगडला. तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा मेळ घालताना नक्की काय घडले, हे त्यांनी सविस्तर सांगितले.

तंत्रज्ञानाची कमाल, पण संस्कृतीशी तडजोड नाही

जेव्हा 'महाभारत'सारख्या विषयावर AI च्या मदतीने सिरीज बनवण्याचा विचार समोर आला, तेव्हा अनेक प्रश्न उभे राहिले. AI मुळे कथेचा मूळ गाभा बदलेल का? संस्कृती चुकीच्या पद्धतीने मांडली जाईल का? पण विजय सुब्रमण्यम यांनी हे स्पष्ट केले आहे की, त्यांचा उद्देश महाभारताची कथा बदलण्याचा नव्हता, तर ती आजच्या डिजिटल युगातील पिढीला भावेल अशा 'ग्रँड' स्वरूपात मांडण्याचा होता.

ते म्हणतात, "AI मुळे आम्हाला ती भव्यता, ती भावनिक खोली आणि व्हिज्युअल्स (दृश्ये) निर्माण करता आली, जी कदाचित पारंपारिक पद्धतींमध्ये बजेट किंवा वेळेच्या बंधनांमुळे शक्य झाली नसती. पण यात एक गोष्ट कटाक्षाने पाळली गेली - AI ला संस्कृती नव्याने शोधण्याची परवानगी नव्हती."

'AI' ने फक्त काम केले, विचार माणसांचाच!

AI वापरताना सर्वात मोठे आव्हान हे असते की, प्रत्येक दृश्यात सातत्य राखणे. संगणक कधीकधी चुका करू शकतो किंवा दोन दृश्यांमध्ये फरक करू शकतो. यावर मात करण्यासाठी निर्मात्यांनी एक खास पद्धत वापरली. त्यांनी "हायब्रीड वर्कफ्लो" तयार केला.

याचा अर्थ असा की, पात्रांचे स्केच, कपडे, प्रकाश योजना आणि सेटचे बारकावे हे आधी मानवी कलाकार आणि तज्ञांनी निश्चित केले. त्यानंतरच AI चा वापर केला गेला. विजय सुब्रमण्यम सांगतात, "आम्ही AI ला फक्त 'प्रॉम्प्ट' (आदेश) दिले नाहीत, तर आम्ही संपूर्ण प्रक्रिया 'इंजिनिअर' केली. आमचे व्हिजन जसेच्या तसेच पडद्यावर यावे यासाठी आम्ही कडक नियम पाळले. संस्कृती आणि इतिहासाचा अस्सलपणा जपण्यासाठी संशोधक आणि इतिहासकारांची मदत घेतली गेली. AI चे काम फक्त आमच्या कल्पनांना पडद्यावर साकारणे हे होते, संस्कृती ठरवणे नाही."

विमान उडवत असतानाच ते बांधण्याचा अनुभव

ही सिरीज बनवत असताना AI चे तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत होते. रोज नवनवीन टूल्स आणि अपडेट्स येत होते. अशा वेळी जुन्या पद्धती बदलून नवीन गोष्टी स्वीकारणे हे मोठे आव्हान होते. या अनुभवाबद्दल बोलताना विजय म्हणतात, "हे म्हणजे विमान हवेत उडत असतानाच ते बांधण्यासारखे होते. पण तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात हे घडणारच होते. आम्ही लवचिकता ठेवली आणि त्यामुळेच आम्ही हे शिवधनुष्य पेलू शकलो."

मनोरंजन क्षेत्राचे भविष्य आणि पुढील दशक

'महाभारत: एक धर्मयुद्ध' ही सिरीज भारतीय मनोरंजन क्षेत्रात एक मोठी क्रांती ठरू शकते. विजय सुब्रमण्यम यांच्या मते, AI हे चित्रपट निर्मात्यांना किंवा कलाकारांना बदलणार नाही, तर त्यांची कल्पनाशक्ती वाढवण्यास मदत करेल. भारत हा असा देश आहे जिथे संस्कृतीची श्रीमंती आणि तंत्रज्ञानाची समज दोन्ही एकत्र आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एआयने आता मनोरंजन सृष्टीत आपली 'ग्रँड एंट्री' (Grand Entry) केली आहे. त्यामुळे पुढील एका दशकात मनोरंजन क्षेत्रात कसे आमूलाग्र बदल होतात आणि प्रेक्षकांना अजून काय नवीन पाहायला मिळते, हे पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे. कथा सांगण्याच्या पद्धतीत आता AI हा अविभाज्य भाग बनेल हे निश्चित.

(आधारित, संदर्भ: मनी कंट्रोल)

--- तुषार भ. कुटे



 

Friday, December 5, 2025

टेस्ला डोजो: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील एक क्रांतिकारी महासंगणक

सध्याच्या युगात तंत्रज्ञान हे कल्पनेपेक्षा वेगाने पुढे जात आहे आणि या शर्यतीत एलन मस्क यांची 'टेस्ला' ही कंपनी नेहमीच आघाडीवर असते. टेस्लाने केवळ इलेक्ट्रिक कारच्या जगातच क्रांती केली नाही, तर आता त्यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही एक मोठी झेप घेतली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे नाव आहे 'टेस्ला डोजो'. डोजो हा टेस्लाचा स्वतःचा एक शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर (महासंगणक) आहे, जो प्रामुख्याने त्यांच्या स्वयंचलित कार प्रणालीला अधिक सुरक्षित आणि बुद्धिमान बनवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगायचे तर, डोजो हा टेस्लाच्या गाड्यांचा 'शिक्षक' आहे, जो त्यांना मानवासारखे किंवा त्याहून अधिक सुरक्षितपणे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देतो.

डोजोची निर्मिती करण्याची मूळ गरज समजून घेण्यासाठी आपल्याला टेस्लाच्या गाड्या कशा काम करतात हे आधी समजून घ्यावे लागेल. टेस्लाच्या लाखो गाड्या जगभरात फिरत आहेत आणि त्या प्रत्येक क्षणी रस्त्यावरील व्हिडिओ रेकॉर्ड करत असतात. या गाड्यांना 'फुल सेल्फ ड्रायव्हिंग' (FSD) म्हणजेच पूर्णपणे स्वयंचलित बनवण्यासाठी, त्यांना रस्त्यावरील परिस्थिती, इतर वाहने, पादचारी आणि ट्रॅफिक सिग्नल ओळखणे शिकावे लागते. हे शिकण्यासाठी त्यांना लाखो तासांचे व्हिडिओ फुटेज बघावे लागते आणि त्यातून शिकावे लागते. ही प्रक्रिया मानवी मेंदूच्या न्यूरल नेटवर्कसारखी असते. मात्र, एवढ्या प्रचंड प्रमाणात डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी सध्याचे सामान्य सुपर कॉम्प्युटर पुरेसे ठरत नव्हते किंवा त्यांना खूप जास्त वेळ लागत होता. या समस्येवर मात करण्यासाठी टेस्लाने बाजारातील इतर चिप्स वापरण्याऐवजी स्वतःचा, खास या कामासाठी बनवलेला महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला, ज्याला त्यांनी 'डोजो' असे नाव दिले.

डोजोचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना आणि त्यामध्ये वापरलेली 'D1' नावाची चिप. इतर संगणकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPU) पेक्षा ही चिप वेगळी आहे. टेस्लाने ही चिप खास मशीन लर्निंगच्या कामासाठी डिझाइन केली आहे. जेव्हा अशा हजारो D1 चिप्स एकत्र जोडल्या जातात, तेव्हा एक प्रचंड शक्तिशाली यंत्रणा तयार होते, जिला 'ट्रेनिंग टाइल' म्हटले जाते. या रचनेमुळे संगणकाची माहितीवर प्रक्रिया करण्याची गती कित्येक पटींनी वाढते. सोप्या भाषेत सांगायचे तर, जे काम करण्यासाठी इतर सुपर कॉम्प्युटरला काही महिने लागू शकतात, तेच काम डोजो काही दिवसांत किंवा तासांत पूर्ण करू शकतो. यामुळे टेस्लाच्या गाड्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करण्याचा वेग प्रचंड वाढला आहे.

या महासंगणकाचे मुख्य काम व्हिडिओ डेटाचे विश्लेषण करणे हे आहे. जेव्हा टेस्लाची गाडी रस्त्यावर चालते, तेव्हा तिचे कॅमेरे सभोवतालचे दृश्य टिपत असतात. हा डेटा डोजोकडे पाठवला जातो. डोजो या व्हिडिओमधील प्रत्येक घटकाला लेबल लावतो, म्हणजे हे झाड आहे, ही दुसरी गाडी आहे, हा माणूस आहे हे ओळखतो. त्यानंतर तो या वस्तूंच्या हालचालीचा अंदाज घेतो. उदाहरणार्थ, एखादा चेंडू रस्त्यावर आला तर त्यामागे मूल धावत येऊ शकते, हे समजण्याची क्षमता गाड्यांमध्ये विकसित करणे हे डोजोचे काम आहे. याला 'कॉम्प्युटर व्हिजन' असे म्हणतात. डोजोमुळे टेस्लाच्या गाड्या आता केवळ द्विमितीय (2D) प्रतिमांवर अवलंबून न राहता त्रिमितीय (3D) आणि कालसापेक्ष (Time) अशा '4D' डेटावर प्रक्रिया करू शकतात. यामुळे गाडी चालवतानाचे निर्णय अधिक अचूक होतात.

डोजो प्रकल्प केवळ गाड्यांपुरता मर्यादित नाही. भविष्यात याचा उपयोग टेस्लाच्या 'ऑप्टिमस' या ह्युमनॉइड रोबोटला प्रशिक्षित करण्यासाठी देखील होणार आहे. जसा हा संगणक गाड्यांना रस्ते आणि रहदारी समजण्यास मदत करतो, तसाच तो रोबोट्सना मानवी जगातील कामे करण्यास, वस्तू उचलण्यास आणि चालण्यास शिकवेल. एलन मस्क यांच्या मते, डोजोची क्षमता इतकी अफाट आहे की भविष्यात टेस्ला ही सेवा इतर कंपन्यांनाही देऊ शकते. ज्याप्रमाणे अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) आज जगातील अनेक कंपन्यांना क्लाउड कम्प्युटिंगची सेवा देते, तसेच टेस्ला भविष्यात 'डोजो ॲज अ सर्व्हिस' सुरू करू शकते. यामुळे इतर कंपन्यांना त्यांची एआय मॉडेल्स प्रशिक्षित करण्यासाठी डोजोच्या शक्तीचा वापर करता येईल.

तांत्रिकदृष्ट्या डोजोमध्ये बँडविड्थ आणि लेटन्सी (माहिती पोहोचण्यास लागणारा वेळ) यावर खूप काम करण्यात आले आहे. संगणकाच्या विविध भागांमध्ये माहितीची देवाणघेवाण जितक्या वेगाने होईल, तितका तो संगणक वेगवान ठरतो. डोजोमधील विशेष कनेक्टर आणि वायरिंगमुळे माहितीचा प्रवाह अत्यंत सुलभ होतो. यामुळेच हा जगातील सर्वात शक्तिशाली एआय ट्रेनिंग सुपर कॉम्प्युटर मानला जातो. यासाठी लागणारी वीज आणि कुलिंग सिस्टीम (थंड ठेवण्याची यंत्रणा) देखील अत्यंत प्रगत स्वरूपाची आहे, जेणेकरून हा महासंगणक रात्रंदिवस न थांबता काम करू शकेल.

थोडक्यात सांगायचे तर, टेस्ला डोजो हा केवळ एक हार्डवेअरचा तुकडा नाही, तर तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मानवावर अवलंबून न राहता सुरक्षितपणे गाडी चालवणारी वाहने तयार करण्याचे जे स्वप्न जगाने पाहिले आहे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी डोजोची भूमिका निर्णायक ठरणार आहे. डेटाचा अफाट साठा आणि त्यावर वेगाने प्रक्रिया करण्याची क्षमता यामुळे टेस्ला केवळ एक कार कंपनी न राहता, जगातील सर्वात मोठी एआय आणि रोबोटिक्स कंपनी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. डोजोमुळे भविष्यातील प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि बुद्धिमान होईल, यात शंका नाही.

--- तुषार भ. कुटे

 


 

गुगल इयर इन सर्च २०२५: भारतात AI ची चलती, चॅटजीपीटीला मागे टाकत 'जेमिनी' ठरले अव्वल

२०२५ हे वर्ष भारतासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) चे वर्ष ठरले आहे. गुगलने आपला वार्षिक 'इयर इन सर्च २०२५' अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये भारतीयांनी इंटरनेटवर सर्वाधिक काय शोधले, याची रंजक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, भारतात एआय टूल्सचा वापर केवळ माहिती घेण्यासाठीच नाही, तर दैनंदिन कामे आणि मनोरंजनासाठीही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

१. 'गुगल जेमिनी'ची जोरदार मुसंडी भारतात २०२५ मध्ये गुगलचे स्वतःचे एआय टूल 'जेमिनी' (Gemini) सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. संपूर्ण देशात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींमध्ये 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL) नंतर 'जेमिनी' दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, लोकप्रियतेच्या शर्यतीत जेमिनीने 'चॅटजीपीटी'ला (ChatGPT) मागे टाकले आहे!

२. 'नॅनो बनाना' आणि साडी ट्रेंड जेमिनीच्या लोकप्रियतेमागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे इमेज जनरेशन मॉडेल, ज्याला 'नॅनो बनाना' (Nano Banana) असे नाव देण्यात आले आहे. भारतीयांनी या टूलचा वापर करून विविध प्रकारचे फोटो तयार केले. यामध्ये 'जेमिनी साडी ट्रेंड' (Gemini Saree Trend) आणि '3D मॉडेल ट्रेंड' सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

३. इतर एआय टूल्सची क्रेझ केवळ गुगल जेमिनीच नाही, तर इतर एआय टूल्सबद्दलही भारतीयांमध्ये कुतूहल पाहायला मिळाले:
    ग्रोक (Grok): एलन मस्क यांचे 'ग्रोक' एआय हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय एआय टूल ठरले.
    डीपसीक (DeepSeek) आणि परप्लेक्सिटी (Perplexity): माहिती अचूकपणे शोधण्यासाठी भारतीयांनी या टूल्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला.
    चॅटजीपीटी (ChatGPT): जुने आणि प्रसिद्ध असूनही चॅटजीपीटी या यादीत सातव्या क्रमांकावर राहिले.
    घिबली आर्ट (Ghibli Art): चॅटजीपीटीचा वापर करून स्वत:चे फोटो 'अ‍ॅनिमे' (Anime) स्टाईलमध्ये तयार करण्याचा 'घिबली आर्ट' ट्रेंडही खूप गाजला.

४. एआय आता दैनंदिन जीवनाचा भाग हा अहवाल हे स्पष्ट करतो की, एआय आता फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थी, नोकरदार आणि कलाकार हे आपापल्या कामात, अभ्यासात आणि सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करण्यात एआयचा रोजचा वापर करत आहेत.

थोडक्यात सांगायचे तर, २०२५ मध्ये भारताने एआयला पूर्णपणे स्वीकारले असून, तंत्रज्ञानाच्या या युगात भारत जगाच्या बरोबरीने वेगाने पुढे जात आहे.

(आधारित)

--- तुषार भ. कुटे


 

Sunday, November 23, 2025

गुगल मॅपची बनवाबनवी

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये गाडीने प्रवास करत असताना आपले सर्वात जवळचे सोबती म्हणजे "गुगल मॅप्स" होय. एका आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक गुगल मॅप्सचा वापर भारतामध्ये होतो. आता तर कारच्या नवीन आवृत्तीमध्ये गाडीच्या सॉफ्टवेअरमध्येच गुगल मॅप्सचा अंतर्भाव केलेला आहे. अगदी छोटे-छोटे रस्ते शोधण्यासाठीदेखील आपण गुगल मॅपचा वापर करतो. एका अर्थाने प्रवासामध्ये आपल्या सारथ्यासारखे काम गुगल मॅप करत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अर्थात या गुगल मॅपचा वापर मी देखील सातत्याने करत असतो. परंतु मागच्या काही महिन्यांमध्ये मला आलेले तीन अनुभव या ठिकाणी मी मांडत आहे. ज्याचे निष्कर्ष मला निश्चितपणे सांगता येणार नाही. अर्थात ज्याने त्याने स्वअनुभवाने ठरवावेत, असे मला वाटते. 

१. पुणे ते धुळे
पुण्याहून गाडी मार्गाने पहिल्यांदाच मी धुळ्याच्या दिशेने प्रवास केला. गुगल मॅपवर दोन वेगवेगळे रस्ते दाखवत होते. एक रस्ता सिन्नर-निफाड-चांदवड मार्गे धुळ्याकडे जाण्याचा होता, जो अंतराने सर्वात कमी होता. आणि दुसरा रस्ता सिन्नर होऊन थेट समृद्धी महामार्गाने प्रवास करत छत्रपती संभाजीनगर मार्गे धुळ्याच्या दिशेने दाखवत होता. ज्याला सर्वात कमी अंतर लागणार होते. समृद्धी महामार्गाने गेल्यास गुगल मॅपच्या अनुमानाप्रमाणे २५ मिनिटे कमी लागणार होती. परंतु पहिला रस्ता माझ्या बऱ्यापैकी ओळखीचा होता म्हणून आम्ही त्याच रस्त्याने जाण्याचे ठरवले. आम्ही समृद्धी महामार्ग पुणे-नाशिक महामार्गाद्वारे ओलांडल्यानंतर मला सर्वात जवळचा रस्ता नाशिकच्या दिशेने आहे, असे गुगल मॅपने दाखवले. परंतु तो रस्ता देखील मी घेतला नाही. सिन्नर-निफाड-चांदवडमार्गे धुळ्याला पोहोचलो. माझ्या पोहोचण्याची वेळ ही समृद्धी महामार्गाने दाखवलेल्या वेळेपेक्षाही पाऊण तासाने कमी होती, हे विशेष. याचा अर्थ गुगल मॅपने मला माझा प्रवासमार्ग सर्वाधिक वेळ खाऊ आहे, असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. समृद्धी महामार्गाने गेल्यास मला साडेचारशे रुपये अतिरिक्त टोल लागणार होता. शिवाय नाशिकमार्गे गेल्यावरही तब्बल तीन अतिरिक्त टोलनाके लागणार होते. तसेही काही झाले नाही. मी या रस्त्याने देखील वेळेच्या आधीच पोहोचलो. मग गुगल मॅपने मला हे दुसरे रस्ते प्राधान्य क्रमाने का दाखवले असावेत?


२. पुणे ते पेण
पुण्याहून पेणला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पुणे-मुंबई जुना महामार्ग. या दोन्हींच्या वेळेमध्ये पंधरा मिनिटांचा फरक दाखवत होते. अर्थात यावेळेस मला पुणे मुंबई दृतगती महामार्ग प्राधान्य क्रमाने दाखवण्यात आला. परंतु त्या मार्गाने मी प्रत्यक्षात गेलो नाही. जुन्या महामार्गाने प्रवास केला. जेव्हा प्रत्यक्ष पेणमध्ये पोहोचलो तेव्हा फक्त चारच मिनिटांचा अतिरिक्त वेळ गेला होता! या प्रवासासाठी जर मी एक्सप्रेस वेने गेलो असतो तर ६२० रुपये टोल पडला असता. याउलट जुन्या महामार्गाने केवळ १४१ रुपये टोल लागला!

३. पुणे ते पणजी
पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी बरेच वेगळे रस्ते आहेत. शिवाय कुठल्या ना कुठल्या घाटाने तुम्हाला कोकणामध्ये उतरावे लागते. गुगल मॅप प्राधान्य क्रमाने जो रस्ता दाखवते तो कोल्हापूर-निपाणी आणि आंबोली घाटामार्गे पणजी असा जातो. याशिवाय ताम्हिणी घाट, अनुस्कुरा घाट, अंबा घाट, फोंडा घाट या मार्गे देखील आपण कोकणात उतरू शकतो. यापैकी ताम्हिणी घाटामार्गे गेल्यास कुठेही कोणताही टोल नाका लागत नाही. तर आंबोली घाटामार्गे गेल्यास तब्बल पाच टोलनाके लागतात! त्याहून विशेष म्हणजे दोन्हीही रस्त्यांचा वेळ जवळपास प्रत्यक्षपणे सारखाच आहे. पुणे-कोल्हापूर रस्त्यावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात रस्ता दुरुस्तीची तसेच रुंदीकरणाची कामे चालू आहेत. त्यामुळे अनेकदा रहदारीचा सामना करावा लागतो. अशावेळी प्रवासाचा वेळ देखील वाढत आहे. तो गुगल मॅप दाखवत नाही. याउलट मुंबई-गोवा महामार्गावर काही ठराविक ठिकाणे सोडली तर रस्ता बऱ्यापैकी रिकामा असतो. तरी देखील गुगल मॅप या रस्त्याला प्राधान्यक्रम देत नाही. इथे देखील, का? हा प्रश्न पडतो. 

ही सर्व माझी स्वतःची उदाहरणे आहेत. यातून निष्कर्ष काढला तर असे लक्षात येते की गूगल मॅप जवळपास प्रत्येक वेळी आपल्याला ज्या ठिकाणी टोलनाके आहेत तोच रस्ता सर्वात जलद आहे असेच दाखवते. यामागे गुगल मॅपची नक्की काय बनवाबनवी आहे, हे समजत नाही. आपण आंधळेपणाने गुगल मॅपच्या रस्त्यांवर विश्वास ठेवतो. अर्थात गुगलने ती विश्वासार्हता कमावलेली आहे म्हणूनच... परंतु काही छोट्या छोट्या गोष्टी अजूनही आपल्या ध्यानात आलेल्या नाहीत. कदाचित आपल्या विश्वासार्हतेच्या बळावरच गुगल मॅप नक्की कोणती बनवाबनवी करत आहे, हे अजूनही समजलेले नाही. 

--- तुषार भ. कुटे