Sunday, July 20, 2025

सम्या सम्या मैफिलीत माझ्या

'स्टँडअप कॉमेडी' हा मागच्या काही वर्षांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेला प्रकार. स्वतःला कॉमेडियन म्हणणारे अनेक जण छोट्या छोट्या सभागृहांमध्ये कार्यक्रम घेतात. आणि फुटकळ, बाष्कळ, पांचट तसेच प्रामुख्याने अश्लील विनोद करून इंस्टाग्राम आणि युट्युबद्वारे वेगाने लोकप्रिय होतात. असा हा प्रकार. हिंदीमधून सुरू झालेल्या या प्रकाराची 'झळ' मराठीविश्वाला देखील बसली. त्यामुळे मराठीमध्ये देखील जेन-झेडच्या पिढीमध्ये असेच अनेक कॉमेडीयन तयार झालेले दिसतात. या सर्व विचित्र प्रकारामध्ये मराठीला पु. ल. देशपांडे तसेच व. पु. काळे यांची असलेली नैसर्गिक, दर्जेदार आणि निखळ विनोदाची परंपरा लयाला गेलेली आहे की काय, अशी मला शंका येऊ लागली होती. परंतु समीर चौघुले यांच्या 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' या कार्यक्रमाने ती पूर्णतः फोल ठरवली. आजही पुलं आणि वपु यांचा वारसा सांगण्यासाठी आपल्याकडे समीर चौघुले यांच्यासारखा उत्तम विनोदी लेखक आणि कलाकार आहे, याचीच प्रचिती हा कार्यक्रम बघितल्यानंतर आली!
घरी टीव्ही नसल्यामुळे आम्ही मनोरंजनासाठी केवळ सोनी लिव्हवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हाच एकमेव कार्यक्रम पाहतो. यातील उत्तम विनोदी प्रहसनांद्वारे या कार्यक्रमातून मनोरंजन होते. शिवाय यातील कलाकार देखील त्याच गुणवत्तेचे आहेत. समीर चौघुले मात्र या सर्वांमध्ये अतिशय विशेष. तो आमच्या नऊ वर्षाच्या ज्ञानेश्वरीचा लाडका कलाकार. 
त्याला पाहण्यासाठीच अगदी योगायोगाने चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये त्याचा कार्यक्रम पाहण्याचा 'योग' आला. या कार्यक्रमामध्ये नक्की काय असेल, याची काहीच कल्पना नव्हती. पण समीरदादाच्या अभिनयाची एकंदरीत उंची आम्हाला माहीत होती. त्यामुळे या एकपात्री कार्यक्रमातून देखील तो निश्चितच काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण देणार याची खात्री होती. अर्थात झाले ही तसेच. आम्हाला समोरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या रांगेतील आसन मिळाले होते. त्यामुळे अगदी जवळून आम्ही समीरदादाला पाहत होतो. कार्यक्रमाच्या नावामागचा इतिहास सांगत त्याने आपल्या 'अभिवाचनाचा' श्रीगणेशा केला. आणि तिथूनच नैसर्गिक विनोदांची पेरणी करत हा कार्यक्रम पुढे सरकू लागला. जवळपास प्रत्येक वाक्याला हास्याच्या लकेरी श्रोत्यांच्या चेहऱ्यावर उमटत होत्या. हास्याचे विविध प्रकार या कार्यक्रमात आम्ही अनुभवत होतो. स्मितहास्यापासून अगदी सातमजली हास्यापर्यंतचे सर्व अनुभव आम्ही घेतले. केवळ आम्हीच नाही तर त्या खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहामध्ये प्रत्येक जण सम्याच्या नैसर्गिक विनोदांचा पुरेपूर आनंद घेत होता. एखाद्याची निरीक्षणक्षमता आणि विनोदबुद्धी किती वरच्या दर्जाची असते, हेच समीर चौघुलेंच्या या कार्यक्रमातून दिसून आले. पोट धरून हसणारी अनेक मंडळी आमच्या आजूबाजूला आम्ही पाहत होतो. शिवाय आमचीही गत काही वेगळी झालेली नव्हती! त्यादिवशी कित्येक वर्षांनी हसून हसून तोंड आणि पोटही दुखायला लागले! बहुतांश प्रेक्षक सातत्याने 'वा दादा वा...' आणि 'वा सम्या वा'(!) म्हणत उस्फूर्त दाद देखील देत होते. विशेष म्हणजे यातील कोणतेच विनोद आजच्या स्टँडअप कॉमेडीयनच्या फुटकळ विनोदासारखे नव्हते. आपल्या अनुभवातून तसेच निरीक्षणक्षमतेतून सम्यादादाने ते प्रेक्षकांसमोर अतिशय सहजपणे आपल्या नैसर्गिक शैलीत सादर केले. 'पैसा वसूल' म्हणतात तशाच प्रकारातला हा एकंदरीत कार्यक्रम होता. असं म्हणतात की प्रेक्षकांना रडवणं सोपं असतं, परंतु हसवणे मात्र महाकठीण! मग सतत दोन-अडीच तास हसवणे किती कर्मकठीण काम असावं, याचा विचार करा. 
कार्यक्रमामध्ये त्याने त्याच्या सुमधुर आवाजामध्ये काही गाणी देखील गायली. व्यावसायिक गायक नसला तरीही अतिशय गोड गळा त्याला लाभला आहे, हेही समजले.
समीरदादाचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र समजली की मराठी विनोदाची परंपरा पुढे नेणारा कलाकार आजही महाराष्ट्रामध्ये आहे. तो इंस्टाग्राम अथवा युट्युबद्वारे झटपट लोकप्रिय झालेला नाही. त्यामागे त्याचे अनेक वर्षांपासूनचे परिश्रम आहेत, वाचन आहे, निरीक्षण आहे. याच कारणास्तव तो एकपात्री नाट्यप्रकारात आपले स्थान 'अढळ' करत आहे. अशा कलाकाराला मराठी प्रेक्षकांच्या शंभर टक्के साथीची आवश्यकता आहे. अर्थात मराठी रसिक मायबाप ती देतच आहे, यात शंका नाही. परंतु उत्तरोत्तर वृद्धिंगत झाली तर आणखीही मराठी कलाकार आपल्या भाषेची ही परंपरा पुढे चालू ठेवतील, अशी आशा वाटते. 
बाकी समीरदादा बेस्टच. अजूनही कितीतरी वेळा हा कार्यक्रम पुन:श्च पाहिला तरी कंटाळा येणार नाही, हे मात्र मी निश्चित खात्रीने सांगतो. पुलं आणि वपु यांचे कार्यक्रम आम्ही आज युट्युबवर पाहतो, ऐकतो तेव्हा त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्याची, ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली नाही, याचे वाईट वाटते. परंतु आमच्या पिढीला समीर चौघुलेसारख्या कलाकाराचा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली हे खरोखरच आमचे भाग्य आहे, असे वाटून गेले.

--- तुषार भ. कुटे


 


 

Tuesday, July 8, 2025

ChatGPT

मी एआयमुळे (AI) नोकऱ्या जातील याची काळजी करत नाही. मला काळजी वाटते ती विचारांची जागा एआय घेईल याची. विशेषतः मुलांमध्ये.

जर आपण काळजी घेतली नाही, तर आपण विचार करणाऱ्या पुढच्या पिढीला घडवू शकणार नाही. त्याऐवजी, आपण अशी पिढी घडवू ज्यांना कधी विचार करण्याची गरजच पडली नाही.

एआयबद्दलची माझी ही सर्वात मोठी भीती आहे – ती हॅल्युसिनेशन्सची नाही, नोकऱ्यांची नाही, किंवा पाळत ठेवण्याचीही नाही.

ती आहे "कॉग्निटिव्ह ॲट्रोफी" – म्हणजेच विचार करण्याच्या क्षमतेची हळूहळू होणारी झीज, जी घडवण्यासाठीच शिक्षण असते.

आणि हे आत्ताच घडायला लागलं आहे.

मी एमआयटीचा (MIT) अलीकडचा अभ्यास वाचल्यापासून त्याबद्दल विचार करत आहे. अर्थात, कोणताही चांगला शास्त्रज्ञ म्हणेल की कोणत्याही संशोधनात लाखो त्रुटी काढता येतात. पण हे संशोधन माझ्या डोक्यातून जात नाहीये.

त्यांनी चॅटजीपीटी (ChatGPT) वापरून निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूची तपासणी केली आणि त्याने गेल्या अनेक महिन्यांपासून मला वाटणारी भीती खरी ठरवली.

→ मेंदूतील न्यूरल कनेक्टिव्हिटी ७९ वरून ४२ पर्यंत खाली आली – म्हणजेच ४७% घट झाली. काही सत्रांमध्ये आणि फ्रिक्वेन्सी बँडमध्ये ही घट तब्बल ५५% पर्यंत होती.

→ ८३% विद्यार्थी त्यांनी लिहिलेले एकही वाक्य काही मिनिटांनंतर आठवू शकले नाहीत.

→ त्यांनी एआयचा वापर थांबवला तरी, ज्यांनी कधीच एआय वापरले नाही त्यांच्या तुलनेत त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कमीच राहिली.

संशोधकांनी याला "कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग" म्हटले आहे. मी याला झीज (erosion) होण्याच्या जवळचे काहीतरी म्हणतो. कारण यात खरा धोका शैक्षणिक नाही, तर विकासात्मक आहे.

आपण मुलांना फक्त लिहिण्याचे साधन देत नाही आहोत. आयुष्यभरासाठी आवश्यक असलेल्या मानसिक क्षमता विकसित करण्यापूर्वीच आपण त्यांना शॉर्टकट देत आहोत.

जेव्हा तुमचा मेंदू विचार न करता एखादे काम पूर्ण करायला शिकतो, तेव्हा काय होते? तुम्ही तर्कशक्ती विकसित करत नाही, तर अवलंबित्व विकसित करत आहात.

जेव्हा तुम्ही संघर्ष – जसे की चिंतन, कल्पनांवर विचार करणे – हे काम बाहेरील घटकाला देता, तेव्हा तुम्हाला असे काहीतरी मिळते जे विचारांसारखे वाटते, पण ते विचार नसतात.

आणि जर तुम्ही १२ वर्षांचे असाल? १०? ५? तर तुम्ही लिहायला शिकत नाही. तुम्ही विचार करणे टाळायला शिकत आहात.

भीतीदायक भाग काय आहे? हे काम करते. चांगले गुण मिळतात. वेळ वाचतो. ज्यामुळे याला आव्हान देणे आणखी कठीण होते.

पण शिक्षकांनी एआय-सहाय्यित निबंधांना "आत्म्याशिवायचे" (soulless) असे म्हटले. तो शब्द मला घाबरावतो आहे!

मी एआय विरोधी नाही. मी याच क्षेत्रात काम करतो. पण ज्या गोष्टींची जागा एआय घेत आहे, विशेषतः शिक्षणात, त्याच्या मी पूर्णपणे विरोधात आहे.

आपण इथे कठीण गोष्टी टाळून पोहोचलो नाही. आपण विचार करायला शिकून इथे पोहोचलो. हळूहळू. अपूर्णपणे. आणि कधीकधी वेदनादायकपणे.

पुढच्या पिढीला ही संधी कधीच मिळाली नाही तर काय होईल?

- (डॉ. राधिका यांच्या लिंक्डइन पोस्टवरून साभार)




Saturday, July 5, 2025

जुळून येती रेशीमगाठी

दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघण्याची मला बिलकुल सवय नाही. तसं पाहिलं तर काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरच्या काही मालिका आम्ही नियमित बघत होतो. परंतु त्यांचा दर्जा, कथानक पाहता आपण चुकीच्या दिशेने चाललो आहोत, याची जाणीव झाली आणि कालांतराने सर्व बंद केले. मागच्या काही वर्षांपासून घरामध्ये टीव्हीदेखील नाही. त्यामुळे दूरचित्रवाणीवरच्या मालिकांचा आता सहसा संबंध येत नाही.
तरी देखील अधेमध्ये कुठेतरी कुणाच्या घरात मालिकेतील प्रसंग पाहायला मिळतात. कथानक तर अतिशय सुमार दर्जाचे असते. कोणत्याही घरात घडू नयेत, अशा घटनांचा भडीमार केलेला असतो. द्वेष, शत्रुत्व, मत्सर, व्याभिचार, अश्लीलता या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी या मालिका सजवलेल्या असतात. घरातल्या घरात इतरांसाठी लपलेले सापळे, इतरांना संपवण्यासाठी सुरू असलेले खटाटोप, आपल्याच सग्यासोयऱ्यांविषयी असलेला पराकोटीचा द्वेष, कोणत्याच बाबतीत सुख नाही आणि समाधान नाही अशी कुटुंबे, प्रेम भावनेचा अनादर करणाऱ्या व्यक्ती, नायकांपेक्षा अधिक असलेले खलनायक आणि विशेषत: खलनायिका, स्वतःचे काम सोडून इतरांच्या जीवनात सातत्याने धुडगूस घालणाऱ्या व्यक्ती. सुख-शांती-समाधान या शब्दांचा अर्थही ज्यांच्या गावी नाही, असे नायक आणि नायिका. अशा कितीतरी शब्दांमध्ये या मालिकांची वर्णने करता येतील. त्याहून विशेष म्हणजे याच प्रकारच्या मालिकांना आज मोठा प्रेक्षकवर्ग लाभलेला आहे. थोड्या हलक्याफुलक्या विषयाच्या मालिका चालू झाल्या की त्यांचा ‘टीआरपी’ लगेच ढासळतो. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर सुरू झालेल्या मालिका लवकरच प्रेक्षकांअभावी बंदही पडतात. पण अंधश्रद्धेचा बाजार मांडलेल्या मालिका वर्षानुवर्षे चालूच राहतात, हेही विशेष. एकंदर दूरचित्रवाणी मनोरंजनाची परिस्थिती बघितली तर नैतिकदृष्ट्या ‘भयावह’ आहे, असेच म्हणावे लागेल. अर्थात यामागे निर्माते अथवा दिग्दर्शकांचा दोष आहे असेही नाही. प्रेक्षकांना जे आवडते आणि प्रेक्षक जे अधिकाधिक काळ पचवू शकतात, अशीच कथानके त्यांच्यासमोर सादर केली जातात. एका अर्थाने निर्मात्यांना पैसे कमवायचे असतात. हा त्यांच्या व्यवसायाचाच भाग आहे. परंतु प्रेक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर दूरचित्रवाणी मालिकांच्या कथानकाचा त्यांच्या मनावर कुठे ना कुठेतरी दुष्परिणाम होतच असतो, हेही तितकेच सत्य. आजच्या स्पर्धेच्या काळात दूरचित्रवाणी वाहिन्यादेखील नवनवी द्वेषपूर्ण कथानके घेऊन मालिका बनवत आहेत. आणि प्रेक्षकांना देखील ‘बनवत’ आहेत हे म्हणायला हरकत नाही.
हे सर्व सांगायचा उद्देश असा की आज जरी उत्तम कथानकाच्या मालिका तयार होत नसल्या तरी काही वर्षांपूर्वी विविध वाहिन्यांवर प्रसारित झालेल्या मालिका आजही बघाव्या अशाच आहेत. दशकभरापूर्वी झी मराठीवर “जुळून येती रेशीमगाठी” नावाची एक मालिका प्रसारित झाली होती. अर्थात त्यावेळी ती मी पाहिली नव्हती. परंतु आमच्या पत्नीच्या आग्रहाखातर या मालिकेचे सर्व भाग झी-मराठीच्या ओटीपी ॲपवर आम्ही पाहिले. आज प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या बजबजबुरीमध्ये अशी ही एक मालिका होती, याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून आज ही पोस्ट लिहीत आहे.
एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या आठ जणांची ही गोष्ट. कौटुंबिक मूल्ये काय असतात, हे या मालिकेच्या प्रत्येक भागात दिसून आले. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती कसे असावेत? त्यांचा दृष्टिकोन कसा असावा? कुटुंबातील समतोल कसा साधावा? तसेच विविध घटनांकडे तटस्थ दृष्टीने कसे पहावे? अशा बराच बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या मालिकेतील गिरीश ओक यांनी साकारलेल्या नाना देसाईंच्या भूमिकेतून मिळतात. आजच्या मालिकांमध्ये देखील कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती दाखवलेल्या आहेत. परंतु या व्यक्तिरेखेला अजूनही तोड नाही, असेच म्हणता येईल. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अर्थात घरातील सर्वांची माई यादेखील त्यांना साजेशा अशाच आहेत. घरातील सासूने कसे असावे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुकन्या कुलकर्णी यांनी साकारलेली माई देसाई यांची भूमिका. मालिकेतल्या विविध प्रसंगांमधून त्यांच्यातील आई आणि सासूचे गुण सातत्याने प्रदर्शित होतात. आजच्या मालिकांमध्ये असणारी खाष्ट सासू किंवा सातत्याने सुनेला त्रास देणारी सासू पाहिली तर सासू अशीच असते, असाही अनेकांचा भ्रम व्हावा. आणि जेव्हा माई देसाईंची भूमिका पहाल तेव्हा सासू अशी असते? का हाही प्रश्न पडावा.
या मालिकेतील मुख्य जोडपं अर्थात आदित्य आणि मेघना. मेघनाचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालेले आहे. तिचे आई-वडील विशेषता वडील अतिशय तिरसट स्वभावाचे. खरंतर अशा स्वभावाच्या माणसाबरोबर त्यांच्या पत्नीने आजवर कसे दिवस काढले असतील? असाही प्रश्न पडतो. परंतु ते देखील देसाईंच्या कुटुंबासोबत राहून हळूहळू त्यांच्या प्रेमात पडतात. आणि त्यांच्यासारखाच विचार देखील कालांतराने करू लागतात. काहीसं खलनायकी रूपाने दाखवलेलं मेघनाच्या वडिलांचं अर्थात सुरेश कुडाळकर यांचे पात्र विविध रूपांनी भरलेलं आहे. हे मालिकेच्या भागागणिक दिसून येतं. ‘बाबाजी बाबाजी’ म्हणताना ते करत असलेली कृती सातत्याने लक्षात राहते. नाना देसाईंची मुलगी अर्चना आणि तिचा नवरा सतीश हे देखील त्यांच्यासोबतच राहतात. आदर्श जावई कसा असावा? याचे उत्तर सतीशकडे पाहून देता येतं. एकंदरीतच सर्व पात्रे आपापल्या भूमिकांमध्ये उत्तम ठसा उमटवितात. कुटुंबामध्ये एकमेकांना समजून घेण्याचा दृष्टिकोन, सहकार्याची भूमिका, समस्यांच्या काळामध्ये एकमेकांना असणारा पाठिंबा, सर्वांचा सुसंवाद, मैत्री, आपुलकी या सर्व गोष्टी ध्यानात राहतात. आणि विशेष म्हणजे आपल्या मनावर प्रभाव देखील पडतात. सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी मदत देखील करतात. एखाद्या घटनेकडे आपला दृष्टिकोन आपण यातील पात्रांच्या दृष्टिकोनाशी तुलना करायला जातो. आणि एक नवी शिकवण देखील मिळते. अर्थात हे या मालिकेतील पात्रांचे आणि कथानकाचे यश आहे असेच म्हणायला हवे. आई, वडील, मुलगा, मुलगी, सून, जावई, सासू, सासरे, दीर, भावजय, नणंद, दाजी, व्याही आणि विहीन आदर्शवत नाती या मालिकेतून समोर येतात.
४०० पेक्षा अधिक भाग प्रसारित झालेली ही मालिका अजूनही ऑनलाइन विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. खरोखर काहीतरी चांगलं पहायचं असेल तर आजही या मालिकेला आणि कथानकाला पर्याय नाही, असंच म्हणता येईल.

- तुषार भ. कुटे

 

 

Monday, June 23, 2025

चॅटजीपीटीचे सीईओ 'सॅम अल्टमन' यांचा नुकताच प्रकाशित झालेला ब्लॉग: The Gentle Singularity

चॅटजीपीटीचे सीईओ 'सॅम अल्टमन' यांचा नुकताच प्रकाशित झालेला ब्लॉग. नक्की वाचा.
-----------------------------------------------------------------------------------
The Gentle Singularity

आपण आता एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथून मागे फिरणे शक्य नाही; बदलाची सुरुवात झाली आहे. मानवजात डिजिटल महा-बुद्धिमत्ता (superintelligence) तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे आणि आतापर्यंत तरी हे स्थित्यंतर वाटते तितके विचित्र नाही.
अजूनही रस्त्यांवर रोबोट्स फिरत नाहीत किंवा आपल्यापैकी बहुतेक जण दिवसभर AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) शी बोलत नाहीत. लोक आजही आजारांमुळे मरतात, आपण अजूनही सहजपणे अवकाशात जाऊ शकत नाही आणि ब्रह्मांडाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजलेल्या नाहीत.
तरीही, आपण अलीकडेच अशा प्रणाली तयार केल्या आहेत ज्या अनेक बाबतीत माणसांपेक्षा हुशार आहेत आणि त्यांचा वापर करणाऱ्या लोकांची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढवू शकतात. या कामाचा सर्वात कठीण भाग आता मागे पडला आहे; GPT-4 आणि o3 सारख्या प्रणालींपर्यंत पोहोचवणारे वैज्ञानिक शोध मिळवणे खूप कठीण होते, पण ते आपल्याला खूप पुढे घेऊन जातील.
AI जगात अनेक प्रकारे योगदान देईल, पण AI मुळे होणारी वैज्ञानिक प्रगती आणि वाढलेली उत्पादकता यांमुळे जीवनमानाच्या गुणवत्तेत प्रचंड सुधारणा होईल. भविष्य वर्तमानापेक्षा खूपच चांगले असू शकते. वैज्ञानिक प्रगती ही एकूण प्रगतीचा सर्वात मोठा चालक आहे; आपण आणखी किती काही मिळवू शकतो याचा विचार करणे खूप रोमांचक आहे.
एका मोठ्या अर्थाने, चॅट जीपीटी (ChatGPT) आतापर्यंतच्या कोणत्याही मानवापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. दररोज लाखो लोक त्यावर अवलंबून आहेत आणि अधिकाधिक महत्त्वाच्या कामांसाठी त्याचा वापर करत आहेत. यातील एक छोटीशी नवीन क्षमता खूप मोठा सकारात्मक परिणाम घडवू शकते, तर दुसरीकडे, चुकीच्या दिशेने गेलेली एक छोटीशी गोष्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचून मोठे नकारात्मक परिणाम घडवू शकते.
२०२५ मध्ये अशा एजंट्सचे आगमन झाले आहे जे खरे बौद्धिक काम करू शकतात; आता कॉम्प्युटर कोड लिहिणे पूर्वीसारखे राहणार नाही. २०२६ मध्ये कदाचित अशा प्रणाली येतील ज्या नवीन वैज्ञानिक शोध लावू शकतील. २०२७ मध्ये कदाचित असे रोबोट्स येतील जे प्रत्यक्ष जगात कामे करू शकतील.
आता अधिक लोकांना सॉफ्टवेअर आणि कला निर्माण करता येईल. पण जगाला या दोन्ही गोष्टींची अधिक गरज आहे आणि तज्ञ लोक नवीन साधनांचा स्वीकार केल्यास नवशिक्यांपेक्षा अधिक चांगले काम करू शकतील. सर्वसाधारणपणे, २०२० च्या तुलनेत २०३० मध्ये एक व्यक्ती कितीतरी अधिक काम करू शकेल, हा एक मोठा बदल असेल आणि अनेक लोक त्याचा फायदा कसा घ्यायचा हे शिकतील.
सर्वात महत्त्वाच्या बाबतीत, २०३० चे दशक कदाचित फार वेगळे नसेल. लोक अजूनही त्यांच्या कुटुंबावर प्रेम करतील, आपली सर्जनशीलता व्यक्त करतील, खेळ खेळतील आणि तलावात पोहतील.
पण तरीही, काही महत्त्वाच्या बाबतीत, २०३० चे दशक पूर्वीच्या कोणत्याही काळापेक्षा खूप वेगळे असणार आहे. आपण मानवी बुद्धिमत्तेच्या किती पुढे जाऊ शकतो हे आपल्याला माहीत नाही, पण ते लवकरच कळेल.
२०३० च्या दशकात, बुद्धिमत्ता आणि ऊर्जा—म्हणजे कल्पना आणि त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमता—मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. या दोन गोष्टींनी मानवी प्रगतीला बऱ्याच काळापासून मर्यादित ठेवले होते; मुबलक बुद्धिमत्ता आणि ऊर्जा (आणि चांगले शासन) मिळाल्यास, आपण सैद्धांतिकदृष्ट्या इतर काहीही मिळवू शकतो.
आपण आधीच अविश्वसनीय डिजिटल बुद्धिमत्तेसोबत जगत आहोत आणि सुरुवातीच्या धक्क्यानंतर, आपल्यापैकी बहुतेकांना त्याची सवय झाली आहे. AI एक सुंदर परिच्छेद लिहू शकतो या आश्चर्यातून बाहेर पडून तो एक सुंदर कादंबरी कधी लिहू शकेल, या प्रश्नाकडे आपण पटकन वळतो. जीव वाचवणारे वैद्यकीय निदान करण्याच्या क्षमतेबद्दल आश्चर्यचकित होण्यापासून ते रोगांवर उपचार कधी विकसित करू शकेल याबद्दल विचार करण्यापर्यंत, किंवा एक छोटा कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार करण्यापासून ते संपूर्ण नवीन कंपनी कधी तयार करू शकेल याबद्दल आश्चर्यचकित होण्यापर्यंत आपला प्रवास खूप वेगाने होतो. हीच 'विलक्षणता' (singularity) आहे: आश्चर्यकारक गोष्टी सामान्य होतात आणि नंतर त्या किमान अपेक्षा बनतात.
शास्त्रज्ञांकडून आपण आधीच ऐकत आहोत की AI मुळे त्यांची उत्पादकता दोन ते तीन पटींनी वाढली आहे. प्रगत AI अनेक कारणांसाठी मनोरंजक आहे, पण कदाचित सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण त्याचा उपयोग अधिक वेगाने AI संशोधन करण्यासाठी करू शकतो. आपण नवीन संगणकीय सब्सट्रेट्स, चांगले अल्गोरिदम आणि आणखी काय काय शोधू शकू. जर आपण दहा वर्षांचे संशोधन एका वर्षात किंवा एका महिन्यात करू शकलो, तर प्रगतीचा दर अर्थातच खूप वेगळा असेल.
आतापासून, आपण तयार केलेली साधने आपल्याला पुढील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी आणि अधिक चांगल्या AI प्रणाली तयार करण्यात मदत करतील. अर्थात, हे एखाद्या AI प्रणालीने स्वतःहून आपला कोड अद्ययावत करण्यासारखे नाही, परंतु तरीही ही 'स्वयं-पुनरावृत्ती सुधारणे'ची (recursive self-improvement) सुरुवातीची अवस्था आहे.
इतरही काही गोष्टी आहेत ज्या एकमेकांना चालना देत आहेत. आर्थिक मूल्य निर्मितीमुळे या शक्तिशाली AI प्रणाली चालवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग आला आहे. आणि एकमेकांना बनवू शकणारे रोबोट्स (आणि एका अर्थाने, इतर डेटा सेंटर्स बनवू शकणारे डेटा सेंटर्स) फार दूर नाहीत.
जर आपल्याला पहिले दहा लाख मानवाकृती रोबोट्स जुन्या पद्धतीने बनवावे लागले, पण त्यानंतर ते संपूर्ण पुरवठा साखळी चालवू शकले—खनिजे खोदण्यापासून ते शुद्ध करण्यापर्यंत, ट्रक चालवण्यापासून ते कारखाने चालवण्यापर्यंत—आणि त्यातून आणखी रोबोट्स, चिप फॅब्रिकेशन सुविधा, डेटा सेंटर्स इत्यादी तयार करू शकले, तर प्रगतीचा दर अर्थातच खूप वेगळा असेल.
जसजसे डेटा सेंटरचे उत्पादन स्वयंचलित होईल, तसतशी बुद्धिमत्तेची किंमत विजेच्या किमतीच्या जवळ पोहोचेल. (ChatGPT च्या एका प्रश्नासाठी किती ऊर्जा लागते याबद्दल लोकांना अनेकदा उत्सुकता असते; सरासरी प्रश्नासाठी सुमारे ०.३४ वॅट-तास ऊर्जा लागते, जी एक ओव्हन एका सेकंदापेक्षा थोडा जास्त वेळ किंवा उच्च-कार्यक्षमतेचा लाइटबल्ब काही मिनिटे वापरतो. यासाठी सुमारे ०.००००८५ गॅलन पाणी देखील लागते; म्हणजे चमचाचा साधारण पंधरावा भाग.)
तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढतच राहील आणि मानव जवळजवळ कोणत्याही गोष्टीशी जुळवून घेण्यास सक्षम आहे हे सत्य कायम राहील. नोकऱ्यांचे संपूर्ण वर्ग नाहीसे होण्यासारखे काही कठीण भाग असतील, पण दुसरीकडे जग इतक्या वेगाने श्रीमंत होत असेल की आपण अशा नवीन धोरणात्मक कल्पनांवर गंभीरपणे विचार करू शकू ज्यांचा आपण पूर्वी कधी विचारही करू शकत नव्हतो. आपण कदाचित एकाच वेळी नवीन सामाजिक करार स्वीकारणार नाही, पण काही दशकांनंतर मागे वळून पाहिल्यावर, हळूहळू झालेले बदल काहीतरी मोठे ठरतील.
इतिहास जर मार्गदर्शक असेल, तर आपण करण्यासाठी नवीन गोष्टी आणि हव्या असलेल्या नवीन गोष्टी शोधून काढू आणि नवीन साधने पटकन आत्मसात करू (औद्योगिक क्रांतीनंतर नोकरीतील बदल हे त्याचे अलीकडील उत्तम उदाहरण आहे). अपेक्षा वाढतील, पण क्षमताही तितक्याच वेगाने वाढतील आणि आपल्या सर्वांना अधिक चांगल्या गोष्टी मिळतील. आपण एकमेकांसाठी अधिकाधिक अद्भुत गोष्टी तयार करू. AI च्या तुलनेत माणसांकडे एक दीर्घकालीन, महत्त्वाचा आणि जिज्ञासू फायदा आहे: आपण इतर लोकांबद्दल आणि ते काय विचार करतात व करतात याबद्दल काळजी घेण्यासाठी बनलेले आहोत, आणि आपल्याला मशीनची फारशी पर्वा नाही.
एक हजार वर्षांपूर्वीचा एक शेतकरी आज आपल्यापैकी बरेच जण जे करतात ते पाहून म्हणेल की आपल्याकडे 'खोट्या' नोकऱ्या आहेत आणि आपल्याकडे भरपूर अन्न आणि अकल्पनीय चैनीच्या वस्तू असल्यामुळे आपण फक्त मनोरंजनासाठी खेळ खेळत आहोत. मला आशा आहे की आपण भविष्यातील एक हजार वर्षांनंतरच्या नोकऱ्यांकडे पाहून त्यांना 'खोट्या' नोकऱ्या समजू, आणि मला खात्री आहे की त्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांना त्या खूप महत्त्वाच्या आणि समाधानकारक वाटतील.
नवीन आश्चर्ये साध्य करण्याचा दर प्रचंड असेल. २०३५ पर्यंत आपण काय शोधून काढले असेल याची आज कल्पना करणेही कठीण आहे; कदाचित आपण एका वर्षी उच्च-ऊर्जा भौतिकशास्त्राची समस्या सोडवून पुढच्या वर्षी अंतराळ वसाहतीची सुरुवात करू; किंवा एका वर्षी मटेरियल सायन्समधील मोठ्या प्रगतीपासून पुढच्या वर्षी खऱ्या अर्थाने उच्च-बँडविड्थ ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेसपर्यंत पोहोचू. बरेच लोक आपले जीवन पूर्वीसारखेच जगणे पसंत करतील, पण किमान काही लोक "कनेक्ट" होण्याचा निर्णय घेतील.
पुढे पाहता, हे समजायला कठीण वाटते. पण कदाचित हे जगत असताना ते प्रभावी पण हाताळण्यायोग्य वाटेल. सापेक्षतेच्या दृष्टिकोनातून, 'विलक्षणता' (singularity) हळूहळू घडते आणि एकत्रीकरण हळूहळू होते. आपण घातांकीय तांत्रिक प्रगतीच्या लांब वळणावर चढत आहोत; पुढे पाहताना ते नेहमीच उभे दिसते आणि मागे पाहताना सपाट, पण तो एक सलग वक्र आहे. (२०२० चा विचार करा, आणि २०२५ पर्यंत AGI च्या जवळ पोहोचण्यासारखे काहीतरी ऐकायला कसे वाटले असते, याउलट गेल्या ५ वर्षात प्रत्यक्षात काय घडले आहे.)
मोठ्या फायद्यांसोबतच गंभीर आव्हानांनाही तोंड द्यायचे आहे. आपल्याला सुरक्षिततेच्या समस्या तांत्रिक आणि सामाजिक दृष्ट्या सोडवाव्या लागतील, पण मग आर्थिक परिणामांमुळे महा-बुद्धिमत्तेचा (superintelligence) व्यापक प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग कदाचित असा असेल:
-  संरेखन समस्या सोडवणे (Solve the alignment problem): याचा अर्थ, आपण AI प्रणालींना आपल्या एकत्रित इच्छेनुसार दीर्घकाळात शिकण्यास आणि कार्य करण्यास शिकवू शकतो याची खात्री करणे. (सोशल मीडिया फीड्स हे चुकीच्या संरेखनाचे (misaligned AI) उदाहरण आहे; ते चालवणारे अल्गोरिदम आपल्याला स्क्रोल करत ठेवण्यात अविश्वसनीय आहेत आणि तुमच्या अल्पकालीन प्राधान्यांना स्पष्टपणे समजतात, पण ते तुमच्या दीर्घकालीन प्राधान्यांवर मात करणाऱ्या तुमच्या मेंदूतील काहीतरी गोष्टीचा फायदा घेऊन हे करतात).
-  महा-बुद्धिमत्ता स्वस्त आणि व्यापकपणे उपलब्ध करणे: त्यानंतर, महा-बुद्धिमत्ता स्वस्त, व्यापकपणे उपलब्ध करणे आणि ती कोणत्याही एका व्यक्ती, कंपनी किंवा देशाकडे जास्त केंद्रित होऊ न देण्यावर लक्ष केंद्रित करणे. समाज लवचिक, सर्जनशील आणि पटकन जुळवून घेणारा आहे. जर आपण लोकांच्या सामूहिक इच्छा आणि शहाणपणाचा उपयोग करू शकलो, तर जरी आपण अनेक चुका करू आणि काही गोष्टी खूप चुकीच्या होतील, तरीही आपण शिकू आणि पटकन जुळवून घेऊ आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी आणि कमीत कमी तोटा होण्यासाठी करू शकू. वापरकर्त्यांना समाजाला ठरवाव्या लागणाऱ्या व्यापक सीमांमध्ये बरेच स्वातंत्र्य देणे खूप महत्त्वाचे वाटते. या व्यापक सीमा काय आहेत आणि आपण सामूहिक संरेखन कसे परिभाषित करतो यावर जग जितक्या लवकर संभाषण सुरू करेल, तितके चांगले.
आपण (फक्त ओपनएआय नाही, तर संपूर्ण उद्योग) जगासाठी एक मेंदू तयार करत आहोत. तो अत्यंत वैयक्तिकृत आणि प्रत्येकासाठी वापरण्यास सोपा असेल; आपल्याला चांगल्या कल्पनांनीच मर्यादा येतील. बऱ्याच काळापासून, स्टार्टअप उद्योगातील तांत्रिक लोकांनी "आयडिया गाइज" (idea guys) ची चेष्टा केली आहे; असे लोक ज्यांच्याकडे एक कल्पना होती आणि ती तयार करण्यासाठी ते टीम शोधत होते. आता मला असे दिसते की त्यांचे चांगले दिवस येणार आहेत.
ओपनएआय (OpenAI) आता बऱ्याच गोष्टी आहे, पण इतर कशाच्याही आधी, आम्ही एक महा-बुद्धिमत्ता संशोधन कंपनी आहोत. आमच्यासमोर बरेच काम आहे, पण आता आमच्यासमोरील बहुतेक मार्ग प्रकाशमान झाला आहे आणि अंधारलेले भाग वेगाने कमी होत आहेत. आम्हाला जे करायला मिळत आहे त्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत.
मोजमाप करता येणार नाही इतकी स्वस्त बुद्धिमत्ता आवाक्यात आहे. हे म्हणायला वेडेपणाचे वाटेल, पण जर आम्ही तुम्हाला २०२० मध्ये सांगितले असते की आम्ही आज जिथे आहोत तिथे पोहोचू, तर ते २०३० बद्दलच्या आमच्या सध्याच्या अंदाजांपेक्षा अधिक वेडेपणाचे वाटले असते.
आशा आहे की आपण महा-बुद्धिमत्तेच्या दिशेने सहजतेने, घातांकीय आणि शांतपणे प्रगती करू.


 

Wednesday, June 18, 2025

भविष्य नावाचा इतिहास

भूतकाळातील घटनांकडे बघता आणि वर्तमानातील वेगाने बदलणाऱ्या घटनांचा मागवा घेतल्यास भविष्य कसे असेल, याचा थोडा का होईना आपण अंदाज घेऊ शकतो. तंत्रज्ञानातील बदल आणि सामाजिक बदल हे प्रामुख्याने भविष्यामध्ये जाणून घेण्यासारखे असतील. याच पार्श्वभूमीवर आधारित असलेली ही कादंबरी “भविष्य नावाचा इतिहास”.

कादंबरीच्या मलपृष्ठावर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जागतिक अर्थव्यवस्था एकाच कॉर्पोरेटच्या हातात जात मक्तेदारीयुक्त ज्ञान विज्ञानाचा स्फोट होईल तेव्हा मानवी भावभावना नातेसंबंध नीती मूल्ये आणि जीवन संघर्ष कसे झपाट्याने बदलतील आणि कोणत्याही स्थितीला सरावू शकणारा माणूस हे भयावह परिवर्तन अंगवळणी पाडून जगण्याचेच मार्ग कसा बदलेल, याचे प्रत्ययकारी दर्शन या कादंबरीत घडते.

कादंबरीचा एकंदरीत सारांश वर दिल्याप्रमाणेच आहे. परंतु त्याचे दर्शन प्रत्ययकारी आहे की नाही याबद्दल थोडासा गोंधळ जाणवतो. जगातील अर्थव्यवस्थेवर आणि एका कारणाने राजकीय व्यवस्थेवर देखील एकाच कंपनीचे राज्य आले तर काय होईल हे कादंबरीतील विविध घटनांमधून आपल्याला समजते. शिवाय सामाजिक मूल्य आज ज्या पद्धतीने बदलत आहेत तशीच बदलत राहिली तर भविष्यात ‘मूल्य’ या शब्दालाच काही मूल्य राहणार नाही. अशा घटना देखील कादंबरीमध्ये मांडलेल्या आहेत. या पुस्तकाचा विषय उत्तम आहे. परंतु अनेक ठिकाणी सुसूत्रता जाणवत नाही. दोन घटनांमधील संबंध अनेक ठिकाणी तुटल्यासारखा वाटतो. बाकी विषय उत्तम. भविष्यातील घटनांवर विचार मंथन करायला लावणारी ही कादंबरी आहे, असं वाटतं.



Thursday, June 12, 2025

“नंबर्स” संख्यांचं अद्भुत विश्व

अच्युत गोडबोले सहलिखित “गणिती” हे पहिले पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचनात आले. गणितातील बहुतांश संकल्पना अतिशय उत्तमरीत्या या पुस्तकांमध्ये मांडलेल्या होत्या. त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये त्यांचे सहलिखित पुढचे पुस्तक “स्टॅटिस्टिक्स” अर्थात संख्याशास्त्र हे देखील वाचुन झाले. डेटा सायन्सचा अभ्यास करत असल्याने या पुस्तकाची उपयुक्तता माझ्यासाठी खूप काही होती. परंतु या पुस्तकातील तांत्रिक संज्ञा अजूनही इंग्रजाळलेल्या भासल्या. याच शृंखलेतील गणित विषयावर लिहिले गेलेले ‘नंबर्स’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.
गणित आणि संख्याशास्त्र यामध्ये नक्की काय फरक आहे? याचे उत्तर हे पुस्तक देते. सुरुवातीला गणिती या पुस्तकांमधील बऱ्याच संकल्पना पुन्हा एकदा वाचनामध्ये आल्या. परंतु खऱ्याखुऱ्या अर्थाने नंबर्सची सुरुवात झाल्यानंतर हे पुस्तक उत्तमरीत्या संख्यांची लय पकडते. संख्यांचा अद्भुत विश्व आपल्यासमोर उभे करते. शून्यापासून अनंतापर्यंतच्या संख्या तसेच गणिती संकल्पनांचा अभ्यासपूर्ण आणि रंजक वेध घेताना बऱ्याचदा आपल्या मेंदूचा कस देखील लागतो. पण गणित सोपे आहे, ही भावना मनात ठेवली तर सर्वच संकल्पना सहजपणे समजायला लागतात. इन्फिनिटी, पाय, यूलर्स समीकरण, प्राईम नंबर, फिबोनाची क्रमिका, लॉगॅरिथम अशा विविध संकल्पना उत्तमरीत्या या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. गणिताला अनुभवाची आणि उपयोगाची जोड दिली तर ते लवकर समजते. हेच या पुस्तकाने सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे शुभ आणि अशुभ संख्या नावाच्या प्रकरणांमध्ये मनुष्य संख्यांना कसा घाबरतो याचे रंजक वर्णन आपल्याला वाचायला मिळते. जगभरामध्ये अनेक संख्या अशुभ मानल्या जातात. अर्थात अनेकांच्या अनुभवातून हे आलेले आहे. यातूनच न्यूमरोलॉजी या विषयाचा उदय झाला. आजही भारतामध्ये लाखो लोक यावर विश्वास ठेवतात. एका अर्थाने गणिताला देखील अंधश्रद्धेमध्ये ओढण्याचा हा प्रकार आहे.
संख्यांच्या गमतीजमती आणि रंजक गणिती कोडी ही दोन प्रकरणे अतिशय सुरेख वाटली. कालीन रूम संख्या कापरेकर स्थिरांक, अपरिमेय संख्या, नऊ ची गंमत, ७२ चा नियम, २२ नावाची गुणसंख्या, पायथागोरिअन त्रिकुट, मित्र संख्या, परिपूर्ण संख्या, पास्कल त्रिकोण, रामानुजन-हार्डी नंबर, जादूचे चौकोन, कटपयादी पद्धत, गणेश गुणाकार अशा विविध रंजक गणिती गोष्टी या प्रकरणांमध्ये आपल्याला खिळवून ठेवतात. रंजक गणिती कोडी ही आपल्याला मेंदूला चालना द्यायला लावतात. अनेक गोष्टींमध्ये गणित विचार करायला भाग पाडतं. अर्थात जगाची एकंदरीत रचनाच गणितावर आधारलेली आहे, हे आपल्याला समजून घेता येतं.
डॉ. विद्यागौरी प्रयाग आणि अच्युत गोडबोले यांनी महत्प्रयासाने या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. हे प्रत्येक प्रकरणामध्ये दिसून येतं. गणित आवडणाऱ्यांसाठी आणि विशेषत: गणित न आवडणाऱ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच वाचनीय असंच आहे!

--- तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक_परीक्षण #गणित #इतिहास


 

खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेणारा लघुग्रह: २०२४ YR4

खगोलशास्त्रज्ञांच्या आणि अवकाशप्रेमींच्या नजरा सध्या '२०२४ YR4' नावाच्या एका लघुग्रहावर खिळल्या आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये शोध लागलेला हा लघुग्रह सुरुवातीला पृथ्वीसाठी संभाव्य धोका मानला जात होता, मात्र आता त्याच्याबद्दलची अधिक अचूक माहिती समोर आली आहे.

शोध आणि वर्गीकरण

२७ डिसेंबर २०२४ रोजी चिलीमधील 'अ‍ॅस्टरॉइड टेरेस्ट्रियल-इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टीम' (ATLAS) दुर्बिणीने या लघुग्रहाचा शोध लावला. '२०२४ YR4' हा अपोलो गटातील पृथ्वी-जवळचा लघुग्रह (Near-Earth Asteroid) म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. अपोलो गटातील लघुग्रह सूर्याभोवती फिरताना पृथ्वीची कक्षा ओलांडतात, ज्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाते.

आकार आणि रचना

सुरुवातीला या लघुग्रहाचा आकार ४० ते ९० मीटरच्या दरम्यान अंदाजित करण्यात आला होता. मात्र, नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपद्वारे (JWST) केलेल्या अधिक अचूक निरीक्षणानंतर, त्याचा व्यास ५३ ते ६७ मीटर (सुमारे १७४ ते २२० फूट) असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा आकार अंदाजे एका १५ मजली इमारतीएवढा आहे. हा लघुग्रह 'एस-टाइप' (S-type) प्रकारचा असून तो सिलिकेट्स आणि निकल-लोह यांसारख्या खडकाळ पदार्थांनी बनलेला असण्याची शक्यता आहे.

पृथ्वीला धोका?

'२०२४ YR4' च्या शोधानंतर, त्याच्या कक्षेच्या सुरुवातीच्या गणनेनुसार २२ डिसेंबर २०३२ रोजी त्याची पृथ्वीवर आदळण्याची एक अल्पशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यामुळे त्याला धोक्याची पातळी दर्शवणाऱ्या टोरिनो स्केलवर (Torino Scale) सुरुवातीला '३' मानांकन मिळाले होते, ज्यामुळे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले.

मात्र, त्यानंतरच्या सततच्या निरीक्षण आणि माहितीच्या विश्लेषणानंतर, नासाने स्पष्ट केले आहे की हा लघुग्रह २०३२ मध्ये किंवा त्यानंतर पृथ्वीसाठी कोणताही महत्त्वपूर्ण धोका नाही. त्याच्या कक्षेबद्दल अधिक अचूक माहिती मिळाल्याने पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे.

चंद्रावर आदळण्याची शक्यता

पृथ्वीला धोका नसला तरी, '२०२४ YR4' आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. २२ डिसेंबर २०३२ रोजी हा लघुग्रह चंद्रावर आदळण्याची एक लहान पण लक्षणीय शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. ताज्या माहितीनुसार, ही शक्यता सुमारे ४.३% आहे. जरी हा लघुग्रह चंद्रावर आदळला तरी त्याचा चंद्राच्या कक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे नासाने स्पष्ट केले आहे.

वैज्ञानिक महत्त्व

'२०२४ YR4' ने पृथ्वीला कोणताही धोका निर्माण केला नसला तरी, या लघुग्रहाने 'प्लॅनेटरी डिफेन्स' म्हणजेच 'ग्रहीय संरक्षण' प्रणालीच्या तयारीसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली. एखाद्या संभाव्य धोकादायक खगोलीय वस्तूचा शोध लागल्यापासून तिच्यावर लक्ष ठेवणे, तिच्या कक्षेचे विश्लेषण करणे आणि धोक्याचे मूल्यांकन करणे या सर्व प्रक्रियांचा सराव यानिमित्ताने झाला.

सध्या हा लघुग्रह पृथ्वीपासून दूर गेला असून तो २०२८ पर्यंत दुर्बिणींच्या टप्प्यात येणार नाही. त्यानंतर शास्त्रज्ञ त्याच्यावर पुन्हा निरीक्षणे केंद्रित करतील, ज्यामुळे त्याच्या कक्षेबद्दल आणि चंद्राजवळून जाण्याच्या मार्गाबद्दल अधिक अचूक माहिती मिळू शकेल.

संकलन - तुषार भ. कुटे.

साहित्य अकादमी आणि मराठी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्य अकादमीने भारतातील प्रमुख २२ भाषांमधील सर्वोत्तम भाषांतरित साहित्यकृतींसाठी पुरस्कार जाहीर केले होते. अर्थात यावर्षी देखील मराठी भाषेतील भाषांतरित पुस्तकाला पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.


साहित्य अकादमीच्या पुरस्कार यादीतील तक्त्याप्रमाणे चौथ्या रकाण्यांमध्ये भाषांतरित पुस्तक मूळ कोणत्या भाषेमध्ये लिहिले गेलेले आहे, याची माहिती दिलेली आहे. अर्थात नेहमीप्रमाणे सर्वाधिक पुस्तके इंग्रजीमधून भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेली दिसतात. आणि सर्वाधिक वाचक संख्या असल्याने हिंदी भाषा द्वितीय क्रमांकावर आहे. असामी सारख्या भाषेतून देखील तब्बल दोन पुस्तके अन्य भाषांमध्ये भाषांतरित झाल्याची दिसतात. याशिवाय कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती या भाषेतील साहित्यकृतीदेखील अन्य भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या आहेत. दुःखाची गोष्ट म्हणजे या यादीमध्ये एकही पुस्तक मराठी नाही! म्हणजे मराठीतून अन्य भाषेमध्ये भाषांतरित झालेल्या एकाही पुस्तकाला पुरस्कार मिळालेला नाही. खरंतर ही खेदाची बाब आहे. मराठीमध्ये उत्तम उत्तम कलाकृती तयार होत नाहीत का?? हा प्रश्न पडतो. आणि झाल्या तरी त्यांचे भाषांतर करण्याचे कष्ट कोणी घेत नाही का? या प्रश्नाचे उत्तर देखील शोधणे गरजेचे आहे. मागच्या दशकभरापासून जगभरातील बहुतांश भाषांमधील पुस्तके मराठीमध्ये भाषांतरित होत आहेत. एकंदरीत अशा पुस्तकांचा प्रवाह पाहिला तर भाषांतरित पुस्तके ५०% आणि मूळ पुस्तके ५०% असावीत अशी तुलना करता येईल. मूळ मराठी भाषेत लिहिलेल्या पुस्तकांचे अन्य भाषेत तितक्या प्रमाणात भाषांतर होताना दिसत नाही. एका अर्थाने आपल्या अभिजात भाषेतील साहित्य अन्य भाषेमध्ये प्रसारित होत नाही. यावर मराठी सारस्वतांनी सखोल विचार करणे गरजेचे आहे. आपल्या भाषेतील संस्कृतीत साहित्य परंपरा अन्य भाषिकांना सांगायचे असल्यास साहित्यकृती हा सर्वोत्तम मार्ग असतो. परंतु त्याचा वेग मंदावलेला दिसतो. मराठी संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हा एक मार्ग आहे. परंतु त्याच्या प्रगतीची चाके अजूनही वेगाने धावताना दिसत नाहीत.

---- तुषार भ. कुटे