Tuesday, October 15, 2024

वाचनवेडी ज्ञानू

जवळपास दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीला कांजण्या झाल्या होत्या म्हणून आम्ही तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तपासून निदान केले, औषधे दिली आणि तिला सांगितले, 'आता आठवडाभर आराम करायचा आणि छान टीव्ही बघत बसायचं'. यावर तिने डॉक्टरांना सांगितले की, 'आमच्याकडे टीव्ही नाही मी पुस्तके वाचत असते'. तिच्या बोलण्याने डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कदाचित त्यांना आजवर असं कोणीही भेटलं नसेल की ज्याच्या घरी टीव्ही नाही आणि घरातील लहान मुल पुस्तके वाचत असते. डॉक्टरांनी देखील शाबासकीची थाप ज्ञानेश्वरीला दिली.
ती दोन वर्षाची असल्यापासून तिची आई तिला विविध पुस्तकांमधील गोष्टी वाचून दाखवायची. तेव्हाच तिला बऱ्याच गोष्टी पाठ झाल्या होत्या. तीला जेव्हापासून अक्षर ओळख झाली तेव्हापासूनच हळूहळू वाचायची गोडी वाढत गेली. घराच्या भिंती पुस्तकांनी भरलेल्या होत्या. शिवाय तिच्या आईला आणि मलाही वाचनाची आवड असल्याने तिच्या आजूबाजूला तसं वातावरण तयार होत होतं. आई-बाबा बहुतांश वेळा वाचताना दिसायचे. त्यामुळे तिला देखील पुस्तके वाचनाची गोडी लागत गेली. शिवाय मातृभाषेतूनच शिकत असल्याने तिला अजूनच सोपे झाले. मग आम्ही देखील तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करू लागलो. तिला पुस्तकांच्या दुकानात घेऊन जाऊ लागलो. पुस्तक प्रदर्शनामध्ये बालसाहित्य दाखवू लागलो. ती देखील मनसोक्तपणे पुस्तकांची खरेदी करत होती आणि सर्व पुस्तके वाचून काढत होती. आज आमच्या पुस्तकांच्या कपाटामध्ये तिची देखील शंभरहून अधिक पुस्तके आहेत. तिच्या कपड्यांइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक खरेदी ही पुस्तकांची होते!
घरामध्ये टीव्ही नसल्याचा हा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. विरंगुळा म्हणून ती पुस्तके वाचू लागली. तिला कधीकधी काही शब्द समजायचे नाहीत. मग ती आम्हाला विचारायची. यातून तिचा शब्दसंग्रह देखील वाढत गेला. आजही ती कधीकधी असे विशिष्ट शब्द वाक्यांमध्ये प्रयोग करून आमच्याशी बोलत असते. अनेकदा तिची वाक्यरचना ऐकून त्रयस्थ व्यक्ती देखील आश्चर्यचकित होते. ही सर्व वाचनाची किमया आहे. अनेकांना असंही वाटतं की, या मुलीला किती अभ्यास असतो. ती सदानकदा अभ्यासच करत असते. आजकाल कोणतीच मुले अवांतर वाचत नसल्याने बहुतांश जणांचा हा भ्रम होणं साहजिकच आहे!
बाहेर कुठेही फिरायला गेलो तरी तिच्या पिशवीमध्ये तीन-चार पुस्तके असतातच. प्रवासात गाडीमध्ये देखील ती पुस्तके वाचत बसते. रोज रात्री झोपताना पुस्तक वाचन करणे, हाच तिचा सर्वात मोठा छंद आहे. आम्ही दोघेही वाचत असलो की ती देखील आमच्यामध्ये सामील होते. कोणते पुस्तक वाचले आहे, कोणते वाचले नाही, तसेच कोणत्या पुस्तकात कोणती गोष्ट आहे, हे देखील तिच्या व्यवस्थित ध्यानात आहे.
यावर्षीपासून तर ती पुस्तकांवरचा आपला अभिप्राय देखील द्यायला लागली आहे. तिची सर्जनशीलता विकसित व्हायला लागली आहे. अर्थात वाचनामुळेच ती आता स्वतः स्वतःच्या मनाने लिहू देखील लागली आहे! मागच्या काही महिन्यात तिने स्वरचित कविता देखील केल्या आहेत. स्वतःच्या कथा कवितांचे पुस्तक तिच्या आईने प्रकाशित करावे, अशी देखील तिची मनोकामना आहे. तिच्या वाचन वेडाचीच ही परिणीती आहे असे आम्हाला वाटते.
मागच्या नऊ वर्षांपासून आम्ही वाचन प्रेरणा दिनी विविध शाळांमध्ये पुस्तके वाटपाचा कार्यक्रम करतो. ज्ञानेश्वरी एक वर्षाची असल्यापासून तिला देखील आम्ही या कार्यक्रमांमध्ये नेत असतो. यातून तिला पुस्तकांचे वाचनाचे महत्त्व समजते. त्यातूनच विचारांची आणि मनाची समृद्धी देखील येते. याची जाणीव तिला हळूहळू होऊ लागली आहे.
आजच्या वाचन प्रेरणा दिनी तिच्या वाचनवेडाची ओळख व्हावी आणि इतरांनाही प्रेरणा मिळावी...  हाच या पोस्टचा मुख्य उद्देश.
















 

Monday, October 14, 2024

रवी आमले यांची मुलाखत

ज्येष्ठ मराठी लेखक, पत्रकार व संपादक श्री. रवी आमले यांची “रॉ - भारतीय गुप्तचर संस्थेची गुढगाथा”, “प्रोपगंडा” आणि “परकीय हात” ही पुस्तके प्रामुख्याने सर्वांना सुपरिचित आहेत. ही पुस्तके  वाचताना त्यांचा या विषयांवरील सखोल अभ्यास ध्यानात येतो. ‘बुकविश्व’च्या युट्युब पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांची पुनश्च एकदा ‘बुकविश्व’च्या स्टुडिओमध्ये भेट झाली. मराठी लेखक श्री. चेतन कोळी यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. ही आम्ही लाईव्ह बघितली. भारताची गुप्तचर संस्था “रॉ” याविषयी ते भरभरून बोलले, सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेली गुपिते देखील त्यांनी उघड केली, हेरांच्या कहाण्या सांगितल्या….. सर्व काही अद्भुत होतं. यातून लेखकाला पुस्तक लिहिण्यासाठी किती सखोल अभ्यास करावा लागतो, हे देखील ध्यानात आले. त्यांची पुस्तके म्हणजे गुप्तहेरांसाठी संदर्भग्रंथ ठरावी अशीच आहेत.

बुकविश्वच्या या मुलाखतीतून भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात अधिका-यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणांस भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे दर्शन रवी आमले घडवतात...

ही मुलाखत पहायला आणि बुकविश्वच्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका :


लिंक: https://youtu.be/D7s2gfZXU20

 


 



Friday, October 11, 2024

फुलवंती

पेशवेकाळातील एका लग्नाच्या बोलणीतील दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. वर पक्षाला हुंड्यामध्ये काहीही नकोय. पण अखंड हिंदुस्तानात गाजत असलेल्या फुलवंतीचा कलाविष्कार आपल्या इथे व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. मग शोध सुरू होतो फुलवंतीचा. अगदी दिल्लीच्या दरबारालाही वाट पाहायला लावणारी फुलवंती आपला नृत्याविष्कार इतक्या कलात्मकतेने सादर करते की बघणाऱ्यांच्या डोळ्याच्या पापण्याही लवत नाहीत. पूर्ण हिंदुस्थानामध्ये ती एकमेवाद्वितीय अशी नृत्यांगना आहे, जीला कुणाचीच तोड नाही.
अखेरीस पुण्याचे नाव ऐकल्याने ती पेशव्यांच्या पुण्यामध्ये यायला तयार होते. अर्थात ज्या मस्तानीच्या पायाची धूळ शनिवार वाड्याला लागलेली आहे, तिथेच तिला देखील आपले नृत्य सादर करायचे असते. इथून कथेची खरी सुरुवात होते. फुलवंती पुण्यामध्ये पोहोचते. पोहोचण्यापूर्वीच तिची पेशवे दरबारातील प्रकांड पंडित आणि धर्मशास्त्राचे सखोल ज्ञान असणाऱ्या वेंकटधारी नरसिंहशास्त्री यांच्याशी गाठ पडते. कदाचित पहिल्याच दृष्टीमध्ये ती नकळतपणे त्यांच्याकडे आकर्षित देखील होते. शनिवारवाड्यामध्ये नृत्य सादर करत असताना याच शास्त्रींकडून फुलवंतीचा अपमान केला जातो आणि सुरू होतो श्रेष्ठत्वाचा आणि अहंकाराचा खेळ. एका बाजूला धर्मशास्त्राचे महापंडित तर दुसऱ्या बाजूला जिला कोणीही हरवू शकत नाही, तिच्या कलेमध्ये उणीवही काढू शकत नाही, अशी फुलवंती. दोघेही एकमेकांचे आव्हान स्वीकारतात. दोघांपैकी कोण श्रेष्ठ? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाच्या उत्तरार्धात सापडते.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट. महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून रचलेली ही एक कथा आहे. प्रेम, त्याग, अहंकार, गर्व, अशा विविध भावनांचे चित्रण या कथेतून समोर येते. आणि अंतिमतः एक विलक्षण कहानी अनुभवल्याची भावना रसिकांना मिळते. हेच या चित्रपटाचे यश आहे. स्नेहल तरडे यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच अनुभव यशस्वी झाल्याचे दिसते. एकंदर चित्रपट पाहताना दिग्दर्शक नवखा आहे, असे कुठेही भासत नाही. अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमी असलेला भव्यदिव्यपणा या चित्रपटात ठासून भरलेला आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिमता जाणवत नाही. प्राजक्ता माळीचे काम तर उत्कृष्टच. या चित्रपटाद्वारे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तीच मराठीतील सर्वश्रेष्ठ नृत्यांगना आहे. बऱ्याचदा असे देखील जाणवतं की फुलवंतीची भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली असावी. अर्थात तिला फुलवंती अगदी अचूक समजल्याचे दिसते.  
शीर्षक गीत ‘फुलवंती’ आणि ‘मदनमंजिरी’ या दोन्ही गाण्यांमध्ये तिने जीव ओतून कला सादर केल्याचे दिसते. कदाचित तिचा आजवरचा हा सर्वोत्तम चित्रपट असावा. तिच्या व्यतिरिक्त गश्मीर महाजनी, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, चिन्मयी सुमित या सर्वांचीच कामे उत्कृष्ट झालेली आहेत. खरं सांगायचं तर दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी लक्ष्मीबाईंची भूमिका दुसऱ्या कोणत्यातरी अभिनेत्रीला द्यायला हवी होती. त्यांच्या भूमिकेमध्ये नैसर्गिकता जाणवत नाही. शिवाय पेशव्यांच्या भूमिकेत क्षितिज दाते फारसा उठून दिसत नाही. कथा अतिशय सूत्रबद्धतेने पडद्यावर साकारलेली दिसते. यावर्षीच्या चित्रपटांपैकी एक उत्तम चित्रपट आहे, असे ‘फुलवंती’ला म्हणता येईल.
चित्रपटातील तीनही गाणी लक्षात राहतात आणि गुणगुणावीशी वाटतात. नृत्यदिग्दर्शकाची कमाल पडद्यावर पाहायला मजा येते. हास्यजत्रेतले ‘सहा पुणेकर’ पडद्यावर गंभीर भूमिकेत असले तरी त्यांना पाहिल्यावर चेहऱ्यावर नकळत स्मित हास्य उमटते.
एकंदरीत पहिल्या दृश्यापासूनच चित्रपट खिळवून ठेवतो. कदाचित एकापेक्षा अधिक वेळा देखील आपण तो निश्चित पाहू शकतो. असा उत्तम चित्रपट नक्कीच चुकवू नका.

— तुषार भ. कुटे. 




Thursday, October 3, 2024

मी साउथ इंडियन?

पूर्ण भारतभरातून विविध प्रशिक्षणार्थी माझ्या एका प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. तीन आठवड्यांच्या या कार्यक्रमात ती पहिला आठवडा संपला. बहुतांश विद्यार्थी आजवर झालेल्या एकंदरीत प्रशिक्षणावर चांगलेच खुश होते. पहिल्या दिवशी माझ्याशी बोलायला घाबरणारे काही विद्यार्थी आता धीटपणे बोलत होते आणि प्रश्नही विचारत होते. अशातीलच एक जण त्या दिवशी मला येऊन भेटला. त्याने इंग्रजीतून विचारले,
“सर तुम्ही साउथ इंडियन आहात का?”
मी त्याला स्मितहास्य करत उत्तर दिले,” नाही मी पुण्याचाच आहे!”
मला त्याच्या या प्रश्नामागचे गमक लक्षात आले. मागच्या आठवडाभरात मी एकदाही हिंदी भाषेचा कुठेही वापर केला नव्हता. पूर्ण प्रशिक्षण शंभर टक्के इंग्रजीमध्ये पार पडले होते. प्रत्येक मुलाला त्यांच्या भाषेतील प्रश्नाला इंग्रजीमध्ये तर्कशुद्ध उत्तरे दिली होती. कदाचित याचमुळे त्याला मी साउथ इंडियन आहे का, हा प्रश्न पडला असावा.
खरंतर केवळ उत्तर भारतीय लोकच स्वतःची भाषा भारतभरात मुक्तपणे वापरतात. आणि महाराष्ट्रात मात्र आपली मराठी सोडून ही भाषा सहजपणे स्वीकारणारे करोडो लोक अस्तित्वात आहेत. याउलट दक्षिण भारतीय त्यांची भाषा आणि इंग्रजी यांचाच प्रामुख्याने वापर करतात. इतरांकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. कदाचित याच कारणास्तव त्यांच्या ज्ञानाची पातळी इतरांपेक्षा बऱ्यापैकी वरचढ आहे. ते सुशिक्षित देखील आहेत. ही गोष्ट आपल्या लोकांना कधी समजणार देव जाणे. 

 --- तुषार भ. कुटे

मदनमंजिरी

प्राजक्ता माळी अभिनित 'फुलवंती' चित्रपटाचा ट्रेलर मागच्या आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला आणि तो वेगाने समाजमाध्यमांवर सामायिक होऊ लागला. या चित्रपटातील गाणी देखील सर्वत्र बघायला मिळत आहेत. स्वतः प्राजक्ताने ही गाणी रील स्वरूपात तिच्या सोशल अकाउंट्सवर सामायिक केलेली आहेत. या गाण्यांमधील प्रामुख्याने "मदनमंजिरी" ही लावणी मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसते.  
लावणी हा मराठी नृत्य प्रकारांतील अविभाज्य घटक आहे. कित्येक दशकांपासून मराठी चित्रपटांमध्ये लावणी पाहण्यात येते. अगदी अलीकडच्या काळात देखील अनेक चित्रपटांमध्ये मराठी सिनेतारकांनी उत्तम उत्तम मराठी लावण्या सादर केल्या होत्या. परंतु फुलवंती चित्रपटातील प्राजक्ताची ही लावणी बघितली तर या नृत्यप्रकारास तिने अतिशय बारकाव्याने सादर केल्याचे दिसते. आधुनिक काळातील लावण्या ह्या काही कलाकारांमुळे अश्लीलतेकडे झुकत असल्याच्या दिसून येतात. परंतु मराठी भाषा आणि संस्कृतीची उत्तम जाण असलेल्या प्राजक्ताने या लावणी मध्ये आपला जीव ओतल्याचे दिसते. लावणीतील आपल्या कलेच्या बाबतीत ती 'परफेक्ट' असल्याचेच यातून दिसून येते. तिच्या व्हिडिओजवर रसिकांच्या पडत असलेल्या कमेंट्स वाचून आजही मराठी लोक उत्तम कला प्रकाराला उस्फूर्त दात देतात, हेही दिसते. अशाच कलाकारांमुळेमुळे मराठी संस्कृतीतील कला जिवंत आहेत. किंबहुना याही पुढे त्या अशाच बहरत राहतील.
युट्युबवर संगीत कंपनीच्या अधिकृत खात्यावर सदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, एकदा अवश्य बघा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

https://www.youtube.com/watch?v=oEmD35XlsKU


 

Sunday, September 29, 2024

सरी

चित्रपटाची सुरुवात होते एका रेल्वे ट्रॅकवर... एका निर्मनुष्य भागातून जाणाऱ्या त्या ट्रॅकवर एक २४-२५ वर्षांची युवती रेल्वेच्या दिशेने दुःखद चेहरा करून बघत आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रण देखील दिसून येतात. ट्रेनच्या भोंग्याचा आवाज येतो. जसजशी ट्रेन जवळ यायला लागते तसतसे तिचे काळीज धडधडू लागते. परंतु, अखेरच्या क्षणी मृत्यूला कवेत घेण्याची तिची हिंमत होत नाही आणि ती ट्रॅकवरून बाहेर उडी मारते. पाठीमागे ट्रेन वेगाने धडधडत ट्रॅकवरून निघून जाते आणि मग सुरू होतो फ्लॅशबॅक.
ही तरुणी आहे, दिया... चेहऱ्याने निर्मळ, निष्पाप आणि स्वभावाने अबोल...
तंत्रज्ञान महाविद्यालयात शिकत असताना मास्टर्सला शिकणाऱ्या एका युवकावर तिचे प्रेम जडते. अगदी लव अॅट फर्स्ट साईट म्हणतात ना तसेच! प्रेमात पडण्याच्या वयात खरोखरच प्रेम जडल्याने ती त्या युवकाला फॉलो करायला लागते. सातत्याने त्याचाच विचार मनामध्ये घोळत राहतो. त्याच्याशी येनकेनप्रकारे जवळीक साधण्याचा ती प्रयत्न करते. पण तिला ते फारसे जमत नाही. अगदी त्याने पेन्सिलिद्वारे काढलेली चित्रे देखील महाविद्यालयाच्या फलकावरून काढून घरी घेऊन जाते. याच चित्रांमुळे तिला त्या युवकाशी अर्थात रोहितशी बोलण्याची संधी देखील मिळते. पण त्यांचे प्रकरण काही पुढे जात नाही. दिया मात्र रोहितसाठी कासावीस झालेली असते.
थोड्याच दिवसात तिला समजते की रोहितला कोरियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली आहे आणि त्यामुळे त्याने कॉलेजदेखील सोडलेले आहे. इतके दिवस ती रोहितचा पाठलाग करत असते, त्याच्याशी तिच्या प्रेमाबद्दल कसं बोलू? या प्रश्नाचे उत्तर शोधत असते परंतु यातच रोहित निघून गेल्याची बातमी येते. अर्थात यामुळे तिचा भ्रमनिरास होतो. परंतु एक दिवस अचानक काही महिन्यानंतर तिला रोहित परत भेटतो... अगदी अनपेक्षितपणे.
इथे चित्रपटातला पहिला ट्विस्ट येतो. रोहित देखील तिला अनेक महिन्यांपासून फॉलो करत असतो. त्याची देखील तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नाही. पण त्या दिवशी तो बोलतो. इथे चित्रपटातील सगळ्यात पहिला आनंदाचा प्रसंग तयार होतो! प्रेमकहानी चालू होते. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही...  ईथवर परिस्थिती आलेली असते. परंतु चित्रपटातील पुढचा ट्विस्ट म्हणजे एके रात्री बाईकवर जात असताना दोघांचाही भीषण अपघात होतो आणि होत्याचे नव्हते होते. दिया भयंकर मानसिक धक्क्यामध्ये जाते. कदाचित यातून ती पुन्हा कधीही सावरू शकणार नसते. तिच्या आई-वडिलांकडून बरेच प्रयत्न होतात. परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही. शेवटी ते तिचे शहर बदलायचे ठरवतात. नव्या शहरात आल्यानंतर दियाची एका नव्या मित्राबरोबर अनोख्या पद्धतीने ओळख होते. हा मित्र म्हणजे आदी. तो तिला बोलत करतो. तिच्याशी मैत्री करतो आणि यातूनच त्यांच्या मैत्रीचे नाते प्रेम भावनेमध्ये रूपांतरीत होते. ही भावना दोघेही बोलून दाखवत नाहीत. त्यांच्या अबोल नात्याला कोणत्याही शब्दांची गरज पडत नाही. दिया पुन्हा प्रेमात पडते. परंतु चित्रपटातील ट्विस्ट काही थांबत नाहीत. जीवनाचे वळण पुन्हा एकदा वेगळ्या वाटेला तिला घेऊन जाते. मानवी जीवन हे किती अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहे, याची प्रचिती दियाच्या एकंदर आयुष्याकडे पाहिले तर येते. यापुढील कथा ही खूप वेगळ्या वळणाची आहे. परंतु चित्रपटाचा शेवट एका शोकांतिकेने होतो. त्याची सुरुवात जिथे झाली असते त्याच ठिकाणी शेवट देखील होतो!
एखाद्याचे जीवन इतक्या वेगवेगळ्या वळणानंतर निराळ्याच गंतव्यस्थानी येऊन पोहोचते, याची गोष्ट दियाच्या या कथेमध्ये दिसून येते.
चित्रपट सुरू झाला तेव्हाच याची सिनेमॅटोग्राफी कोणत्यातरी दक्षिण भारतीय माणसाने केली असावी, असा संशय आला आणि तो खराच ठरला. चित्रपट संपल्यानंतर जेव्हा त्याची माहिती काढली तेव्हा समजले की हा चित्रपट कन्नडमधील के. एस. अशोक दिग्दर्शित 'दिया' या चित्रपटाचा अधिकृत मराठी रिमेक आहे. शिवाय याच चित्रपटाची हिंदी आवृत्ती 'डियर दिया' आणि तेलुगु आवृत्ती 'डियर मेघा' या नावाने प्रदर्शित झाली होती. कन्नड भाषेमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्याने दिग्दर्शकाने स्वतःच हा चित्रपट चार भाषांमध्ये तयार केला! कथा तशी छान आहे. परंतु त्याचा शेवट एक शोकांतिका असल्याने तो एक दुःखद प्रेमपट असल्याचे दिसते.
चारही चित्रपटांपैकी मराठीमध्ये जीने दियाची भूमिका केली आहे त्या रितिका श्रोत्री हीचीच भूमिका सर्वात प्रभावी वाटली. विशेष म्हणजे 'आदी'च्या भूमिकेमध्ये कन्नड अभिनेता पृथ्वी अंबर याने कन्नड, हिंदी आणि मराठी अशा तीनही चित्रपटांमध्ये काम केले आहे! तसेच त्याच्या आईच्या भूमिकेमध्ये मृणाल कुलकर्णी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये आहेत. तीनही चित्रपट प्रत्येक दृश्यनदृश्य समान असल्याचे दिसतात.
एकंदरीत गोषवारा पाहिला तर रितिका दियाच्या भूमिकेमध्ये अतिशय फिट बसल्याचे दिसते. तिचा एकंदरीत अभिनय सुंदर झालेला आहे. एखाद्या मुलीला आपल्या आयुष्यात दोन-दोन हुशार आणि समंजस जोडीदार कसे मिळू शकतात? असा प्रश्न देखील पडू शकतो. आदी आणि त्याच्या आईचे जे नाते दाखवले आहे, तसे नाते सापडणे आज विरळाच! त्या नात्यास आदर्श नाते म्हणता येईल. शिवाय रोहित आणि आदी देखील एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतात. एक प्रकारे हा प्रेम त्रिकोण आहे असे म्हणता येईल. पण या त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून देखील समजावून घेता येतील.
रोमँटिक चित्रपट पाहणाऱ्यांना हा चित्रपट निश्चितच १००% आवडेल. कदाचित त्याच्या शेवटवर ते नाराज देखील असतील. 'संमोहिनी' हे गाणे अतिशय छान आहे. वारंवार ऐकावे असेच!
"लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स" या टॅगलाईनवर चित्रपटाची निर्मिती केली गेली होती. एकंदर चित्रपट पाहता ही टॅगलाईन सार्थ ठरते. काही गोष्टी अविश्वासनीय वाटल्या तरी जीवनातील अप्रत्याशीत घटना तो दाखवून जातो. काही चित्रपट आपल्या मनाचा ठाव घेतात, अशाच पठडीतील हा देखील आहे.
चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट समीक्षकांनी यास फारसे चांगले गुण दिले नव्हते. यामागचे कारण समजले नाही. युट्युबवर कोणीतरी अनाधिकृतपणे हा चित्रपट अपलोड केलेला आहे. त्यावरील ९०% पेक्षा अधिक लोकांनी सकारात्मक कमेंट्स केलेल्या दिसतात. म्हणजेच लोकांना हा चित्रपट आवडलेला आहे. आयएमडीबीवर देखील चित्रपटाचे रेटिंग कमी आहे. म्हणून कदाचित बहुतांश प्रेक्षक पाहत नसावेत. परंतु माझ्या दृष्टीने हा चित्रपट चांगलाच आहे.
नियमित चित्रपट बघणाऱ्यांना हा निश्चित आवडेल. तुमच्यापैकी कोणी बघितला असेल तर नक्की सांगा. बघितला नसेल तर नक्की बघा आणि प्रतिक्रिया देखील कळवा चित्रपटाच्या नायिकेच्या अर्थात दियाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटते? याचे उत्तर ऐकायला निश्चित आवडेल.

--- तुषार भ. कुटे


 

Friday, September 27, 2024

सखी

कंपनीतील कमकुवत आर्थिक स्थितीमुळे सूर्यकांत जगदाळे यांना जबरदस्तीने निवृत्त व्हावे लागते. इतकी वर्षे कंपनीमध्ये काम केल्यानंतर देखील अशा पद्धतीने वागणूक मिळाल्यामुळे ते अस्वस्थ होतात. आणि पुढील आयुष्य घालवण्यासाठी आपल्या गावी येतात. शहरांमध्ये अनेक वर्ष त्यांनी एकट्यानेच घालवलेली असतात. तोच मार्ग गावी आल्यानंतर देखील चालू ठेवतात. एक दिवस संकटात सापडलेल्या युवतीला अर्थात निशीला ते वाचवतात. निशी लग्नानंतरच्या आपल्या आयुष्यात घडलेल्या अनपेक्षित घडामोडींशी सामना करत असते. सासर आणि माहेर दोन्हींपासून दुरावलेली असते. तिला सूर्यकांत आधार देण्याचा प्रयत्न करतात. पुढे काय हा प्रश्न उपस्थित राहतो. एक दिवस सूर्यकांत यांना निशीमधील एका कलेची अनुभूती येते. मग ते ठरवतात की निशीने ही कला जोपासावी आणि त्यातच करिअर करावे. त्यासाठी तिला हवी ती मदत करायला ते सज्ज होतात. तिच्यासाठी मार्गदर्शक होतात. इथून पुढची आयुष्य नीशीच्या करिअर करता वाहून घेण्याचे ठरवतात. निशी सुद्धा त्यांचा विश्वास सार्थ ठरवते. त्यांच्या या प्रवासामध्ये अनेक अडथळे देखील येतात. आपले आणि परके कोण? यांची देखील त्यांना जाणीव होते. सूर्यकांत यांच्या आयुष्यातील निशी ही खरीखुरी सखी ठरते. तिला प्रगतीच्या शिखराकडे ते घेऊन जातात.
स्त्री आणि पुरुष यांच्यातील या वेगळ्या नात्याची गोष्ट 'सखी' या चित्रपटामध्ये दिग्दर्शक लता नार्वेकर यांनी दाखविलेली आहे. पती-पत्नी आणि भाऊ-बहीण या पलीकडे असणार तिसरं नातं आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतं. अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी आणि उषा नाडकर्णी या तिघांनाही 'स्वप्रतिमेबाहेरच्या भूमिका' वाटेला आलेल्या आहेत. अशा वेगळ्या भूमिकांमध्ये पाहताना छान वाटतं. उषा नाडकर्णी समंजस भूमिकेमध्ये प्रभावी ठरतात. एकंदरीत एका यशस्वी स्त्रीच्या मागे असणाऱ्या पुरुषाची गोष्ट प्रभावीपणे या चित्रपटामध्ये पाहायला मिळते.


 

Tuesday, September 24, 2024

एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी

जीवनामध्ये योग्य निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण तो एक निर्णय जीवनाला कोणत्याही प्रकारे कलाटणी देऊ शकतो. कदाचित पुढील सर्व आयुष्य त्या निर्णयावरच अवलंबून असू शकते. अशाच त्या एका निर्णयाची गोष्ट या चित्रपटामध्ये चित्रित करण्यात आलेली आहे.
मुक्ता आणि ईशान हे एक सुखी जोडपं. मुक्ता ही करिअरला प्राधान्य देणारी स्त्री आहे. आणि त्यासाठी तिच्या आई-वडिलांचा देखील तिला खंबीर पाठिंबा आहे. परंतु ती आई व्हायला तयार नसते. कारण त्यामुळे तिचं करिअर थांबू शकतं, अशी भीती तिला वाटत असते. याच कारणास्तव पुढे जाऊन दोघांचाही घटस्फोट होतो. ईशान दुसरे लग्न करतो. पण त्याच्या दुसऱ्या बायकोला वैद्यकीय गुंतागुंतीमुळे मूल होणार नसते. दुसरीकडे मुक्ताच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडते आणि ती पूर्णपणे एकटी पडते. तो एकाकीपणा तिला खाऊ लागतो. म्हणूनच ती मानसिक दृष्ट्या देखील कमकुवत होते. एक डॉक्टर म्हणून तिची क्षमता देखील कमी व्हायला लागते. एकेकाळी मूल होऊ न देण्याचा निर्णय आणि आज तयार झालेली पूर्ण विरुद्ध परिस्थिती यातून ती एक वेगळाच मार्ग काढते. यात भावनिक मानसिक गुंतागुंत तयार होते. यातून पुढे नक्की कसा मार्ग निघतो हे चित्रपटात पाहता येईल.
सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. दोघांनीही आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिल्याचे दिसते. शिवाय भावभावनांच्या आणि नात्यातील गुंतागुंतीचा हा खेळ दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे.