Thursday, January 22, 2026

रा. श्री. मोरवंचीकर

पांडवलेणी मधील भिंतींवर कोरलेली ती गूढ अक्षरे नक्की काय आहेत? याची माहिती मला वीस वर्षांपूर्वी नव्हती. जुन्या काळातली कुठलीशी लिपी आहे आणि लेण्यांविषयी माहिती त्यामध्ये लिहिलेली असावी, असं मला वाटायचं. या लेण्या पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात बनवल्या होत्या, असे बरेच गैरसमज पसरलेले होते. परंतु कालांतराने या लेण्यांच्या इतिहासाची हळूहळू माहिती होत गेली. सातवाहन काळाचा इतिहास वाचून काढला. त्याकरिता डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांचं बऱ्याच वर्षांपूर्वी घेतलेलं "सातवाहनकालीन महाराष्ट्र" हे पुस्तक उपयोगात आलं. २००० वर्षांपूर्वी महाराष्ट्र देशावर राज्य करणारे सातवाहन राजे नक्की कोण होते? त्यांची राज्यपद्धती कशी होती? तसेच त्यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक कशी घडवली? अशा विविध प्रश्नांची उकल सर्वप्रथम या पुस्तकामुळे मला झाली. कालांतराने सातवाहनांशी संबंधित अनेक पुस्तकांचे वाचन केले. यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची माहिती झाली. 
सुदैवाने माझा जन्म जुन्नरचा. जुन्नरच्या परिसरामध्ये सातवाहनांच्या अगणित पाऊलखुणा आजही दिसून येतात. अनेक लेण्या, किल्ले आणि शिलालेख या परिसरामध्ये आहेत. तिथे वावरताना सातवाहन काळाच्या इतिहासाची सखोल ओळख करून घेता आली. शिवाय यामधून प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे विविध कंगोरे देखील ध्यानात आले.
हा प्राचीन इतिहास आपल्यासमोर आणण्यासाठी काही मोजक्या इतिहास संशोधकांनी अथक प्रयत्न केले. त्यातीलच एक रा. श्री. मोरवंचीकर होय. त्यांच्या सातवाहनकालीन महाराष्ट्र या पुस्तकामुळे ते माझ्या नेहमीच लक्षात राहिले. दोन दिवसांपूर्वी त्यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. इतिहासविश्वाने याची दखल घेतली की नाही हे माहित नाही. परंतु महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास देशासमोर आणण्याचे त्यांचे महान कार्य इथून पुढे तरी मराठी लोक लक्षात ठेवतील, अशी आशा वाटते.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-- तुषार भ. कुटे


 

Wednesday, January 21, 2026

प्रिय हेमंत ढोमे

प्रिय हेमंत ढोमे,

तुझा "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" हा चित्रपट पाहिला.... नाही आवडला... 

कारण या चित्रपटामध्ये तू खूप सार्‍या चुका केलेल्या आहेत... 

तुला माहीत नाही का आम्ही मराठी लोक फक्त आडनावाने मराठी आहोत.... आम्हाला आमच्या भाषेशी काही घेणेदेणे नाही... आम्हाला ज्ञान नको आहे... आम्हाला फक्त चकचकीत गुळगुळीत दिसणाऱ्या आणि भरमसाठ सुविधा देणाऱ्या इंग्रजी शाळा हव्या आहेत... तू हे काही दाखवलं का?.... नाही ना.... मग तू चुकलास!

आम्ही जरी मराठी शाळेतून शिकलो असलो तरी आज विविध कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ ठिकाणी काम करतो आहे. आम्हाला मराठीतून शिकल्याची लाज वाटते. म्हणूनच आमच्या मुलांना देखील आम्ही मराठी शाळेमध्ये शिकवत नाही.... आमच्यासाठी इंग्रजी म्हणजेच सर्वकाही... तू हे काही दाखवलं का?.... नाही ना.... मग तू चुकलास!

मातृभाषेतून शिक्षण म्हणजे आपुलकीचं आणि हसत खेळत शिक्षण... मीही असेच शिकलो... अनेकदा शिकत गेलो... अनुभव संपन्न झालो.... आमच्या भाषेतील शिक्षणातून आमचं व्यक्तिमत्व घडवलं.... पण आम्हाला आमच्या मुलांना यातलं काहीच द्यायचं नाहीये..... त्यांच्यामध्ये कृत्रिमता आणायची आहे.... त्यांच्याकडून सर्व काही रट्टा मारून, घोकून, पाठ करून घ्यायचं आहे... आणि काही वर्षानंतर त्याला खोऱ्याने पैसा ओढताना पाहायचं आहे.... हेही तू दाखवलं नाहीस... म्हणजे तू चुकलासच!

आम्हाला आमच्या शिक्षकांनी आत्मीयतेने शिकवलं. अवघड गोष्टी सहज आणि सोप्या करून दाखवल्या. आजही त्या आमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसलेल्या आहेत. पाढ्यांचा तर विषयच नाही... 'पाचा साते किती?' असं कोणी विचारलं तर लगेचच ३५ हे उत्तर येतं.... पण याचा वास्तविक जीवनात काही उपयोग आहे का?... नाही... आमच्या मुलांना आम्हाला हे सर्व काही द्यायचं नाहीये... त्यांच्या शिक्षकांनी शिकवावं आणि निघून जावं.... आमच्या मुलाचं नाव त्याने लक्षात ठेवलं नाही तरी चालेल... काय चाटायची आहे ती आत्मीयता?.... हेही तू दाखवले नाहीस.... ही पुढची चूक.... 

आमच्याकडे आहे भरपूर पैसा... आम्हाला तो उधळायचा आहे..  इंटरनॅशनल, युनिव्हर्सल आणि ग्लोबल स्कूलच्या नावाखाली... उद्या आमच्या मुलाने आम्हाला विचारायला नको की तुम्ही माझ्या शिक्षणावर खर्च का नाही केला?... म्हणून करतो आम्ही खर्च... म्हणून आम्हाला हव्या असतात इंटरनॅशनल शाळा आणि त्यातल्या एसीवाल्या क्लासरूम... हे सुद्धा तुझ्या चित्रपटात नाही... म्हणजे तू परत चुकला... 

मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल... असं तू म्हणतोस.... 
काय करायचं आहे भाषा टिकून? मेली तर मेली.... फार फार तर काय होईल? मराठी संस्कृती नष्ट होईल.... महाराष्ट्राची ओळख नष्ट होईल.... आम्हाला काय त्याचं? आम्ही कणा नसलेली आणि मराठी आडनावे घेऊन मिरवणारी माणसं आहोत....

- तुझा चित्रपट न आवडलेला एक मराठी प्रेक्षक 

(तुषार भ. कुटे यांच्या लेखणीतून)


पैसावाटप

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे इतर स्थानिक पातळीवरील निवडणुका फारशा गाजत नाहीत किंवा त्यांना ग्लॅमरही तितके प्राप्त होत नाही. परंतु यावेळेसच्या महानगरपालिका निवडणुका इतर वेळेपेक्षा वेगळ्या भासल्या. मागच्या पाच-सहा वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललेल्या घडामोडींचा प्रभाव या निवडणुकांवरती होणार होता. आणि तो झालाही. राजकारणामध्ये होणारी पैशाची भली मोठी उलाढाल पाहता सर्वच राजकीय पक्षांमध्ये तसेच पक्षाच्या उमेदवारांमध्ये सत्ताकारणात सहभागी होण्याची अतिव आकांक्षा दिसून आली. एकंदर पक्षनिष्ठा किंवा समाजकारण नावाच्या गोष्टी आता राजकारणातून लुप्त होत जाताना दिसत आहेत. 
निवडणुकांमध्ये दरवेळेसच पैसावाटप बेसुमारपणे होत असते. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही अशा बऱ्याच चर्चा मी आजूबाजूला ऐकल्या. त्या खऱ्याही असाव्यात. आजही लोकशाहीतील मतदाराला आपले मत किती महत्त्वाचे आहे, याविषयी काहीही पडलेले नाही. निवडणुका आल्या की बरेच लोक जोपर्यंत एखाद्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराकडून पैसे येत नाही तोपर्यंत मतदानालाही जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. समाजव्यवस्थेतील शेवटच्या स्तरावरील जनता तसेच झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक अनेकदा अशा पद्धतीने पैसे घेऊन मतदान करताना ऐकलेले आहे. कोणत्या भागामध्ये पैसे वाटले की मते मिळतात, याची इत्यंभूत माहिती राजकारण्यांच्या कार्यकर्त्यांना असते. यावेळेसही पैसे वाटप होणार हे माहीत होते. परंतु यंदाच्या निवडणुकांमध्ये मी बरेच असेही लोक पाहिले की जे मोठमोठ्या सोसायटीमध्ये राहतात, त्यांनी देखील विविध पक्षांच्या उमेदवाराकडून तब्बल दहा-दहा हजार रुपये घेऊन मतदान केले होते. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या आणि महानगरपालिकेमध्ये मतदानाचा अधिकार असणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडूनच कोणता उमेदवार किती पैसे देत आहे? याची माहिती मिळाली होती. अनेक उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकांनी देखील पैसे घेऊन मतदान केल्याचे ऐकिवात आले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. मागच्या पाच-सहा वर्षातील राजकारणाचा खेळखंडोबा पाहता, कुणीही आले तरी काहीही फरक पडत नाही, आपल्याला पैसे मिळणे महत्त्वाचे. अशा मानसिकतेतूनच सर्वच लोक उमेदवाराकडून पैसे घेऊन त्यांना मतदान करताना यंदा पहिल्यांदाच दिसून आले. हा भयानक पायंडा पडायला २०२६ ची महानगरपालिका निवडणूक कारणीभूत ठरताना दिसली. लोकशाही सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तेच लोक तिला पायदळी तुडवताना दिसले. हा भारतासारख्या मोठ्या लोकशाहीचा पराभवच आहे. 

--- तुषार भ. कुटे


 

Tuesday, January 20, 2026

परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष - हृषिकेश गुप्ते

मराठी चित्रपटांसाठी जसे ए-सर्टिफिकेट असते तसं जर पुस्तकांना दिलं तर त्यामध्ये काही पुस्तकांचा समावेश करता येईल. त्यातीलच हृषिकेश गुप्ते लिखित "परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष" हा दोन दीर्घ कथांचा संग्रह. 
या दीर्घ कथासंग्रहातील पहिली कथा अर्थात शीर्षक कथा आहे. वेगळ्या ढंगाने लिहिलेली. मला तिच्यामध्ये पाश्चिमात्य लेखकांच्या शैलीचा प्रभाव जाणवला. यामधील पात्रांना सातत्याने त्यांच्या कामावरून आणि विशेषणाने संबोधले आहे. जसे की सतत पत्त्यांचे बंगले बांधणारे घारे गोरे मॅनेजर साहेब, सतत प्रवास करणारा शाई एजंट, सतत पतंग उडवणारा फोल्डिंगचा पुरुष, सतत रेडिओ ऐकणारा अल्लाबक्ष चहावाला, सतत काम करणारा तुकाराम बाईंडर, सतत लोकांच्या भेटीगाठी घडवून आणणारे सर. हे वाचायला थोडं विचित्र आणि मनोरंजक वाटतं. पण ही शैली भन्नाट आहे. परफेक्टच्या बाईने तिच्या दुसऱ्या विवाहासाठी रचलेले स्वयंवर आणि त्या स्वयंवरासाठी घातलेली विचित्र अट तसेच या अटीची पूर्तता करणारे महाविचित्र लोक... असे सर्वच विचित्र-विचित्र आहे!
अखेरीज या स्वयंवरामध्ये एकाचा विजय होतो. अर्थातच हा शेवट अनपेक्षित आहे. तो असा का झाला? या प्रश्नाचे उत्तर देखील लेखकाने स्पष्टीकरणासह दिले आहे.
कथासंग्रहातील दुसरी कथा म्हणजे "तिळा दार उघड..." ही गोष्ट आहे तिलक नावाच्या एका मुलाची आणि युवकाचीही. त्याच्या तिलक नावामागे छानसा आणि मजेशीर इतिहास आहे. हाच धागा पकडून संपूर्ण कथा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहते. तिलकला लाभलेलं दैवी वरदान त्याच्या आजूबाजूच्या सर्वांना समजत असतं. त्याचा तो गैरफायदा घेतो. परंतु एका अर्थाने त्याने स्वतःलाच फसवलेले असते. यातून तो कसा मार्ग काढतो? तसेच त्याच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या घटना घडत राहतात? अशा विविध प्रश्नांची उत्तरे कथेच्या अखेरीस आपल्याला मिळतातच. दोन्ही कथा वेगाने सरकणाऱ्या...  याच कारणास्तव एकदा सुरुवात केली की शेवट करूनच पुस्तक खाली ठेवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आहेत.

--- तुषार भ. कुटे 



Monday, January 19, 2026

तंत्रज्ञान आणि अनुवाद

"प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या माझ्या नव्या पुस्तकाची समाजमाध्यमावर पोस्ट केल्यानंतर काही दिवसांमध्ये एका वाचकाचा मला मेसेज आला. 'सर तुम्ही कोणत्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करून हे पुस्तक लिहिले आहे?' अर्थातच हा प्रश्न काही आश्चर्यकारक नव्हता. यापूर्वी देखील 'पायथॉन प्रोग्रामिंग'च्या वेळेस दोन जणांनी मला असा प्रश्न विचारला होता. 
मूलतः भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञानाचे ज्ञान तयार होत नाही किंवा लिहिले जात नाही, हा भारतीय लोकांचा गैरसमजच. संगणक तंत्रज्ञानाचा उदयच पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. मुख्यत्वे इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये म्हणजेच अमेरिका आणि इंग्लंडसारख्या राष्ट्रांमधील संगणक विकसकांनी या तंत्रज्ञानाला गती दिली. त्यामुळे त्यांचे ज्ञान हे त्यांच्याच इंग्रजी भाषेमध्ये लिहिले गेले. परंतु युरोपियन देशांनी मात्र इंग्रजीतील हे ज्ञान स्वतःच्या भाषेमध्ये लिहिले. आजही त्यांची जवळपास सर्वच पुस्तके स्थानिक भाषेमध्ये लिहिलेली असतात. अनेक शतकांपूर्वी आपल्या देशामध्ये संस्कृत भाषेविषयी जी परिस्थिती होती तीच आज इंग्रजीच्या बाबतीत आहे. त्या काळात ज्ञान फक्त संस्कृत भाषेमध्येच लिहिले गेले होते. परंतु कालांतराने अनेक विभूतींनी प्रयत्नपूर्वक सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये लिहून त्यांना समाजज्ञानाची ओळख करून दिली. 
भारतामध्ये मात्र संगणक तंत्रज्ञानाची ओळख व्हायला काही दशके जावी लागली. या तंत्रज्ञानाची आपल्याला बऱ्याच उशिरा आणि संथपणे ओळख झाली. इथल्या विकसकांनी इंग्रजी भाषा आत्मसात करून, पाश्चिमात्य पुस्तकांचा अभ्यास करून संगणक क्षेत्रामध्ये शिरकाव केला. मागच्या शतकामध्ये तंत्रज्ञानाची माहिती आपल्या भाषांमध्ये आणण्यासाठी कुणी प्रयत्न केल्याचे मला आठवत नाही. परंतु मागच्या दहा-पंधरा वर्षांपासून हळूहळू संगणक ज्ञान आपल्या भाषांमध्ये तयार होत आहे. या क्षेत्रामध्ये अनुवादित पुस्तके जवळपास नाहीतच. पाश्चिमात्य लेखकांनी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके अनुवादित होऊन भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झालेली आहेत. परंतु तंत्रज्ञान क्षेत्राची अशी परिस्थिती नाही. भारतीय भाषांमध्ये पुस्तके नगण्य असली तरी ती बहुतांश इथल्याच लेखकांनी लिहिलेली आहेत. अर्थात मी देखील माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून 'पायथॉन प्रोग्रामिंग', 'डेटा सायन्स' आणि 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' अशी आजच्या युगातील तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह आपल्या भाषेमध्ये लिहिली. खरं सांगायचं तर हे तंत्रज्ञान शिकताना मी अनेक पुस्तकांचा वापर केला होता. परंतु मराठीतून पुस्तक लिहिताना केवळ अनुभवाचाच वापर झाला. यासाठी कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचा संदर्भ घेतला नव्हता. वाचकांच्या दृष्टिकोनातून शिकण्याचा प्रवाह कसा असावा? कोणत्या प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव या पुस्तकांमध्ये असावा? तसेच एखादी संकल्पना आपल्या भाषेमध्ये कशा पद्धतीने सहज व सोपी करून सांगता येईल? अशा विविध प्रश्नांचा विचार करूनच मी पुस्तकांची रचना केली आहे. यावर्षी रोबोटिक्स, संगणकायन, प्रॅक्टिकल मशीन लर्निंग, प्रॅक्टिकल न्यूरल नेटवर्क, प्रॅक्टिकल कॉम्प्युटर व्हिजन, प्रॅक्टिकल नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, प्रॅक्टिकल जनरेटिव्ह एआय, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, एआय आणि क्रिएटिव्हिटी, एआय आणि गूढ प्रश्नांची उकल, ड्रॅगनच्या विळख्यात एआय आणि मशीनचे मन अशी विविध पुस्तके मराठी भाषेतून प्रसिद्ध करण्याचा माझा मानस आहे. अर्थात केवळ इंग्रजीत वाचकांना असणारे ज्ञान सर्वसामान्य मराठी जनापर्यंत पोहोचावे, या एकमेव उद्देशाने या पुस्तकांचे लिखाण चालू आहे. हळूहळू एकेक पुस्तक मराठी वाचकांपर्यंत पोहोचेल. त्यांनाही यातून तंत्रज्ञानाची सखोल ओळख होईल, असा मला दृढ विश्वास आहे. 

--- तुषार भ. कुटे

 


 

 

Sunday, January 18, 2026

वाळाई

रोजच्या जीवनामध्ये सातत्याने संघर्षाचा सामना करणाऱ्या शिवानंद या मुलाची ही गोष्ट. तामिळनाडूतल्या एका छोट्याशा गावामध्ये तो राहत असतो. घरामध्ये आई, बहीण आणि तो असे तिघेजण. एका जमीनदाराच्या भल्यामोठ्या केळीच्या शेतांमध्ये केळीचे घड वाहण्याचे काम त्यांचे कुटुंब करत असते. शिवानंद शाळेत जायचा परंतु सुट्टीच्या दिवशी त्याला आई आणि बहिणीला मदत म्हणून केळांचे घड वाहण्याचे काम करावे लागायचेच. यातून येणारे त्यांचे उत्पन्न अत्यंत तुटपंजे होते. स्वतः शिवानंद शाळेमध्ये हुशार मुलगा होता. तो अतिशय आनंदाने शाळेमध्ये शिकायला जायचा. परंतु त्याला केळी वाहण्याचे काम आवडत नव्हते. ते टाळण्याकरता तो विविध क्लुप्त्या आजमावायचा. या गावातील जवळपास सर्वच लोक त्या केळीच्या शेतावर कामाला होते. एक दिवस जरी कामाला गेले नाही तरी जगण्यासाठी संघर्षाची परिस्थिती होती. बागायतदार देखील इथल्या लोकांना पिळून काम करायला लावायचा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिवानंदाचे शिक्षण आणि काम सातत्याने चालू होते. आपली बहीण वेंबू आणि सख्खा मित्र शेखर हे त्याच्या अत्यंत जवळचे. परंतु एके दिवशी अचानक एक भयावह घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडते. अगदी नशिबानेच तो स्वतः त्यातून वाचतो. आणि चित्रपट संपतो. 
चित्रपटाची गोष्ट गरिबीचे आणि संघर्षाचे विविध कंगोरे दाखवणारी आहे. आजही भारतातील बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांना रोजच्या जीवनासाठी संघर्ष करावा लागतो. शिक्षण की उदरभरण? यातून एकाची निवड करावी लागते. त्याचेच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे शिवानंद होय. शेवटच्या प्रसंगांमध्ये तर त्याला कित्येक वेळा अन्नापासून वंचित व्हायला लागते. आपल्या जवळच्या व्यक्ती गेल्यानंतरही पोटाची भूक त्याला शांत बसू देत नाही. एका हृदय द्रावक घटनेने चित्रपटाचा शेवट होतो. शेवटी दाखवलेल्या श्रेय नामावलीमध्ये सदर घटना चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे, असे दाखवले जाते. त्यामुळे शेवट मनामध्ये अधिकच घट्ट रुतून बसतो.

--- तुषार भ. कुटे

 


 

हॅरियर ईव्ही

मागच्या काही दिवसांपासून चालू असलेला हॅरियर ईव्ही गाडीचा शोध आज अखेर संपला. नवीन गाडी घेण्याच्या दृष्टीने अमोलने हॅरियर ईव्हीची निवड केली होती. अर्थात यासाठी अन्य पर्यायही उपलब्ध होते परंतु रश्मीला आणि मला हॅरियरच सर्वोत्तम गाडी आहे, हे माहीत होते. त्या दृष्टिकोनातून टाटा मोटर्स विविध शोरूममध्ये आम्ही चौकशी केलेली होती. सर्वच ठिकाणी जवळपास सारखीच किंमत सांगण्यात आली. शिवाय या गाडीसाठी रंगाचे पर्यायही मर्यादित होते. त्यावरूनही बराच खल झाला. नैनिताल ब्लू, प्युअर ग्रे तसेच पूर्णतः काळ्या रंगाच्या गाडीचाही विचार केला गेला होता. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या बघितल्या. तरी देखील त्यांचा निर्णय होत नव्हता. परंतु आज अखेर प्युअर ग्रे रंगाच्या गाडीवर शिक्कामोर्तब झाले. मागच्या पाच दिवसांपासून माझे सीडॅकमध्ये ट्रेनिंग चालू आहे. आज देखील दुपारी साडेतीनला ट्रेनिंग संपून घरी आलो. तोपर्यंत यांचे गाडी घेण्याचे प्रयोजन झाले होते. आजच बुकिंग केली तर २७ जानेवारीला गाडी मिळेल. म्हणूनच आजच गाडीची बुकिंग पूर्ण केली. अखेर प्युअर ग्रे रंगाची गाडी ठरली. माझ्या नेक्सॉन आणि हॅरियर या गाड्यांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. परंतु हॅरियरमध्ये नवनवीन वैशिष्ट्यांचा समावेश केल्याचे दिसते. शिवाय याची रेंज देखील पाचशेच्या वर आहे. त्यामुळे बऱ्याच लांबच्या प्रवासाला देखील गाडी वापरता येऊ शकेल. 
पंचजन्य ऑटोमोबाईलमध्ये गाडी बुक करत असताना केवळ मी आणि रश्मी होतो. ११००० रुपये देऊन बुकिंग पूर्ण केली. आणि २७ जानेवारीला गाडी येईल या प्रतीक्षेमध्ये इथून बाहेर पडलो. 


 

Saturday, January 17, 2026

पायथॉन प्रोग्रामिंग आणि वाचकांचा प्रतिसाद

पायथॉन प्रोग्रामिंगचे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून विशेषतः ग्रामीण भागांमधून अनेक विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा अभिप्राय मला मेलद्वारे तसेच मेसेजद्वारे प्राप्त होत होता. परंतु पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने या सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला मिळाली. पुस्तक महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाचक पुण्यामध्ये येत असतात. सांगली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, जळगाव, नांदेड, अमरावती तसेच रत्नागिरीसारख्या विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक वाचक याप्रसंगी मला भेटले. त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंगचे मराठी पुस्तक वाचले होते. त्यातूनच त्यांना प्रोग्रामिंग शिकता आली. काही शिक्षकांनी तर स्वतःहून या पुस्तकाची शिफारस विद्यार्थ्यांना केली होती. 
आपले पुस्तक वाचकांना आवडते आहे आणि त्यातून ते नवीन तंत्रज्ञान सहजपणे शिकत देखील आहेत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक लिहिले त्यांना त्याचा फायदा होतो आहे, ही माझ्यासाठी समाधानाची बाब होती. अनेकांनी पुस्तकाविषयीचे अनुभव देखील मला सांगितले. शिवाय अजूनही संगणक क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानावर मराठीतून पुस्तक नाही, ते तुम्ही लिहाल का? अशी विचारणा देखील केली. आपल्या लिखाणाला असे प्रोत्साहन मिळत असेल तर कोणताही लेखक अतिशय उत्साहाने पुस्तक लिहिल.
सध्या "प्रॅक्टिकल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स" या पुस्तकश्रृंखलेवर माझे काम चालू आहे. त्यातील चार पुस्तके यावर्षी प्रकाशित होतील. मला आशा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक क्षेत्रातील या तंत्रज्ञानाचे ज्ञान संपादन करण्यासाठी निश्चितच या पुस्तकांचा मोठा फायदा होईल. 

--- तुषार भ. कुटे.