Monday, February 2, 2026

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्पणपत्रिका

"आर्टिफिशियल इंटेलिजन्स" पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हाच प्रेरणा होती जेफ्री हिंटन यांची. खरं सांगायचं तर त्यांच्याबद्दल दहा वर्षांपूर्वी मला देखील माहिती नव्हती. प्रत्यक्षात न्यूरल नेटवर्क शिकवायला घेतलं त्यानंतर या मागचा कर्ताधर्ता कोण? या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं. ते होते जेफ्री हिंटन.
आज अस्तित्वात असणाऱ्या बहुतांश उत्पादनांमागचं तर्कशास्त्र न्यूरल नेटवर्कमध्ये दडलेलं आहे. हा मागच्या शतकामध्ये तयार झालेला अल्गोरिदम. मानवी मेंदू जसे कार्य करतो तसेच संगणकीय अल्गोरिदममध्ये न्यूरल नेटवर्कद्वारे केले जाते. परंतु या न्यूरल नेटवर्कला शिकण्याची क्षमता देण्याचे कार्य जेफ्री हिंटन यांनी केले. २१ व्या शतकामध्ये हे तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले. यानंतरही हिंटन यांनी वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानाला आपले योगदान दिले. गुगलसारख्या कंपन्यांसोबत त्यांनी काम देखील केले. परंतु त्यांचा देखील 'अल्फ्रेड नोबेल' झाला. आपण तयार केलेले तंत्रज्ञान जगाला विनाशाच्या दिशेने नेऊ शकते, याची जाणीव हिंटन यांना झाली होती. २०२२ पर्यंत त्यांना संगणक क्षेत्रातील मानाचा ट्युरिंग पुरस्कार मिळाला आणि विज्ञान क्षेत्रातील सर्वोत्तम नोबेल पुरस्कार देखील!
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं तंत्रज्ञान चुकीच्या दिशेने विकसित झाल्यास किंवा चुकीच्या हातांमध्ये गेल्यास ते विनाशकारी ठरू शकतं याची जाणीव हिंटन यांना होती. त्यातूनच त्यांनी या तंत्रज्ञानाविषयी प्रबोधन करण्याचे कार्य हाती घेतले. जे आजतागायत अविरतपणे चालू आहे.
माझा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू देखील हाच होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे जवळपास सर्वांनाच माहीत झालं आहे. परंतु भविष्यातील त्याचा विकास आपल्याला कोणत्या वाटेवर नेऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर तात्विकदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोधणे गरजेचे वाटते. हिंटन यांच्या विचारांची मला मदत झाली. आणि हे पुस्तक मी लिहू शकलो.
हेन्री डेव्हिड थोरो त्याच्या वॉल्डन या पुस्तकामध्ये म्हणतो की, एखादे पुस्तक तुम्हाला जर विचार करायला लावत नसेल, तर ते निरर्थक आहे. अतिशय बहुमोलाचा विचार थोरो याने मांडला होता. त्यालाच अनुसरून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या पुस्तकाची रचना मी केली. आज वाचकांच्या अनुभवातून ती सार्थ झाल्याचे देखील मला वाटते.

--- तुषार भ. कुटे



 

सुनेत्रा पर्वाचा प्रारंभ

अजितदादांच्या आकस्मिक निधनाने सर्व महाराष्ट्रालाच धक्का बसला. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जणच हळहळ व्यक्त करत होता. एक कामसू आणि उमदे व्यक्तिमत्व आपण गमावले. परंतु या घटनेने पुढे काय? नावाच्या प्रश्नाला देखील सुरुवात झाली. या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे होतेच. अजितदादानंतर मोठा आणि तगडा नेता त्यांच्या पक्षामध्ये नव्हता. आणि दोनच दिवसांमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षनेतेपदी तसेच उपमुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आली. समाजमाध्यमांवर जेव्हा ही बातमी प्रसारित झाली तेव्हा यावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. अजितदादा जाऊन अजून दहा दिवसही झाले नाहीत तोच त्यांची पत्नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे, यावर बऱ्याच जणांचा आक्षेप होता. ही गोष्ट तशी पाहिली तर सामान्यच आहे. सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून कमीत कमी दहा दिवस तरी कौटुंबिक दुखवटा पाळला जातो. परंतु राजकारणासाठी हा नियम लागू होतो का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. अजितदादा त्यांच्या पक्षाचे एकखांबी तंबू होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या मूळ पक्षातूनच नवीन पक्षाची स्थापना झाली होती. त्यांच्या तंबूचा हा खांब पडल्याने तंबू कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात विरोधी गटाकडून लगेचच निरनिराळे दावे यायला लागले होते. आता अजितदादाच नसल्याने त्यांनाही त्यांचे उखळ पांढरे करून घ्यायची जणू घाई झाली होती, असे एकंदरीत वातावरण दिसून आले. याच कारणास्तव पडद्यामागील राजकारण आलेले असावे.
कधी कधी वाटतं आपण खूपच सामान्य लोक आहोत. आपण आपल्याच सामान्य विचारसरणीतून प्रत्येक घटनेकडे पाहत असतो. पडद्यामागील राजकारण आपल्याला समजत नाही. राजकारणी लोकांची दुःख ही वेगळीच असतात. त्यातूनच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदी नेमण्याचा निर्णय झाला असावा. यातून त्यांच्या पक्षाची घडी विस्कळीत होण्यापासून वाचेल, असे वाटते. कारण मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी सध्यातरी विरोधी गटातील बरेच जण टपलेले दिसून आले. उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद नसले तरी त्यातून एक वेगळा संदेश अन्य राजकारण्यांना गेला आहे. अजितदादांचा पक्ष अजूनही स्वतंत्रच आहे आणि तो याही पुढे स्वतंत्रच चालू राहील. याकरिताच सुनेत्रा पवारांचा शपथविधी उरकला गेला. अतिशय विचित्र परिस्थितीमधून सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी आल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरू शकतो. 
त्या काही कट्टर राजकारणी नाहीत. त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरून राजकारणातले छक्के-पंजे त्यांनी अजून प्रत्यक्ष पाहिले नसावेत. परंतु अजितदादांकडून त्यांनी याचे अप्रत्यक्ष धडे घेतले असतील, अशी आशा वाटते. राजकारणात त्यांचा अनुभव त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांपेक्षा कमी असला तरी सद्य परिस्थितीत केवळ त्यांचेच नेतृत्व पक्षाला एकसंध ठेवू शकते, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या उच्च पदावर आजवर एकही महिला गेलेली नाही. म्हणजे महाराष्ट्राने महिला राजकारण अनुभवलेले नाही. एका अर्थाने सुनेत्रा पवारांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे, असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रासाठी एका नव्या दिशेचा हा प्रारंभ आहे. वाईट घटनांमधून काहीतरी चांगले होत असते. तशाच प्रकारची ही घटना आहे. इथून पुढची महाराष्ट्रीय राजकारणातील अनेक वर्षे सुनेत्रा पवार आपल्या कामगिरीतून गाजवतील, अशी आशा वाटते.
बघूया काय होतंय ते.

--- तुषार भ. कुटे

 


Saturday, January 31, 2026

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सर्वोत्तम कोर्स कोणता?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थांपैकी एक म्हणजे डेक्कन कॉलेज होय. या कॉलेजची स्थापना सन १८२१ मध्ये झाली होती.
आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच डेटा सायन्स क्षेत्रातील ट्रेनिंगमध्ये अग्रगण्य असणारी पुण्यातील संस्था म्हणजे मितू स्किलोलॉजीज होय. या संस्थेला गुगलवर सर्वाधिक रेटिंग आणि रिव्ह्यूज आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी या दोन्हीही संस्था संयुक्तपणे 'जेनेसिस एआय कोर्स' ऑनलाईन पद्धतीने चालवतात. ज्यामध्ये तब्बल तीन सर्टिफिकेशन कोर्स करता येतात.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची डिग्री करत असलेला विद्यार्थी आणि सर्व प्रकारचे पदवीधर या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. तुम्ही जरी कोणत्याही महाविद्यालयामध्ये शिकत असाल तरीदेखील पॅरलली हा कोर्स करू शकता. कारण तो संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत चालवला जातो.
या कोर्समध्ये पायथॉन प्रोग्रामिंग, स्टॅटिस्टिक्स, डेटा सायन्स, डेटा ऍनालिसिस, डेटा व्हिज्युलायझेशन, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि जनरेटिव्ह एआय सारख्या विविध टेक्नॉलॉजीला प्रॅक्टिकलद्वारे आणि कॅपस्टोन प्रोजेक्टद्वारे शिकवले जाते.
हा कोर्स शिकवण्यासाठी कंपनीतील अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट, एआय इंजिनियर्स तसेच पीएचडी झालेले प्राध्यापक देखील आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एबीसी बँकेमध्ये तब्बल २४ क्रेडिट्स देखील मिळणार आहेत. तेही डेक्कन कॉलेज सारख्या शासकीय संस्थेकडून...
यातील एका सर्टिफिकेट कोर्स फी आहे फक्त वीस हजार रुपये. आणि त्याकरिता फक्त ६० जणांना प्रवेश मिळतो. तोही फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस वर...!
डेक्कन कॉलेज किंवा मितू स्किलोलॉजीजच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती किंवा तुमचा प्रवेश निश्चित करू शकता.

https://mitu.co.in 

#ArtificialIntelligence #DataScience #GenAI #AgenticAI #pythonprogramming


 

वॉल्डन - हेन्री डेव्हिड थोरो

१८४५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या एका २८ वर्षाच्या युवकाने वॉल्डनच्या तळ्याकाठी राहण्याचा निर्णय घेतला. या तळ्याच्या काठावर तो एक झोपडी बांधून जवळपास दोन वर्ष राहिला. कदाचित त्याला स्वतःवर प्रयोग करायचे होते. मनुष्य कसा जगू शकतो? या प्रश्नाची उत्तरे शोधायची होती. यातूनच हेन्री डेव्हिड थोरो याचे स्वतःचे एक तत्त्वज्ञान तयार झाले. या तत्त्वज्ञानावरच आधारित असणारे पुस्तक, वॉल्डन.
काही गोष्टी आपल्या अनुभवातून साध्य होतात. काही गोष्टींसाठी वेळ यावी लागते तर काहींसाठी आपल्याला तशी वेळ आणावी लागते. वॉल्डनच्या काठावर दोन वर्षे राहिलेला हा तरुण अशाच अनुभवाच्या शोधार्थ भटकत होता. त्यातूनच त्याला जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. तिथल्या निसर्गातून आणि स्वतः अनुभवलेल्या घटनांमधून त्याचं स्वतःच एक तत्त्वज्ञान तयार झालं. या मुक्कामात तो दोन वर्षे पूर्णपणे एकटा नव्हता. त्याला अनेक व्यक्ती तसेच प्राणी देखील भेटले. त्यातूनही त्याचे स्वतःचे मत तयार झाले. त्याला स्वतःबद्दल किंबहुना मनुष्य जीवनाबद्दल विचार मंथन करण्याची संधी मिळाली. याच विचार मंथनावर आधारित हे पुस्तक आहे.
हे पुस्तक म्हणजे जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. माणसाला जगण्यासाठी नक्की काय लागतं? याही प्रश्नाचं सारासार उत्तर देते. शिवाय जीवनातील आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना बहुतांश मार्गदर्शन देखील करते. 
यातील बरीचशी वाक्ये सुविचार म्हणून लिहिण्यासारखी आहेत. तसेच सार्वजनिक जीवनामध्ये आचरणात आणण्यासारखी देखील आहेत. एक अर्थाने आदर्श जीवन पद्धतीचा ती पुरस्कार करतात.

— तुषार भ. कुटे


Thursday, January 29, 2026

अजितदादा

आपला देश म्हणजे राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यावर भरभरून प्रेम करणारा देश. परंतु, हे प्रेम सर्वांनाच मिळत नाही. आपल्या कार्यातून, व्यक्तिमत्वातून लोकांच्या मनावर राज्य करणारे अतिशय कमी लोक आपल्या देशात आहेत. त्यातीलच एक अजितदादा पवार. 
सकाळी सकाळीच आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच जण सुन्न झाले. अजितदादा इतक्या लवकर जाऊच शकत नाहीत. अशीच सर्वांची भावना होती. परंतु सत्य हे कटू असते. याची जाणीव काल प्रकर्षाने झाली. ज्या व्यक्तीला आपण कधीच भेटलो नाही आणि केवळ बातम्यांमधून पाहत आलेलो आहे, त्यांच्याविषयी इतके वाईट का वाटावे? हा प्रश्न मला पडला.
खरंतर या व्यक्तीने आपल्या कामांमधून, धडाडीतून जी ओळख निर्माण केली तीच ओळख मनामध्ये घर करून राहिली होती. आपल्या राज्याला असाच नेता हवा आहे, ही भावना मनात तयार झाली होती. राज्याला सांभाळणारा नेता असाच असेल, असं वाटू लागलं होतं. पुढची अनेक वर्षे महाराष्ट्र ज्याच्या हातामध्ये बिनधास्तपणे सोपवू शकतो, असा हा नेता होता. परंतु त्याच्या अकाली जाण्याने बसलेला धक्का पचवू शकलो नाही. एखाद्या राजकीय नेत्याबद्दल पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने वाईट वाटले. कालपासून अवघा सोशल मीडिया दादांवरील बातम्यांनी आणि भरभरून लिहिल्या गेलेल्या लेखांनी ओसंडून वाहतो आहे. ही त्यांच्या कामाची आणि लोकांच्या प्रेमाची खरी पावती आहे. अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी भरून काढता येत नाही. अजितदादा देखील त्यातीलच एक. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांच्या नावाशिवाय काहीही लिहिले जाणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. शिवाय त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील नेते तयार होतील जे महाराष्ट्रा च्या प्रगतीचा वेग असाच कायम चालू ठेवतील, अशी आशा बाळगूया. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल.

--- तुषार भ. कुटे.

(कोणत्याच राजकीय नेत्याबद्दल मी आजवर काहीच लिहिलेले नाही. पण आज राहावले नाही.)


 

हॅरियर ईव्हीची पहिली ड्राईव्ह

२५ जानेवारीला संध्याकाळी पंचजन्यच्या शोरूममधून फोन आला. आमची हॅरियर ईव्ही गाडी शोरूममध्ये दाखल झाली होती. हायसे वाटले. अर्थात २७ जानेवारीला आम्हाला गाडी मिळणार होती, हे नक्की झाले. यामुळे पुढच्या तयारीला लागलो.
२६ जानेवारीला अर्थात आदल्या दिवशी कुटुंबातील सर्वच जण मोशीला घरी थांबले होते. २७ तारखेला दुपारी बारा वाजता गाडी घेऊन निघू असे नियोजन केले. रश्मी आणि मी ज्ञानोबाला आणण्यासाठी शाळेमध्ये गेलो होतो. तिथून थेट पंचजन्यच्या शोरूममध्ये गेलो. गाडी शोरूमच्या बाहेरच नेहमीच्या ठिकाणी लावलेली होती. गाडीचा क्रमांक अजून आलेला नव्हता. मागच्या वेळेस बुकिंगसाठी आलो त्यावेळेस हॅरियर गाडी पहिल्यांदाच आतून पाहिली. आज मात्र ती सर्व बाजूंनी पाहता आली. सर्व काही औपचारिकता करता करता तीन वाजून गेले होते. शिवाय संध्याकाळी राज्ञीचा वाढदिवस असल्याने लवकर गावी पोहोचणे गरजेचे होते. इथून गाडी गावी न्यायची होती. अमोलच्या आग्रहाखातर मीच गाडी चालवू लागलो. हॅरिअर ईव्ही चालवण्याचा तो माझा पहिलाच अनुभव. आमच्या नेक्सॉन ईव्ही पेक्षा ही गाडी बऱ्यापैकी मोठी, भक्कम आणि भारदस्त वाटत होती. शिवाय गाडीला घातलेला तो भला मोठा हार घेऊन आम्ही थाटाने राष्ट्रीय महामार्गावरून गावाच्या दिशेने निघालो. नेक्सॉन चालवण्याची सवय होतीच, शिवाय त्यातील बऱ्याचशा फंक्शनलिटीज मला आधीच माहीत होत्या. परंतु या गाडीमध्ये त्याहीपेक्षा अद्ययावत फंक्शन्सचा देखील भरणा होता. यानिमित्ताने मला त्याची देखील चाचणी करता आली. गाडी चालवताना वेगळी काही भीती वाटली नाही. फक्त ती सांभाळून गावी नेणे गरजेचे होते. शिवाय गाडीला क्रमांक देखील आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांपासून वाचवत ती आम्ही गावी घेऊन गेलो. एका नव्या गाडीच्या चालविण्याचा आनंद या निमित्ताने मलाही घेता आला. 
 


श्रद्धांजली अजितदादा

मागच्या तीन ते चार दिवसांपासून सतत धावपळ चालू होती. परंतु आजचा दिवस बऱ्याच दिवसांनी आरामातच होतो असंच म्हणावं लागेल. सकाळी ज्ञानोबाला शाळेत सोडून आलो. सगळ आवरलं. आणि कामाला सुरुवात करणार तोवर अजित पवारांच्या अपघाताची बातमी समाजमाध्यमांवर तसेच विविध चॅनेल्सला दिसायला लागली होती. आणि थोड्याच वेळामध्ये अजितदादांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची वार्ताही आली. सर्व काही अनपेक्षित होतं. आणि धक्कादायक देखील. अजित पवारांसारख्या नेत्याचे इतक्या लवकर जाणे मनाला पटले नाही. काही बातम्यांवर फक्त अपघात झाल्याचे दाखवत होते तर काही ठिकाणी त्यांचे निधन झाल्याचेही वृत्त होते. परंतु प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अधिकृत माहितीवर आम्ही विश्वास ठेवला. नंतर सर्वत्रच त्यांच्या निधनाची बातमी आली. मन सुन्न झाले. खरंतर अशा प्रकारची बातमी आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील कोणालाच अपेक्षित नव्हती. सातत्याने कामात गुंतलेले अजितदादा वयाच्या ६६ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यानंतरचे दोन तास फक्त टीव्हीवरच्या बातम्या पाहत होतो. कामात देखील लक्ष लागले नाही. असे कसे झाले असावे? यात काही घातपात तर नाही ना? अशाच वेगवेगळ्या प्रश्नांचे मनात काहूर माजले होते. महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करणारा आजच्या काळातील नेता हे जग सोडून गेला होता.
दुपारी पीएचडीच्या रिव्ह्यूसाठी मला कॉलेजला जायचे होते. माझा रिव्ह्यू आज नव्हताच. पण इतर दोघांच्या रिव्ह्यूसाठी जाणे भाग होते. आज सकाळच्या बातमीमुळे मी अस्वस्थ होतो. कुठे बाहेर जाण्यासाठी अनुत्सुकदेखील. तरीसुद्धा जाणे भाग होते. गाडी काढली आणि ती चालवत असतानाच सातत्याने वाटत होते की आजचा रिव्ह्यू रद्द होईल. थोड्याच वेळात समजले की आज सर्वच महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे. पण आमचा रिव्ह्यू मात्र होणार होता. आज पहिल्यांदाच इतक्या अनुत्सुकतेने महाविद्यालयात पोहोचलो. मनात अजूनही ती बातमी घर करून होती. कदाचित या वर्षातील ती सर्वात बातमी वाईट बातमी असावी.

--- तुषार भ. कुटे


 

Tuesday, January 27, 2026

'कंट्रोल झेड': चुका सुधारणारी डिजिटल जादू

संगणकाच्या कीबोर्डवर अशा अनेक कळ किंवा 'कीज' असतात, ज्यांच्या वापराने आपली कामे सोपी होतात; परंतु या सर्वांमध्ये एक अशी जोडी आहे जी केवळ काम सोपे करत नाही, तर वापरकर्त्याला मोठ्या संकटातून आणि मनस्तापातून वाचवते. ती जोडी म्हणजे 'कंट्रोल' आणि 'झेड' अर्थात 'Undo' कमांड. आजच्या डिजिटल युगात संगणकावर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही कळ एखाद्या तारणहारासारखी आहे. एखादी चूक झाली की भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण संगणकाच्या जगात या एका शॉर्टकटमुळे आपण ती चूक काही सेकंदात नाहीशी करून पुन्हा पूर्वस्थितीत येऊ शकतो.


जेव्हा आपण काही लिहित असतो, डिझाइन बनवत असतो किंवा महत्त्वाची आकडेमोड करत असतो, तेव्हा मानवी स्वभावामुळे चुका होणे अटळ असते. जुन्या काळी टाईपरायटरवर काम करताना एखादे अक्षर चुकले तर पूर्ण कागद बदलावा लागे किंवा व्हाईटनरचा वापर करावा लागे. मात्र, संगणकावर काम करताना 'कंट्रोल झेड' हे तंत्रज्ञान आपल्याला आपली चूक दुरुस्त करण्याची संधी देते. कीबोर्डवरील 'Ctrl' हे बटण दाबून धरून 'Z' हे अक्षर दाबले की आपण केलेली शेवटची कृती रद्द होते आणि आपण एक पाऊल मागे जातो. यालाच तांत्रिक भाषेत 'अनडू' (Undo) करणे असे म्हणतात.

या अप्रतिम शोधाचे श्रेय लॅरी टेस्लर या संगणक शास्त्रज्ञाला जाते. १९७० च्या दशकात झेरॉक्स पार्क या संशोधन केंद्रात काम करत असताना त्यांनी 'कट', 'कॉपी', 'पेस्ट' यांसारख्या कमांड्ससोबतच 'अनडू' या संकल्पनेचाही शोध लावला. त्या काळात संगणकावर काम करणे खूप क्लिष्ट होते आणि एखादी चूक झाल्यास पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागत असे. टेस्लर यांनी ही गरज ओळखली आणि वापरकर्त्यांना चुका सुधारण्याची संधी मिळावी यासाठी ही कमांड विकसित केली. पुढे ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये याचा समावेश केल्यामुळे आज हे बटण जगभरातील प्रत्येक संगणकाचा अविभाज्य भाग बनले आहे.

या कमांडची गंमत अशी आहे की ती केवळ शब्द पुसण्यापुरती मर्यादित नाही. जर तुम्ही चुकून एखादी फाईल डिलीट केली असेल, तर लगेच कंट्रोल झेड दाबल्यास ती फाईल परत येते. फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरमध्ये चित्र काढताना चुकीचा रंग भरला गेला किंवा रेष वाकडी झाली, तरी या कमांडमुळे चित्र पूर्ववत करता येते. थोडक्यात सांगायचे तर, संगणकाच्या मेमरीमध्ये आपण केलेल्या कृतींचा एक क्रम साठवलेला असतो. कंट्रोल झेड दाबल्यावर संगणक त्या क्रमातील शेवटची पायरी विसरतो आणि त्याआधीच्या पायरीवर आपल्याला नेऊन सोडतो.

अनेकदा असेही होते की आपण 'कंट्रोल झेड' दाबून एखादी गोष्ट पुसतो, पण नंतर लक्षात येते की ती गोष्ट बरोबरच होती. अशा वेळी घाबरण्याचे कारण नसते, कारण याला जोडूनच 'कंट्रोल वाय' (Ctrl+Y) म्हणजेच 'रिडू' (Redo) ही कमांड असते. याच्या मदतीने आपण पुसलेली गोष्ट पुन्हा परत आणू शकतो. म्हणजेच चुका सुधारणे आणि सुधारलेल्या चुका पुन्हा तपासणे, या दोन्ही गोष्टींचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते. यामुळे काम करताना एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि नवनवीन प्रयोग करण्याची भीती वाटत नाही.

या 'कंट्रोल झेड'चे तत्त्वज्ञान खूप खोल आहे. वास्तविक आयुष्यात आपण बोललेले शब्द किंवा केलेली कृती मागे घेऊ शकत नाही. एकदा बाण सुटला की तो परत येत नाही, असे आपण म्हणतो. त्यामुळेच खऱ्या आयुष्यात चुकांची किंमत मोजावी लागते. परंतु, डिजिटल जगात ही सुविधा असल्यामुळेच माणसे जास्त सर्जनशील होऊ शकली आहेत. कारण, इथे 'चूक झाली तर काय होईल?' ही भीती उरत नाही. आपण बिनधास्तपणे प्रयोग करू शकतो, कारण आपल्याला माहित असते की एक 'कंट्रोल झेड' आपल्या पाठीशी उभा आहे.

थोडक्यात सांगायचे तर, 'कंट्रोल झेड' हे केवळ कीबोर्डवरचे एक शॉर्टकट नसून, ते आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला दिलेले एक वरदान आहे. जोपर्यंत आपण संगणकावर काम करत आहोत, तोपर्यंत चुका करण्याची मुभा आपल्याला आहे आणि त्या चुकांमधूनच शिकत पुढे जाण्याची संधी ही छोटीशी कळ आपल्याला देत असते. त्यामुळेच संगणक साक्षरतेच्या धड्यात या कमांडला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

--- तुषार भ. कुटे