आपला देश म्हणजे राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यावर भरभरून प्रेम करणारा देश. परंतु, हे प्रेम सर्वांनाच मिळत नाही. आपल्या कार्यातून, व्यक्तिमत्वातून लोकांच्या मनावर राज्य करणारे अतिशय कमी लोक आपल्या देशात आहेत. त्यातीलच एक अजितदादा पवार.
सकाळी सकाळीच आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच जण सुन्न झाले. अजितदादा इतक्या लवकर जाऊच शकत नाहीत. अशीच सर्वांची भावना होती. परंतु सत्य हे कटू असते. याची जाणीव काल प्रकर्षाने झाली. ज्या व्यक्तीला आपण कधीच भेटलो नाही आणि केवळ बातम्यांमधून पाहत आलेलो आहे, त्यांच्याविषयी इतके वाईट का वाटावे? हा प्रश्न मला पडला.
खरंतर या व्यक्तीने आपल्या कामांमधून, धडाडीतून जी ओळख निर्माण केली तीच ओळख मनामध्ये घर करून राहिली होती. आपल्या राज्याला असाच नेता हवा आहे, ही भावना मनात तयार झाली होती. राज्याला सांभाळणारा नेता असाच असेल, असं वाटू लागलं होतं. पुढची अनेक वर्षे महाराष्ट्र ज्याच्या हातामध्ये बिनधास्तपणे सोपवू शकतो, असा हा नेता होता. परंतु त्याच्या अकाली जाण्याने बसलेला धक्का पचवू शकलो नाही. एखाद्या राजकीय नेत्याबद्दल पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने वाईट वाटले. कालपासून अवघा सोशल मीडिया दादांवरील बातम्यांनी आणि भरभरून लिहिल्या गेलेल्या लेखांनी ओसंडून वाहतो आहे. ही त्यांच्या कामाची आणि लोकांच्या प्रेमाची खरी पावती आहे. अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी भरून काढता येत नाही. अजितदादा देखील त्यातीलच एक. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांच्या नावाशिवाय काहीही लिहिले जाणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. शिवाय त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील नेते तयार होतील जे महाराष्ट्रा च्या प्रगतीचा वेग असाच कायम चालू ठेवतील, अशी आशा बाळगूया. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल.
--- तुषार भ. कुटे.
(कोणत्याच राजकीय नेत्याबद्दल मी आजवर काहीच लिहिलेले नाही. पण आज राहावले नाही.)
विज्ञानेश्वरी
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥
Thursday, January 29, 2026
अजितदादा
हॅरियर ईव्हीची पहिली ड्राईव्ह
२६ जानेवारीला अर्थात आदल्या दिवशी कुटुंबातील सर्वच जण मोशीला घरी थांबले होते. २७ तारखेला दुपारी बारा वाजता गाडी घेऊन निघू असे नियोजन केले. रश्मी आणि मी ज्ञानोबाला आणण्यासाठी शाळेमध्ये गेलो होतो. तिथून थेट पंचजन्यच्या शोरूममध्ये गेलो. गाडी शोरूमच्या बाहेरच नेहमीच्या ठिकाणी लावलेली होती. गाडीचा क्रमांक अजून आलेला नव्हता. मागच्या वेळेस बुकिंगसाठी आलो त्यावेळेस हॅरियर गाडी पहिल्यांदाच आतून पाहिली. आज मात्र ती सर्व बाजूंनी पाहता आली. सर्व काही औपचारिकता करता करता तीन वाजून गेले होते. शिवाय संध्याकाळी राज्ञीचा वाढदिवस असल्याने लवकर गावी पोहोचणे गरजेचे होते. इथून गाडी गावी न्यायची होती. अमोलच्या आग्रहाखातर मीच गाडी चालवू लागलो. हॅरिअर ईव्ही चालवण्याचा तो माझा पहिलाच अनुभव. आमच्या नेक्सॉन ईव्ही पेक्षा ही गाडी बऱ्यापैकी मोठी, भक्कम आणि भारदस्त वाटत होती. शिवाय गाडीला घातलेला तो भला मोठा हार घेऊन आम्ही थाटाने राष्ट्रीय महामार्गावरून गावाच्या दिशेने निघालो. नेक्सॉन चालवण्याची सवय होतीच, शिवाय त्यातील बऱ्याचशा फंक्शनलिटीज मला आधीच माहीत होत्या. परंतु या गाडीमध्ये त्याहीपेक्षा अद्ययावत फंक्शन्सचा देखील भरणा होता. यानिमित्ताने मला त्याची देखील चाचणी करता आली. गाडी चालवताना वेगळी काही भीती वाटली नाही. फक्त ती सांभाळून गावी नेणे गरजेचे होते. शिवाय गाडीला क्रमांक देखील आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांपासून वाचवत ती आम्ही गावी घेऊन गेलो. एका नव्या गाडीच्या चालविण्याचा आनंद या निमित्ताने मलाही घेता आला.
श्रद्धांजली अजितदादा
मागच्या तीन ते चार दिवसांपासून सतत धावपळ चालू होती. परंतु आजचा दिवस बऱ्याच दिवसांनी आरामातच होतो असंच म्हणावं लागेल. सकाळी ज्ञानोबाला शाळेत सोडून आलो. सगळ आवरलं. आणि कामाला सुरुवात करणार तोवर अजित पवारांच्या अपघाताची बातमी समाजमाध्यमांवर तसेच विविध चॅनेल्सला दिसायला लागली होती. आणि थोड्याच वेळामध्ये अजितदादांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची वार्ताही आली. सर्व काही अनपेक्षित होतं. आणि धक्कादायक देखील. अजित पवारांसारख्या नेत्याचे इतक्या लवकर जाणे मनाला पटले नाही. काही बातम्यांवर फक्त अपघात झाल्याचे दाखवत होते तर काही ठिकाणी त्यांचे निधन झाल्याचेही वृत्त होते. परंतु प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अधिकृत माहितीवर आम्ही विश्वास ठेवला. नंतर सर्वत्रच त्यांच्या निधनाची बातमी आली. मन सुन्न झाले. खरंतर अशा प्रकारची बातमी आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील कोणालाच अपेक्षित नव्हती. सातत्याने कामात गुंतलेले अजितदादा वयाच्या ६६ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यानंतरचे दोन तास फक्त टीव्हीवरच्या बातम्या पाहत होतो. कामात देखील लक्ष लागले नाही. असे कसे झाले असावे? यात काही घातपात तर नाही ना? अशाच वेगवेगळ्या प्रश्नांचे मनात काहूर माजले होते. महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करणारा आजच्या काळातील नेता हे जग सोडून गेला होता.
दुपारी पीएचडीच्या रिव्ह्यूसाठी मला कॉलेजला जायचे होते. माझा रिव्ह्यू आज नव्हताच. पण इतर दोघांच्या रिव्ह्यूसाठी जाणे भाग होते. आज सकाळच्या बातमीमुळे मी अस्वस्थ होतो. कुठे बाहेर जाण्यासाठी अनुत्सुकदेखील. तरीसुद्धा जाणे भाग होते. गाडी काढली आणि ती चालवत असतानाच सातत्याने वाटत होते की आजचा रिव्ह्यू रद्द होईल. थोड्याच वेळात समजले की आज सर्वच महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे. पण आमचा रिव्ह्यू मात्र होणार होता. आज पहिल्यांदाच इतक्या अनुत्सुकतेने महाविद्यालयात पोहोचलो. मनात अजूनही ती बातमी घर करून होती. कदाचित या वर्षातील ती सर्वात बातमी वाईट बातमी असावी.
--- तुषार भ. कुटे
Tuesday, January 27, 2026
'कंट्रोल झेड': चुका सुधारणारी डिजिटल जादू
संगणकाच्या कीबोर्डवर अशा अनेक कळ किंवा 'कीज' असतात, ज्यांच्या वापराने आपली कामे सोपी होतात; परंतु या सर्वांमध्ये एक अशी जोडी आहे जी केवळ काम सोपे करत नाही, तर वापरकर्त्याला मोठ्या संकटातून आणि मनस्तापातून वाचवते. ती जोडी म्हणजे 'कंट्रोल' आणि 'झेड' अर्थात 'Undo' कमांड. आजच्या डिजिटल युगात संगणकावर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही कळ एखाद्या तारणहारासारखी आहे. एखादी चूक झाली की भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण संगणकाच्या जगात या एका शॉर्टकटमुळे आपण ती चूक काही सेकंदात नाहीशी करून पुन्हा पूर्वस्थितीत येऊ शकतो.
जेव्हा आपण काही लिहित असतो, डिझाइन बनवत असतो किंवा महत्त्वाची आकडेमोड करत असतो, तेव्हा मानवी स्वभावामुळे चुका होणे अटळ असते. जुन्या काळी टाईपरायटरवर काम करताना एखादे अक्षर चुकले तर पूर्ण कागद बदलावा लागे किंवा व्हाईटनरचा वापर करावा लागे. मात्र, संगणकावर काम करताना 'कंट्रोल झेड' हे तंत्रज्ञान आपल्याला आपली चूक दुरुस्त करण्याची संधी देते. कीबोर्डवरील 'Ctrl' हे बटण दाबून धरून 'Z' हे अक्षर दाबले की आपण केलेली शेवटची कृती रद्द होते आणि आपण एक पाऊल मागे जातो. यालाच तांत्रिक भाषेत 'अनडू' (Undo) करणे असे म्हणतात.
या अप्रतिम शोधाचे श्रेय लॅरी टेस्लर या संगणक शास्त्रज्ञाला जाते. १९७० च्या दशकात झेरॉक्स पार्क या संशोधन केंद्रात काम करत असताना त्यांनी 'कट', 'कॉपी', 'पेस्ट' यांसारख्या कमांड्ससोबतच 'अनडू' या संकल्पनेचाही शोध लावला. त्या काळात संगणकावर काम करणे खूप क्लिष्ट होते आणि एखादी चूक झाल्यास पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागत असे. टेस्लर यांनी ही गरज ओळखली आणि वापरकर्त्यांना चुका सुधारण्याची संधी मिळावी यासाठी ही कमांड विकसित केली. पुढे ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये याचा समावेश केल्यामुळे आज हे बटण जगभरातील प्रत्येक संगणकाचा अविभाज्य भाग बनले आहे.
या कमांडची गंमत अशी आहे की ती केवळ शब्द पुसण्यापुरती मर्यादित नाही. जर तुम्ही चुकून एखादी फाईल डिलीट केली असेल, तर लगेच कंट्रोल झेड दाबल्यास ती फाईल परत येते. फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरमध्ये चित्र काढताना चुकीचा रंग भरला गेला किंवा रेष वाकडी झाली, तरी या कमांडमुळे चित्र पूर्ववत करता येते. थोडक्यात सांगायचे तर, संगणकाच्या मेमरीमध्ये आपण केलेल्या कृतींचा एक क्रम साठवलेला असतो. कंट्रोल झेड दाबल्यावर संगणक त्या क्रमातील शेवटची पायरी विसरतो आणि त्याआधीच्या पायरीवर आपल्याला नेऊन सोडतो.
अनेकदा असेही होते की आपण 'कंट्रोल झेड' दाबून एखादी गोष्ट पुसतो, पण नंतर लक्षात येते की ती गोष्ट बरोबरच होती. अशा वेळी घाबरण्याचे कारण नसते, कारण याला जोडूनच 'कंट्रोल वाय' (Ctrl+Y) म्हणजेच 'रिडू' (Redo) ही कमांड असते. याच्या मदतीने आपण पुसलेली गोष्ट पुन्हा परत आणू शकतो. म्हणजेच चुका सुधारणे आणि सुधारलेल्या चुका पुन्हा तपासणे, या दोन्ही गोष्टींचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते. यामुळे काम करताना एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि नवनवीन प्रयोग करण्याची भीती वाटत नाही.
या 'कंट्रोल झेड'चे तत्त्वज्ञान खूप खोल आहे. वास्तविक आयुष्यात आपण बोललेले शब्द किंवा केलेली कृती मागे घेऊ शकत नाही. एकदा बाण सुटला की तो परत येत नाही, असे आपण म्हणतो. त्यामुळेच खऱ्या आयुष्यात चुकांची किंमत मोजावी लागते. परंतु, डिजिटल जगात ही सुविधा असल्यामुळेच माणसे जास्त सर्जनशील होऊ शकली आहेत. कारण, इथे 'चूक झाली तर काय होईल?' ही भीती उरत नाही. आपण बिनधास्तपणे प्रयोग करू शकतो, कारण आपल्याला माहित असते की एक 'कंट्रोल झेड' आपल्या पाठीशी उभा आहे.
थोडक्यात सांगायचे तर, 'कंट्रोल झेड' हे केवळ कीबोर्डवरचे एक शॉर्टकट नसून, ते आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला दिलेले एक वरदान आहे. जोपर्यंत आपण संगणकावर काम करत आहोत, तोपर्यंत चुका करण्याची मुभा आपल्याला आहे आणि त्या चुकांमधूनच शिकत पुढे जाण्याची संधी ही छोटीशी कळ आपल्याला देत असते. त्यामुळेच संगणक साक्षरतेच्या धड्यात या कमांडला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
--- तुषार भ. कुटे
Sunday, January 25, 2026
क्रांतीज्योती आणि प्रमोशन
मराठी चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहीत, अशी अनेकांची बोंब असते. मराठी चित्रपट हे उत्तम असतातच. किमान ८० टक्के तरी! मग चित्रपटगृहामध्ये गल्ला जमवण्यासाठी ते कमी का पडतात? या प्रश्नाचे उत्तर कदाचित मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना माहीत असावे. परंतु तरीदेखील आपला चित्रपट चालावा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्यांनी पहावा यासाठी ते कष्ट घेत नाहीत.
सन २०२५ मध्ये जेवढे मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले त्या सर्वांची एकत्रित कमाई जवळपास ९८ ते ९९ कोटी रुपये होती. एवढी कमाई दक्षिणेतले अनेक चित्रपट सहज करत आलेले आहेत. मग मराठी चित्रपटांना हे साध्य का होत नसावे? मूलतः मराठी चित्रपट हे प्रमोशनसाठी कमी पडतात, हे निर्विवाद सत्य आहे. चित्रपट बनवला, नंतर वितरकांना दिला आणि थिएटरला लागला की लोक आपोआप आपला चित्रपट बघायला येतील, असे निर्मात्यांना वाटत असते. शिवाय अतिशय कमी बजेटमध्ये चित्रपट तयार झालेला असतो. त्यात चित्रपट महामंडळाचे अनुदान देखील असते. म्हणून थोडी का होईना लाखांमध्ये कमाई झाली तरी चित्रपटाचे पैसे वसूल होतात. कदाचित याच कारणास्तव चित्रपटाचे प्रमोशन करण्यास निर्माते, दिग्दर्शक कमी पडत असावेत. ही निर्मात्यांची मानसिकताच तयार झाली आहे, असं दिसतं. याउलट अन्य भाषेतील चित्रपट त्यांच्या प्रदेशामध्ये तसेच दूरचित्रवाणीद्वारे, रेडिओद्वारे आणि भेटीगाठी व कार्यक्रमांद्वारे देखील चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करतात. ही गोष्ट मराठी चित्रपटांच्या बाबतीत अगदीच नगण्य आहे.
सध्या मराठी चित्रसृष्टीमध्ये कमाईचे कोटीच्या कोटी आकडे पार करणारा चित्रपट म्हणजे "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" होय. या चित्रपटाचा विषय उत्तम आहेच. मांडणी देखील छान आहे. विषय तर अप्रतिमच आहे. परंतु चित्रपटाच्या चमुने तो प्रदर्शित झाल्यानंतर ज्या वेगाने, सातत्याने, वैविध्याने त्याचे प्रमोशन केले आहे, त्यामुळेच अजूनही चित्रपटगृहात गर्दी खेचताना दिसतो. आज त्याची कमाई २० कोटीच्या वर गेलेली आहे. ती का? तर यामागे दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षिति जोग आणि चित्रपटातील अन्य कलाकारांनी त्याच्या प्रमोशनवर घेतलेले कष्टच कारणीभूत आहेत. अनेकदा निर्माते आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केवळ मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागातच करतात. कारण या बाहेरील शहरांमध्ये त्यांना हव्या त्या सुविधा कदाचित मिळत नसाव्यात. किंबहुना मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांविषयी अनुत्सुक असावेत. पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याशिवाय त्यांना आपला चित्रपट समजणार कसा? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधायला हवे. 'क्रांतीज्योती'च्या पूर्ण संघाने महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जाऊन चित्रपटगृहांमध्ये पोहोचून त्याचे प्रमोशन केले. शिवाय चित्रपटाच्या विषयाशी निगडित असणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना, रिलस्टार्सना आणि समाज माध्यमांवर लोकप्रिय असणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांनी सोबत घेतले होते. त्या सर्वांच्या समाजमाध्यमांवरील पानांवर चित्रपटाचे प्रमोशन झाले. सातत्याने या चित्रपटातील कलाकार त्यांच्या समाजमाध्यमांवरील अकाउंटवर विविध पोस्ट करत होते. लोकप्रिय गाण्यांवरती रिल्स तयार होत होते. म्हणूनच चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आणि अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचत आहे.
मागच्या वर्षी सर्व मराठी चित्रपटांनी केवळ ९८ कोटी कमावले होते तर यावर्षी पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाल्याने चित्रपटाने २० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी एक धडा आहे आणि शिकवण देखील. केवळ 'माऊथ पब्लिसिटी'च्या जोरावर सर्वच चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्या चित्रपट हे उत्तम असतातच. परंतु ते बनवून आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करून फायदा नाही. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. त्यासाठी प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतरही प्रमोशनच्या विविध क्लुप्त्या त्यांना निश्चितच वापराव्या लागतील. लोकांना दिग्दर्शक आणि कलाकार माहीत झाल्यानंतर पुढील चित्रपटाची ते निश्चितच प्रतीक्षा करतील. हे समजून घेतले पाहिजे. बाकी मराठी चित्रपटसृष्टी गुणवत्तेच्या बाबतीत कोणाच्याही मागे नाही. फक्त आपल्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे वाटते.
--- तुषार भ. कुटे
Friday, January 23, 2026
कॅप्चा: इंटरनेटच्या विश्वातील आपला विश्वासू डिजिटल पहारेकरी
आपण जेव्हाही इंटरनेटवर एखादा फॉर्म भरतो, नवीन खाते उघडतो किंवा ऑनलाईन तिकीट काढायला जातो, तेव्हा आपल्याला एक छोटीशी पण विचित्र अडचण हमखास येते. आपल्याला काही वाकडीतिकडी अक्षरे ओळखायला सांगितली जातात किंवा 'ट्रॅफिक सिग्नल' कुठे आहेत हे चित्रात शोधायला लावले जाते. कधीकधी तर फक्त "मी रोबोट नाही" (I am not a robot) अशा चौकटीवर क्लिक करायला सांगितले जाते. यालाच तांत्रिक भाषेत "कॅप्चा" (CAPTCHA) असे म्हणतात. हे पाहिल्यावर आपल्याला कधीकधी वैताग येतो, पण इंटरनेटच्या सुरक्षिततेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
कॅप्चा म्हणजे नक्की काय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला इंटरनेटवर घडणाऱ्या एका मोठ्या समस्येकडे बघावे लागेल. इंटरनेटवर जसे सामान्य माणसे माहिती शोधतात, तसेच काही स्वयंचलित प्रोग्रॅम देखील फिरत असतात, ज्यांना आपण 'बॉट' (Bot) असे म्हणतो. हे बॉट्स माणसापेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम करू शकतात. जर एखाद्या हॅकरने असा बॉट बनवला की जो एका सेकंदात हजारो बनावट ईमेल आयडी तयार करेल किंवा एखाद्या वेबसाईटवर हजारो स्पॅम कमेंट्स करेल, तर ती वेबसाईट क्रॅश होऊ शकते किंवा तिचा गैरवापर होऊ शकतो. हे रोखण्यासाठी, समोर संगणक वापरणारा "माणूस" आहे की "बॉट", हे ओळखणे गरजेचे झाले. यासाठी जी चाचणी तयार करण्यात आली, तिलाच 'कॅप्चा' म्हणतात. कॅप्चाचा फुल फॉर्म आहे - "Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart." सोप्या भाषेत सांगायचे तर, ही संगणक आणि माणूस यांच्यातील फरक ओळखणारी एक चाचणी आहे.
कॅप्चाचा इतिहास अतिशय रंजक आहे. याची सुरुवात साधारणपणे २००० च्या दशकात झाली. त्याकाळी 'याहू' ही जगातील सर्वात मोठी ईमेल सेवा होती. त्यांना एक मोठी समस्या भेडसावत होती. हॅकर्सनी बनवलेले स्वयंचलित प्रोग्रॅम (बॉट्स) याहूवर हजारो बनावट ईमेल खाती उघडत होते आणि त्याद्वारे स्पॅम पसरवत होते. यावर उपाय शोधण्यासाठी कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीचे लुईस फोन अहन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक युक्ती शोधली. त्यांनी पाहिले की, संगणकाला सरळ छापलेली अक्षरे वाचता येतात, पण जर तीच अक्षरे वाकडीतिकडी केली, त्यावर काही रेषा मारल्या किंवा पार्श्वभूमी बदलली, तर संगणकाला ती ओळखता येत नाहीत. मात्र, मानवी मेंदू ती सहज ओळखू शकतो. या तत्त्वाचा वापर करून त्यांनी पहिला कॅप्चा तयार केला. यामध्ये वापरकर्त्याला वाकडीतिकडी अक्षरे टाईप करायला लावली जात असत. यामुळे बॉट्सना रोखण्यात मोठे यश मिळाले.
पण गोष्ट इथेच थांबली नाही. या संशोधकांनी विचार केला की, कोट्यवधी लोक रोज कॅप्चा सोडवण्यासाठी काही सेकंद खर्च करतात. या वेळेचा काही चांगला उपयोग होऊ शकतो का? या विचारातून 'री-कॅप्चा' (reCAPTCHA) चा जन्म झाला. आपण पाहिले असेल की, जुन्या काळात कॅप्चामध्ये दोन शब्द यायचे. त्यातील एक शब्द संगणकाला माहित असायचा, पण दुसरा शब्द हा जुन्या स्कॅन केलेल्या पुस्तकांमधील असायचा जो संगणकाला वाचता येत नव्हता. जेव्हा लाखो लोक तो दुसरा शब्द एकाच प्रकारे टाईप करायचे, तेव्हा गुगलला खात्री पटायची की हा शब्द काय आहे. अशा प्रकारे, आपण कॅप्चा सोडवताना कळत-नकळत जुनी पुस्तके आणि वर्तमानपत्रे डिजिटाईज करायला मदत करत होतो. न्यूयॉर्क टाइम्सची अनेक जुनी कागदपत्रे याच पद्धतीने डिजिटल स्वरूपात जतन केली गेली आहेत.
कालांतराने तंत्रज्ञान प्रगत झाले आणि बॉट्स देखील हुशार झाले. 'ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन' (OCR) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संगणक सुद्धा वाकडीतिकडी अक्षरे वाचायला शिकले. त्यामुळे अक्षरांच्या कॅप्चाचा प्रभाव कमी होऊ लागला. मग गुगलने चित्रांचा वापर सुरू केला. यामध्ये आपल्याला "चित्रातील कार ओळखा", "बस ओळखा" किंवा "क्रॉसवाक ओळखा" असे प्रश्न विचारले जाऊ लागले. हे बॉट्ससाठी खूप कठीण होते कारण चित्रातील वस्तू ओळखणे हे मानवी मेंदूचे खास कौशल्य आहे. विशेष म्हणजे, याद्वारे आपण गुगलच्या ड्रायव्हरलेस कारला रस्ते आणि वस्तू ओळखण्याचे प्रशिक्षण देत होतो.
आजच्या काळात कॅप्चा आणखी सोपा आणि प्रगत झाला आहे. आता आपल्याला फक्त एका चेकबॉक्सवर क्लिक करावे लागते, ज्यावर लिहिलेले असते "मी रोबोट नाही". याला "नो कॅप्चा री-कॅप्चा" (No CAPTCHA reCAPTCHA) म्हणतात. हे वरकरणी सोपे वाटत असले तरी, यामागे खूप मोठे तंत्रज्ञान आहे. जेव्हा आपण माउस कर्सर त्या चेकबॉक्सकडे नेतो, तेव्हा आपली माउस हलवण्याची पद्धत गुगल तपासते. माणूस माउस हलवताना थोडा वेडावाकडा किंवा अनियंत्रित असतो, तर बॉट एकदम सरळ रेषेत आणि अचूक जातो. या सूक्ष्म हालचालींवरून आणि आपल्या ब्राऊझिंग हिस्टरीवरून गुगल ओळखते की आपण माणूस आहोत. जर गुगलला थोडी जरी शंका आली, तरच ते आपल्याला पुन्हा चित्रे ओळखायला सांगते.
सध्या तर 'इन्व्हिजिबल कॅप्चा' (Invisible CAPTCHA) नावाचे तंत्रज्ञान येत आहे, जिथे आपल्याला काहीच करावे लागत नाही. हे तंत्रज्ञान पार्श्वभूमीमध्ये राहूनच वापरकर्त्याच्या वागण्यावरून ठरवते की तो माणूस आहे की बॉट.
कॅप्चाचा आजचा उपयोग फक्त ईमेल खाते उघडण्यापुरता मर्यादित नाही. ऑनलाईन बँकिंगमध्ये व्यवहार सुरक्षित करण्यासाठी, ऑनलाईन पोलमध्ये एकाच व्यक्तीने वारंवार मते देऊ नयेत म्हणून, ब्लॉगवर स्पॅम कमेंट्स रोखण्यासाठी आणि तिकीट बुकिंगच्या वेळी काळाबाजार करणाऱ्या सॉफ्टवेअरना रोखण्यासाठी कॅप्चा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जोपर्यंत इंटरनेटवर हॅकर्स आणि स्पॅम बॉट्स आहेत, तोपर्यंत कॅप्चासारख्या सुरक्षा रक्षकाची आपल्याला गरज भासणार आहे. हे एक सतत चालणारे युद्ध आहे, जिथे बॉट्स हुशार होत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी कॅप्चा देखील अधिक स्मार्ट होत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कॅप्चा सोडवावा लागेल, तेव्हा लक्षात ठेवा की ती केवळ एक अडचण नसून, तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी उभी केलेली एक मजबूत भिंत आहे.
(आधारित)
-- तुषार भ. कुटे.
पुणे ग्रँड टूर २०२६
पुणे ग्रँड टूर २०२६ ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह आजूबाजूच्या अनेक तालुक्यांमधून या स्पर्धेचा मार्ग होता. यावर्षी पहिल्यांदाच पुण्यामध्ये ही शहर ही स्पर्धा आयोजित केली असल्यामुळे पुणेकरांचा उत्साह काही वेगळाच होता. समाजमाध्यमांवरील अनेक पोस्टद्वारे ही स्पर्धा बहुतांश लोकांपर्यंत पोहोचली. शिवाय ज्या मार्गाने सायकलपटू जात होते त्याच्या दोन्ही बाजूंना ही स्पर्धा पाण्यासाठी तसेच सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुणेकरांची बरीच मोठी गर्दी पाहायला मिळाली. अगदी ग्रामीण भागामध्ये देखील नागरिकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
मलासुद्धा काही सेकंद का होईना हा अनुभव घेता आला. आज अखेरच्या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर केवळ दहाच मिनिटांमध्ये सायकलपटुंचा जत्था पाषाण रोडवरून पुणे विद्यापीठाच्या दिशेने गेला. यावेळी नेहमीच ओस पडलेल्या भागावर देखील मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करून होते. सायकलपटूंना प्रोत्साहन देत होते. आणि विशेष म्हणजे या एकंदरीत क्रीडासणाचा आनंद देखील घेत होते. एका अर्थाने आपल्या शहरातील नागरिक सुजाण आहेत अशी प्रतिमा परदेशी सायकलपटूंसमोर तयार झाली असावी, यात वाद नाही.
जेव्हा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा शहरांमध्ये होतात त्यावेळेस त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. सायकलिंग हा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही. परंतु त्याला कोणी फारसे गांभीर्याने देखील घेत नाही. या निमित्ताने का होईना सर्वसामान्य नागरिकांना या क्रीडा प्रकारातले वेगळेपण निश्चितच दिसून आले असावे. शिवाय क्रीडापटूंची मेहनत, कणखरता, सातत्य यांचा देखील अनुमान आला असावा, अशी आशा वाटते.
--- तुषार भ. कुटे
आजि मी स्वच्छ शहरे पाहिली!
आज पुणे ग्रँड टूर स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि पुण्यातले रस्ते बंद करण्याचा पण.... याचं वेळापत्रक कालच आलं होतं. सकाळी नऊ वाजल्यापासूनच पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले बरेचसे रस्ते बंद होणार होते. त्यामुळे जोखीम नको म्हणून सकाळी साडेसात वाजताच बाईक घेऊन मार्गस्थ झालो.
मागच्या काही दिवसांपासून या स्पर्धेच्या तयारीची क्षणचित्रे शहरांमधल्या रस्त्यांवरून अनुभवत होतो. आज ती पूर्णतः पाहायला मिळाली. देहू-आळंदी रस्ता पार करून स्पाईन रोडला लागलो. गेली कित्येक वर्षांपासून पहिल्यांदाच हा रस्ता छान नटलेला दिसत होता. रस्त्यावर कुठेही घाण नाही. अगदी रस्त्यांच्या झाडांचा पालापाचोळा देखील पडलेला नव्हता. सकाळी सकाळीच स्वच्छता कर्मचारी तो साफ करत होते. थोड्याच वेळात भोसरी एमआयडीसी मधून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागलो. एमआयडीसीतल्या कंपन्यांमधून येणाऱ्या धुराचा आणि केमिकलचा वास घेत टाटा मोटर्सच्या रस्त्यावर पोहोचलो. आज या रस्त्यावर गाडी चालवण्याची अनुभूती काहीतरी वेगळीच होती. काळे कुळकळीत आणि सपाट गुळगुळीत रस्त्यांवरून सुसाट वेगाने गाडी चालवू लागलो. दुभाजक चक्क पाण्याने धुऊन काढलेले होते! त्यांच्यावर काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे देखील मारले होते. मागच्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाणी पिऊन दुभाजकावर लावलेली झाडे सुंदर टवटवीत दिसू लागली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सफाई कर्मचारी अजूनही कचरा झाडून घेत होते. कुठेही कोणत्या प्रकारचे अतिक्रमण नाही. सकाळी सकाळी पादचारी देखील पदपथाचा अर्थात फुटपाथचा वापर करत होते. रोज रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या गाड्या आज तिथे पार्क केलेल्या नव्हत्या. रस्त्याकडेच्या बांधकाम विभागाच्या सर्व फलकांवर पुणे ग्रँड टूरचा शुभंकर आणि बोधचिन्ह लावलेले होते. रस्ता इतका गुळगुळीत की सायकल स्वाराच्या बाटलीतील पाणीदेखील हलणार नाही. इतके दिवस सायकल चालवतोय पण अशा रस्त्यांवर सायकल चालवण्याची संधी कधीच मिळाली नाही, याची मात्र वाईट वाटले.
झोपडपट्टीची वस्ती असलेल्या ठिकाणी पूर्ण रस्त्याला पांढरे कापड लावलेले होते. गरिबी मिटवण्याऐवजी ती झाकण्यास सोपे असते, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. थोड्याच वेळात पुन्हा एमआयडीसीमध्ये घुसलो आणि रस्त्यांची श्रीमंती गरिबीमध्ये बदलून गेली. पुणे-नाशिक महामार्गावर तीच वर्दळ चालू होती. इथला कचरा तसाच होता. पालापाचोळा कित्येक दिवसांपासून तसाच रस्त्याच्या कडेला पडलेला होता. आजूबाजूची वाहनेच त्याची हालचाल करवत होती.
नाशिक फाट्यावरून दापोडी आणि पुढे नदी ओलांडून बोपोडीच्या पुलाखालून पुणे विद्यापीठाच्या दिशेला लागलो. नदीच्या काठावर इथे येणारी दुर्गंधी तशीच होती. कदाचित सायकलस्वारांची वारी या रस्त्याने जात नसावी, हे समजले. अनाधिकृत फलकमुक्त झालेल्या पिंपरी-चिंचवड मधून पुणे मनपा हद्दीमध्ये पोचल्यावर नवनियुक्त नगरसेवकांच्या अभिनंदनचे भलेमोठे फलक पुन्हा दृष्टीस पडले. कदाचित हा देखील सायकल स्वारीचा मार्ग नव्हता. मग स्पायसर चौक, ब्रेमेन चौक करत पुणे विद्यापीठ रस्त्याला लागलो. आणि पुणे महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांची लगबग दिसायला लागली. आजूबाजूच्या भिंती छानपणे रंगवलेल्या त्यावर पुन्हा बोधचिन्ह आणि शुभंकर...! रस्त्यावर रोज मुक्तपणे संचार करणारी आणि एकमेकांवर सतत कुरघोडी करत भुंकणारी भटकी कुत्री आज एका कोपऱ्यामध्ये घोळका करून उत्सुकतेने पाहत होती. आज त्यांना कदाचित मारून मुटकून एका जागेवर बसवले असावे! आज कोणता सण आहे की काय? याची उत्सुकता त्यांच्या डोळ्यात देखील दिसत होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रस्ते देखील तसेच काळे कुळकुळीत आणि सपाट गुळगुळीत....
पाषाण रोडवर रस्त्याला मारलेले पांढरे पट्टे अतिशय उठून दिसत होते. आज पहिल्यांदाच लक्षात आले की हा रस्ता तब्बल चार पदरी आहे! इथल्या ही दोन्ही बाजूंना भिंतीवर रंगवलेले शुभंकर आणि बोधचिन्ह पुन्हा मिरवत होते. मागच्या बऱ्याच वर्षांपासून पाहत आलेले फळविक्रेते त्यांच्या अतिक्रमण केलेल्या फुटपाथवर दोन दिवसांपासून नव्हते. ती जागा अतिशय स्वच्छ आणि रंगवलेली दिसली....
इच्छितस्थळी पोहोचलो तेव्हा या सर्वांचा विचार केला. आपल्याकडच्या प्रशासन प्रणाली सर्वकाही करू शकतात. शहरे स्वच्छ ठेवता येतात. अतिक्रमण मुक्त करता येतात. सर्वकाही शिस्तबद्ध चालवता येऊ शकतं. शहरी जीवनमान वाहतूक सुसह्य करता येऊ शकते. पण प्रशासन ते करत नाही. जेव्हा गरज असेलच तेव्हाच ही यंत्रणा पूर्ण शक्तीनिशी कार्यरत होते. एकदा सर्वकाही संपलं की पुन्हा जैसे थे!
--- तुषार भ. कुटे






