Wednesday, February 4, 2026

एआय स्लॉप : डिजिटल जगातला कचरा

एआय स्लॉप म्हणजे काय आणि हे डिजिटल जगतासाठी नेमके किती घातक आहे, यावर आज सखोल चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, एआय स्लॉप म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मोठ्या प्रमाणात तयार केलेला असा कचरा किंवा दर्जाहीन आशय, ज्याचा मुख्य उद्देश वाचकांना मूल्य देणे हा नसून केवळ जाहिरातींतून पैसे कमावणे किंवा इंटरनेटवरील अल्गोरिदमला फसवणे हा असतो. ज्याप्रमाणे आपण ताटात पडलेल्या नको असलेल्या अन्नाला किंवा अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्याला एक तुच्छतेने पाहतो, अगदी तसेच हे स्लॉप सध्या सोशल मीडिया आणि गुगल सर्चच्या पानापानांवर पसरलेले दिसते.

या प्रक्रियेची सुरुवात अत्यंत साध्या हेतूने होते. एखादा व्यक्ती किंवा संस्था एआय टूल्सना काही कीवर्ड्स देते आणि त्यातून हजारो लेख, चित्रे किंवा व्हिडिओ तयार केले जातात. यामध्ये कल्पकता, सत्यता किंवा मानवी भावनेचा लवलेशही नसतो. हे तंत्रज्ञान इतक्या वेगाने काम करते की, एका दिवसात लाखो शब्द लिहिले जाऊ शकतात. पण जेव्हा एखादा सामान्य वाचक हा मजकूर वाचायला घेतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्यात मांडलेले मुद्दे वारंवार तेच ते आहेत, माहितीमध्ये परस्परविरोधी विधाने आहेत किंवा लेखनाचा ओघ इतका कृत्रिम आहे की तो वाचताना डोक्याला त्रास होतो. ही केवळ शब्दांची जुळवाजुळव असते, ज्यात अर्थाचा गाभा हरवलेला असतो.

एआय स्लॉपचा सर्वात मोठा फटका माहितीच्या विश्वासार्हतेला बसत आहे. आज आपण जेव्हा एखादी महत्त्वाची माहिती इंटरनेटवर शोधतो, तेव्हा पहिल्या काही निकालांमध्ये असे लेख दिसतात जे दिसायला खूप मोठे आणि माहितीपूर्ण वाटतात, पण प्रत्यक्षात ते केवळ शब्दांचे जंजाळ असते. यामुळे संशोधक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांची दिशाभूल होते. चुकीची वैद्यकीय माहिती, ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड आणि विसंगत सल्ले यामुळे समाजाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. हे स्लॉप तयार करणारे लोक केवळ 'क्लिकबेट'च्या मागे असतात, म्हणजे तुम्हाला अशा हेडलाईन दाखवल्या जातात की तुम्ही त्यावर क्लिक कराच, पण आत गेल्यावर मात्र हाताला काहीच लागत नाही.

दृष्य माध्यमांमध्ये तर याचा प्रभाव अधिकच स्पष्टपणे जाणवतो. फेसबुक किंवा इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर आजकाल विचित्र वाटणारी एआय निर्मित चित्रे दिसतात, जसे की सहा बोटांचे हात असलेली माणसे किंवा निसर्गाचे अतिरंजित आणि अशक्य वाटणारे फोटो. ही चित्रे पाहताना सुरुवातीला ती सुंदर वाटू शकतात, पण बारकाईने पाहिल्यास त्यातील दोष उघड होतात. दुर्दैवाने, अनेक ज्येष्ठ नागरिक किंवा तंत्रज्ञानाची कमी जाण असलेले लोक या चित्रांना खरे मानून त्यावर कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पाडतात. यामुळे ही यंत्रणा अधिकच बळकट होते आणि खऱ्या कलाकारांच्या कामाला मागे सारून हा कृत्रिम कचरा वरच्या क्रमांकावर येतो.

हे थांबवणे का कठीण आहे, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. इंटरनेटवरील जाहिरातींचे गणित हे 'व्ह्यूज'वर अवलंबून असते. जो मजकूर जास्त पाहिला जातो, तिथे जास्त जाहिराती येतात. एआय स्लॉप तयार करण्यासाठी मानवी श्रमांची गरज कमी असते आणि तो स्वस्त दरात प्रचंड प्रमाणात तयार करता येतो. जोपर्यंत हे फायद्याचे गणित सुरू राहील, तोपर्यंत हे थांबवणे कठीण आहे. मात्र, वाचक म्हणून आपण अधिक सजग होणे हाच यावरचा सध्याचा प्रभावी उपाय आहे. ज्या मजकुरात मानवी संवेदना नाहीत, जो केवळ माहितीचा पाढा वाचल्यासारखा वाटतो किंवा ज्यातील फोटो वास्तवापासून खूप लांब आहेत, अशा गोष्टींना प्रोत्साहन देणे टाळले पाहिजे.

शेवटी, तंत्रज्ञान हे मानवाच्या मदतीसाठी आहे, त्याच्या बुद्धिमत्तेला आणि सर्जनशीलतेला पर्याय म्हणून नाही. जर आपण केवळ यंत्रांनी बनवलेला हा बिनकामाचा आशय स्वीकारत गेलो, तर भविष्यात इंटरनेट ही एक अशी जागा बनेल जिथे मौल्यवान माहिती शोधणे हे गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्याइतके कठीण होईल. त्यामुळेच एआय स्लॉप ओळखणे, त्याला विरोध करणे आणि अस्सल मानवी निर्मितीचा आदर करणे ही आजच्या डिजिटल युगाची मोठी गरज बनली आहे. आपण जे वाचतो आणि जे पाहतो, त्याबद्दल प्रश्न विचारण्याची सवय लावणे हीच या कचऱ्यापासून वाचण्याची पहिली पायरी आहे.

--- तुषार भ. कुटे. 


 

मानवत मर्डर्स

सत्तरच्या दशकामध्ये मराठवाड्यातल्या मानवत या छोट्याशा गावामध्ये अनेक लहान मुलींसह आठ खून झाले होते. त्या काळात खूनसत्राचा हा मुद्दा बराच गाजला. यावरच आधारित ही वेबसिरीज आहे, मानवत मर्डर्स .
कथेची सुरुवात होते पहिल्या खूनापासून. गावाच्या आजूबाजूला एकेकट्याने फिरणाऱ्या लहान मुलींना पकडून त्यांचा खून करण्यात येतो. परंतु बरेच प्रयत्न करून देखील स्थानिक पोलिसांना याचा छडा लागत नाही. आणि अखेरीस राजधानीतून रमाकांत कुलकर्णी यांची या खूनसत्राच्या तपासाकरता निवड होते. ते प्रत्येक खुनाचा चहूबाजूंनी तपास चालू करतात. त्यातून नवनव्या पात्रांची कथेमध्ये एन्ट्री होत जाते. अनेकांची चौकशी होते. हळूहळू खून सत्राचा रहस्यभेद व्हायला लागतो. सर्व कोणी का केले गेले होते? हे शेवटच्या भागांमध्ये समजते. तोपर्यंत ही वेबसिरीज आपली उत्सुकता ताणून ठेवते.
कथेतील पात्रांची निवड उत्तम आहे. रमाकांत कुलकर्णीच्या भूमिकेमध्ये आशुतोष गोवारीकर शोभून दिसतात. याशिवाय सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी हे देखील आपापल्या भूमिकेमध्ये समरस झाल्याचे दिसतात. या वेबसिरीजची सर्वात सकारात्मक बाजू म्हणजे याचे पार्श्वसंगीत. एखाद्या मर्डर मिस्टरीला साजेसे पार्श्वसंगीत देण्यात आलेले आहे. कथेमध्ये खिळवून ठेवण्याची ताकद या पार्श्वसंगीतामध्ये आहे. बाकी आशिष बेंडे यांचे दिग्दर्शनही उत्तमच. यापूर्वी त्यांचा आत्मपॅम्प्लेट चित्रपट पाहिला होता. परंतु दोन्हीही चित्रकथा या वेगवेगळ्या धाटणीच्या आहेत. सत्य कथांवरील चित्रकथा पाहताना आपण प्रत्यक्षात त्याच ठिकाणी त्याच काळामध्ये वावरत असल्याचे सातत्याने जाणवत राहते. हेच अशा वेबसिरीजचे यश आहे.

--- तुषार भ. कुटे.

--- तुषार भ. कुटे


 

Monday, February 2, 2026

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्पणपत्रिका

"आर्टिफिशियल इंटेलिजन्स" पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हाच प्रेरणा होती जेफ्री हिंटन यांची. खरं सांगायचं तर त्यांच्याबद्दल दहा वर्षांपूर्वी मला देखील माहिती नव्हती. प्रत्यक्षात न्यूरल नेटवर्क शिकवायला घेतलं त्यानंतर या मागचा कर्ताधर्ता कोण? या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं. ते होते जेफ्री हिंटन.
आज अस्तित्वात असणाऱ्या बहुतांश उत्पादनांमागचं तर्कशास्त्र न्यूरल नेटवर्कमध्ये दडलेलं आहे. हा मागच्या शतकामध्ये तयार झालेला अल्गोरिदम. मानवी मेंदू जसे कार्य करतो तसेच संगणकीय अल्गोरिदममध्ये न्यूरल नेटवर्कद्वारे केले जाते. परंतु या न्यूरल नेटवर्कला शिकण्याची क्षमता देण्याचे कार्य जेफ्री हिंटन यांनी केले. २१ व्या शतकामध्ये हे तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले. यानंतरही हिंटन यांनी वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानाला आपले योगदान दिले. गुगलसारख्या कंपन्यांसोबत त्यांनी काम देखील केले. परंतु त्यांचा देखील 'अल्फ्रेड नोबेल' झाला. आपण तयार केलेले तंत्रज्ञान जगाला विनाशाच्या दिशेने नेऊ शकते, याची जाणीव हिंटन यांना झाली होती. २०२२ पर्यंत त्यांना संगणक क्षेत्रातील मानाचा ट्युरिंग पुरस्कार मिळाला आणि विज्ञान क्षेत्रातील सर्वोत्तम नोबेल पुरस्कार देखील!
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं तंत्रज्ञान चुकीच्या दिशेने विकसित झाल्यास किंवा चुकीच्या हातांमध्ये गेल्यास ते विनाशकारी ठरू शकतं याची जाणीव हिंटन यांना होती. त्यातूनच त्यांनी या तंत्रज्ञानाविषयी प्रबोधन करण्याचे कार्य हाती घेतले. जे आजतागायत अविरतपणे चालू आहे.
माझा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू देखील हाच होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे जवळपास सर्वांनाच माहीत झालं आहे. परंतु भविष्यातील त्याचा विकास आपल्याला कोणत्या वाटेवर नेऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर तात्विकदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोधणे गरजेचे वाटते. हिंटन यांच्या विचारांची मला मदत झाली. आणि हे पुस्तक मी लिहू शकलो.
हेन्री डेव्हिड थोरो त्याच्या वॉल्डन या पुस्तकामध्ये म्हणतो की, एखादे पुस्तक तुम्हाला जर विचार करायला लावत नसेल, तर ते निरर्थक आहे. अतिशय बहुमोलाचा विचार थोरो याने मांडला होता. त्यालाच अनुसरून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या पुस्तकाची रचना मी केली. आज वाचकांच्या अनुभवातून ती सार्थ झाल्याचे देखील मला वाटते.

--- तुषार भ. कुटे



 

सुनेत्रा पर्वाचा प्रारंभ

अजितदादांच्या आकस्मिक निधनाने सर्व महाराष्ट्रालाच धक्का बसला. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जणच हळहळ व्यक्त करत होता. एक कामसू आणि उमदे व्यक्तिमत्व आपण गमावले. परंतु या घटनेने पुढे काय? नावाच्या प्रश्नाला देखील सुरुवात झाली. या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे होतेच. अजितदादानंतर मोठा आणि तगडा नेता त्यांच्या पक्षामध्ये नव्हता. आणि दोनच दिवसांमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षनेतेपदी तसेच उपमुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आली. समाजमाध्यमांवर जेव्हा ही बातमी प्रसारित झाली तेव्हा यावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. अजितदादा जाऊन अजून दहा दिवसही झाले नाहीत तोच त्यांची पत्नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे, यावर बऱ्याच जणांचा आक्षेप होता. ही गोष्ट तशी पाहिली तर सामान्यच आहे. सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून कमीत कमी दहा दिवस तरी कौटुंबिक दुखवटा पाळला जातो. परंतु राजकारणासाठी हा नियम लागू होतो का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. अजितदादा त्यांच्या पक्षाचे एकखांबी तंबू होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या मूळ पक्षातूनच नवीन पक्षाची स्थापना झाली होती. त्यांच्या तंबूचा हा खांब पडल्याने तंबू कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात विरोधी गटाकडून लगेचच निरनिराळे दावे यायला लागले होते. आता अजितदादाच नसल्याने त्यांनाही त्यांचे उखळ पांढरे करून घ्यायची जणू घाई झाली होती, असे एकंदरीत वातावरण दिसून आले. याच कारणास्तव पडद्यामागील राजकारण आलेले असावे.
कधी कधी वाटतं आपण खूपच सामान्य लोक आहोत. आपण आपल्याच सामान्य विचारसरणीतून प्रत्येक घटनेकडे पाहत असतो. पडद्यामागील राजकारण आपल्याला समजत नाही. राजकारणी लोकांची दुःख ही वेगळीच असतात. त्यातूनच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदी नेमण्याचा निर्णय झाला असावा. यातून त्यांच्या पक्षाची घडी विस्कळीत होण्यापासून वाचेल, असे वाटते. कारण मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी सध्यातरी विरोधी गटातील बरेच जण टपलेले दिसून आले. उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद नसले तरी त्यातून एक वेगळा संदेश अन्य राजकारण्यांना गेला आहे. अजितदादांचा पक्ष अजूनही स्वतंत्रच आहे आणि तो याही पुढे स्वतंत्रच चालू राहील. याकरिताच सुनेत्रा पवारांचा शपथविधी उरकला गेला. अतिशय विचित्र परिस्थितीमधून सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी आल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरू शकतो. 
त्या काही कट्टर राजकारणी नाहीत. त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरून राजकारणातले छक्के-पंजे त्यांनी अजून प्रत्यक्ष पाहिले नसावेत. परंतु अजितदादांकडून त्यांनी याचे अप्रत्यक्ष धडे घेतले असतील, अशी आशा वाटते. राजकारणात त्यांचा अनुभव त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांपेक्षा कमी असला तरी सद्य परिस्थितीत केवळ त्यांचेच नेतृत्व पक्षाला एकसंध ठेवू शकते, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या उच्च पदावर आजवर एकही महिला गेलेली नाही. म्हणजे महाराष्ट्राने महिला राजकारण अनुभवलेले नाही. एका अर्थाने सुनेत्रा पवारांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे, असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रासाठी एका नव्या दिशेचा हा प्रारंभ आहे. वाईट घटनांमधून काहीतरी चांगले होत असते. तशाच प्रकारची ही घटना आहे. इथून पुढची महाराष्ट्रीय राजकारणातील अनेक वर्षे सुनेत्रा पवार आपल्या कामगिरीतून गाजवतील, अशी आशा वाटते.
बघूया काय होतंय ते.

--- तुषार भ. कुटे

 


Saturday, January 31, 2026

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सर्वोत्तम कोर्स कोणता?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थांपैकी एक म्हणजे डेक्कन कॉलेज होय. या कॉलेजची स्थापना सन १८२१ मध्ये झाली होती.
आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच डेटा सायन्स क्षेत्रातील ट्रेनिंगमध्ये अग्रगण्य असणारी पुण्यातील संस्था म्हणजे मितू स्किलोलॉजीज होय. या संस्थेला गुगलवर सर्वाधिक रेटिंग आणि रिव्ह्यूज आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी या दोन्हीही संस्था संयुक्तपणे 'जेनेसिस एआय कोर्स' ऑनलाईन पद्धतीने चालवतात. ज्यामध्ये तब्बल तीन सर्टिफिकेशन कोर्स करता येतात.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची डिग्री करत असलेला विद्यार्थी आणि सर्व प्रकारचे पदवीधर या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. तुम्ही जरी कोणत्याही महाविद्यालयामध्ये शिकत असाल तरीदेखील पॅरलली हा कोर्स करू शकता. कारण तो संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत चालवला जातो.
या कोर्समध्ये पायथॉन प्रोग्रामिंग, स्टॅटिस्टिक्स, डेटा सायन्स, डेटा ऍनालिसिस, डेटा व्हिज्युलायझेशन, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि जनरेटिव्ह एआय सारख्या विविध टेक्नॉलॉजीला प्रॅक्टिकलद्वारे आणि कॅपस्टोन प्रोजेक्टद्वारे शिकवले जाते.
हा कोर्स शिकवण्यासाठी कंपनीतील अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट, एआय इंजिनियर्स तसेच पीएचडी झालेले प्राध्यापक देखील आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एबीसी बँकेमध्ये तब्बल २४ क्रेडिट्स देखील मिळणार आहेत. तेही डेक्कन कॉलेज सारख्या शासकीय संस्थेकडून...
यातील एका सर्टिफिकेट कोर्स फी आहे फक्त वीस हजार रुपये. आणि त्याकरिता फक्त ६० जणांना प्रवेश मिळतो. तोही फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस वर...!
डेक्कन कॉलेज किंवा मितू स्किलोलॉजीजच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती किंवा तुमचा प्रवेश निश्चित करू शकता.

https://mitu.co.in 

#ArtificialIntelligence #DataScience #GenAI #AgenticAI #pythonprogramming


 

वॉल्डन - हेन्री डेव्हिड थोरो

१८४५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या एका २८ वर्षाच्या युवकाने वॉल्डनच्या तळ्याकाठी राहण्याचा निर्णय घेतला. या तळ्याच्या काठावर तो एक झोपडी बांधून जवळपास दोन वर्ष राहिला. कदाचित त्याला स्वतःवर प्रयोग करायचे होते. मनुष्य कसा जगू शकतो? या प्रश्नाची उत्तरे शोधायची होती. यातूनच हेन्री डेव्हिड थोरो याचे स्वतःचे एक तत्त्वज्ञान तयार झाले. या तत्त्वज्ञानावरच आधारित असणारे पुस्तक, वॉल्डन.
काही गोष्टी आपल्या अनुभवातून साध्य होतात. काही गोष्टींसाठी वेळ यावी लागते तर काहींसाठी आपल्याला तशी वेळ आणावी लागते. वॉल्डनच्या काठावर दोन वर्षे राहिलेला हा तरुण अशाच अनुभवाच्या शोधार्थ भटकत होता. त्यातूनच त्याला जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. तिथल्या निसर्गातून आणि स्वतः अनुभवलेल्या घटनांमधून त्याचं स्वतःच एक तत्त्वज्ञान तयार झालं. या मुक्कामात तो दोन वर्षे पूर्णपणे एकटा नव्हता. त्याला अनेक व्यक्ती तसेच प्राणी देखील भेटले. त्यातूनही त्याचे स्वतःचे मत तयार झाले. त्याला स्वतःबद्दल किंबहुना मनुष्य जीवनाबद्दल विचार मंथन करण्याची संधी मिळाली. याच विचार मंथनावर आधारित हे पुस्तक आहे.
हे पुस्तक म्हणजे जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. माणसाला जगण्यासाठी नक्की काय लागतं? याही प्रश्नाचं सारासार उत्तर देते. शिवाय जीवनातील आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना बहुतांश मार्गदर्शन देखील करते. 
यातील बरीचशी वाक्ये सुविचार म्हणून लिहिण्यासारखी आहेत. तसेच सार्वजनिक जीवनामध्ये आचरणात आणण्यासारखी देखील आहेत. एक अर्थाने आदर्श जीवन पद्धतीचा ती पुरस्कार करतात.

— तुषार भ. कुटे


Thursday, January 29, 2026

अजितदादा

आपला देश म्हणजे राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यावर भरभरून प्रेम करणारा देश. परंतु, हे प्रेम सर्वांनाच मिळत नाही. आपल्या कार्यातून, व्यक्तिमत्वातून लोकांच्या मनावर राज्य करणारे अतिशय कमी लोक आपल्या देशात आहेत. त्यातीलच एक अजितदादा पवार. 
सकाळी सकाळीच आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच जण सुन्न झाले. अजितदादा इतक्या लवकर जाऊच शकत नाहीत. अशीच सर्वांची भावना होती. परंतु सत्य हे कटू असते. याची जाणीव काल प्रकर्षाने झाली. ज्या व्यक्तीला आपण कधीच भेटलो नाही आणि केवळ बातम्यांमधून पाहत आलेलो आहे, त्यांच्याविषयी इतके वाईट का वाटावे? हा प्रश्न मला पडला.
खरंतर या व्यक्तीने आपल्या कामांमधून, धडाडीतून जी ओळख निर्माण केली तीच ओळख मनामध्ये घर करून राहिली होती. आपल्या राज्याला असाच नेता हवा आहे, ही भावना मनात तयार झाली होती. राज्याला सांभाळणारा नेता असाच असेल, असं वाटू लागलं होतं. पुढची अनेक वर्षे महाराष्ट्र ज्याच्या हातामध्ये बिनधास्तपणे सोपवू शकतो, असा हा नेता होता. परंतु त्याच्या अकाली जाण्याने बसलेला धक्का पचवू शकलो नाही. एखाद्या राजकीय नेत्याबद्दल पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने वाईट वाटले. कालपासून अवघा सोशल मीडिया दादांवरील बातम्यांनी आणि भरभरून लिहिल्या गेलेल्या लेखांनी ओसंडून वाहतो आहे. ही त्यांच्या कामाची आणि लोकांच्या प्रेमाची खरी पावती आहे. अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी भरून काढता येत नाही. अजितदादा देखील त्यातीलच एक. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांच्या नावाशिवाय काहीही लिहिले जाणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. शिवाय त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील नेते तयार होतील जे महाराष्ट्रा च्या प्रगतीचा वेग असाच कायम चालू ठेवतील, अशी आशा बाळगूया. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल.

--- तुषार भ. कुटे.

(कोणत्याच राजकीय नेत्याबद्दल मी आजवर काहीच लिहिलेले नाही. पण आज राहावले नाही.)


 

हॅरियर ईव्हीची पहिली ड्राईव्ह

२५ जानेवारीला संध्याकाळी पंचजन्यच्या शोरूममधून फोन आला. आमची हॅरियर ईव्ही गाडी शोरूममध्ये दाखल झाली होती. हायसे वाटले. अर्थात २७ जानेवारीला आम्हाला गाडी मिळणार होती, हे नक्की झाले. यामुळे पुढच्या तयारीला लागलो.
२६ जानेवारीला अर्थात आदल्या दिवशी कुटुंबातील सर्वच जण मोशीला घरी थांबले होते. २७ तारखेला दुपारी बारा वाजता गाडी घेऊन निघू असे नियोजन केले. रश्मी आणि मी ज्ञानोबाला आणण्यासाठी शाळेमध्ये गेलो होतो. तिथून थेट पंचजन्यच्या शोरूममध्ये गेलो. गाडी शोरूमच्या बाहेरच नेहमीच्या ठिकाणी लावलेली होती. गाडीचा क्रमांक अजून आलेला नव्हता. मागच्या वेळेस बुकिंगसाठी आलो त्यावेळेस हॅरियर गाडी पहिल्यांदाच आतून पाहिली. आज मात्र ती सर्व बाजूंनी पाहता आली. सर्व काही औपचारिकता करता करता तीन वाजून गेले होते. शिवाय संध्याकाळी राज्ञीचा वाढदिवस असल्याने लवकर गावी पोहोचणे गरजेचे होते. इथून गाडी गावी न्यायची होती. अमोलच्या आग्रहाखातर मीच गाडी चालवू लागलो. हॅरिअर ईव्ही चालवण्याचा तो माझा पहिलाच अनुभव. आमच्या नेक्सॉन ईव्ही पेक्षा ही गाडी बऱ्यापैकी मोठी, भक्कम आणि भारदस्त वाटत होती. शिवाय गाडीला घातलेला तो भला मोठा हार घेऊन आम्ही थाटाने राष्ट्रीय महामार्गावरून गावाच्या दिशेने निघालो. नेक्सॉन चालवण्याची सवय होतीच, शिवाय त्यातील बऱ्याचशा फंक्शनलिटीज मला आधीच माहीत होत्या. परंतु या गाडीमध्ये त्याहीपेक्षा अद्ययावत फंक्शन्सचा देखील भरणा होता. यानिमित्ताने मला त्याची देखील चाचणी करता आली. गाडी चालवताना वेगळी काही भीती वाटली नाही. फक्त ती सांभाळून गावी नेणे गरजेचे होते. शिवाय गाडीला क्रमांक देखील आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांपासून वाचवत ती आम्ही गावी घेऊन गेलो. एका नव्या गाडीच्या चालविण्याचा आनंद या निमित्ताने मलाही घेता आला.