

मे महिन्यामध्ये भारतातील उष्म्यात मोठ्या प्रमाणत वाढ झाली. ही वाढ इतकी आहे की आत्तापर्यंत उष्माघाताने मृत्यू पडलेल्यांची संख्या ही हजाराच्या घरात गेली आहे. आपल्या विदर्भामध्ये कालच २६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. शिवाय मागच्या काही दिवसांमध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मृत्यू पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या महिन्यामध्ये विदर्भातील बहुतांश ठिकाणी अधिकतम सरासरी तापमान हे ४५ अंशाच्या वरतीच राहिले आहे. याचवेळी मुंबईचे तापमान हे ३५ च्या वर होते तर पश्चिम महाराष्ट्राचे तापमान ४० च्या वरती होते. विदर्भातील ४५ अंशाचा उष्मा म्हणजे उन्हाचा कहर करणारा आहे. आपण इथे ४० च्या वर तापमान गेल्यावर घामाने भिजून जातो तिथे ४५ अंशात तापमान गेल्यावर काय परिस्थिती होईल, याची कल्पना करता येऊ शकते. गुजरातमध्येही सरासरी अधिकतम तापमान हे ४५ वर बहुतांश ठिकाणी राहिले होते. तिथे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही १५० च्या घरात पोहोचली आहे. उन्हाचा असा कहर चालू असताना तरी आता सर्वजण मान्सूनची आतूरतेने वाट पाहत आहेत.
ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिनामांचे चित्रण सध्या चालू झाले असल्याचे दिसू लागले आहे. पृथ्वीवर वातावरणात ॠतूंमध्ये होणारा बदल हा ग्लोबल वॉर्मिंगचीच परिणीती असल्याचे दिसून येते. हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी तर उन्हाळ्यात कडाक्याचा उष्मा ही ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणे आहेत. उद्या अशा प्रकारच्या ॠतूबदलामुळे पाऊसही वेळेवर पडेल की नाही ते सांगता येत नाही. मागच्या पावसाळ्यामध्ये पावसाचा लहरीपणा आपण अनुभवला. अजुनही जून उजाडला नसल्याने पावसाची प्रगती सांगता येत नाही. अंदमानात मान्सून धडकल्याचे वृत्त आले. मध्येच ’लैला’ नावाच्या वादळाने दक्षिण भारतात उन्हाळ्यातच पूरपरिस्थिती निर्माण केली. त्यात बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. पूर्वी निसर्गाचा कोप जितका भयानक नव्हता तितका आज होऊ लागल्याचे दिसते.
या सर्व घटनांना मानव स्वत: जबाबदार आहे. पृथ्वीवरच्या वातावरण बदलावर त्यानेच स्वत:च्या कृतीने नियंत्रण आणायला हवे. अन्यथा येणारा काळ खूप भयंकर असणार आहे, हेच निसर्ग सध्या आपल्याला पटवून सांगत आहे...
सिद्धार्थ जाधवचा बहुचर्चित ’हुप्पा...हुय्या’ बघितला. मराठी चित्रपटांतील फॅन्टासी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होय. सिद्धार्थ जाधव प्रथमच चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसून आला.
मराठीत फॅन्टासी प्रकातले चित्रपट बनविण्याची प्रथा महेश कोठारेने केली असावी. महेश व लक्ष्याचा ’थरथराट’ हा चित्रपट याच प्रकारात मोडतो. काही वर्षांपूर्वी केदार शिंदेने त्याचा ’अगं बाई अरेच्चा...’ हा पहिला चित्रपट बनविला. तो चांगलाच चालला होता. याच चित्रपटामुळे संजय नार्वेकर हा एक मराठीतील फॅन्टासी हिरो म्हणून पुढे आला होता. त्याने नंतरच्या काळात ’चष्मेबहाद्दर’, ’नशीबाची ऐशी तैशी’ असे याच प्रकारचे चित्रपट केले. आता सिद्धार्थ जाधवने फॅन्टासी हिरो म्हणून ’हुप्पा...हुय्या’ मधे प्रदार्पन केले आहे. सुपरहिरोची संकल्पना खऱ्या अर्थाने हॉलिवूडची आहे. ती बॉलिवूडमध्ये येऊन गेली. आता मराठी चित्रपसृष्टीतही ती रुजू पाहत आहे.
सिद्धार्थ जाधवचे नेहमीच्या शैलीप्रमाणे काम आहे. बजरंग बलीच्या एका अद्भूत शक्तीने तो ज्या करामती करतो ते या चित्रपटात दाखविले आहे. अनिल सुर्वेचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटात मोहन जोशी व उषा नाडकर्णी यासारखे ज्येष्ठ कलाकारही आहेत. शिवाय डॉ. गिरीश ओक यांची कन्या गिरीजा ओकही मराठीत अभिनेत्री म्हणून उदयास येत आहे. मानिनी व हिंदीतल्या ’तारे जमीन पर’ नंतर ती परत याच चित्रपटात दिसून आली. या चित्रपटाची कथा ही नेहमीच्याच धाटनीतली असली तरी मनोरंजक आहे. शिवाय अजित परबच्या संगीत दिग्दर्शनाखाली स्वप्नील बांदोडकरने गायलेले शीर्षक गीत उत्कृष्टच आहे.
सिद्धार्थ जाधवला मराठी चित्रपटांमध्ये अजुन बरीच मजल मारायची आहे. आता तर त्याची खरी सुरुवात होते आहे. नेहमीच्या साच्यातील भूमिका न करता त्याने नवे प्रयोग करणे गरजेचे वाटते.
पाकिस्तानने नुकतेच यूट्यूब, फ़ेसबूक व ट्विटर या तीन मोठ्या साईट्सवर आपल्या देशात बंदी घातली. प्रेषित मोहम्मद पैगंबरांदद्दल अवमान कारक मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली. पायाला जखम होऊन वेदना होत असतील तर तो पायच कापून टाकण्यासारखा हा प्रकार झाला आहे.