Monday, July 1, 2024

द. आफ्रिकेचा पराभव

सामन्यातला शेवटचा चेंडू टाकला गेला आणि भारत विजयी झाला. याचबरोबर भारतीय आणि प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या डोळ्यात देखील अश्रू होते परंतु त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातला घास हिरावून भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. यावेळी पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाविषयी देखील भारतीयांना वाईट वाटून गेले. कारण यावेळेसचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान किंवा बांगलादेश सारखा माजोरडा आणि शत्रुत्व राखणारा नव्हता किंवा इंग्लंड अथवा ऑस्ट्रेलियासारखा उन्मादी देखील नव्हता. क्रिकेटचा जेंटलमन्स गेम हे नाव सार्थ करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा संघ होता.
मागच्या कित्येक वर्षांपासून मोक्याच्या क्षणी मान टाकणारा अर्थात चोकर्स म्हणून या संघाची अपख्याती होती. यावर्षी त्यांना त्यांच्यावरील हा डाग पुसण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांना विजय पताका फडकवता आली नाही. यावरून या संघाचे तसेच त्यांच्या सांघिक कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. भारतीय संघाप्रमाणेच त्यांनी देखील पूर्ण विश्वचषकात शंभर टक्के यश मिळवले. पण अंतिम क्षणी विजेता आणि उपविजेत्यामध्ये काही इंचाचेच अंतर राहून गेले.
दक्षिण आफ्रिका देखील पूर्ण सामन्यामध्ये विजेत्यासारखा खेळला परंतु त्यांना विजयी होत आले नाही. याचे संवेदनशील क्रिकेट रसिकांना देखील वाईट वाटून गेले. कारण या भावना नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीयांच्या देखील होत्या. त्यामुळे आपण त्यांचे दुःख निश्चितच समजू शकतो. एक उत्तम प्रतिस्पर्धी म्हणून दक्षिण आफ्रिका संघाचा भारतीय क्रिकेट रसिकांना निश्चितच आदर आहे. क्रिकेट या खेळाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. विश्वचषकातील एका पराभवामुळे त्यांचे महत्त्व निश्चितच कमी होत नाही.
त्यांच्या आजवरच्या कामगिरीला मनापासून सलाम. त्यांच्या या पहिल्या अंतिम सामन्याच्या अनुभवातून बोध घेऊन ते पुढील विश्वचषकात याहीपेक्षा चांगली कामगिरी ते करतील, अशी आशा करूयात.



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com