Saturday, August 17, 2024

स्वीकारा नवे तंत्रज्ञान!

विज्ञानाने तंत्रज्ञानाला जन्म दिला आणि त्यामुळे मानवी जीवन सुसह्य आणि सुकर होऊन गेले. याच कारणास्तव विविध प्रकारच्या नोकऱ्या अस्तित्वात आल्या. नवी कौशल्ये शिकून अनेक जण तंत्रज्ञानाधारित उद्योगांमध्ये काम करायला लागले. आज जगभरात कोट्यावधी लोक तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रामध्ये काम करत आहेत. बहुतांश जण तंत्रज्ञानाचा वापर करूनच नोकरी करत आहेत. जर हे तंत्रज्ञान विकसित झाले नसते तर या नव्या नोकऱ्या तयार झाल्या नसत्या. अर्थात सदर व्यक्ती बेरोजगार असती असे नाही. प्रत्येकाने कालानुरूप स्वतःला बदलले, नवी कौशल्ये, तंत्रज्ञान शिकून घेतले आणि त्या जोरावर वैयक्तिक प्रगतीची कवाडे खुली केली. बदल हा जीवनाचा नियम आहे. अर्थात तो तंत्रज्ञानाला देखील लागू होतो. 

मागील काही वर्षांपासून वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान म्हणजे "आर्टिफिशियल इंटेलिजन्स" होय. तंत्रज्ञानाची ही सर्वात अद्ययावत आणि पुढची पायरी आहे. अर्थात या तंत्रज्ञानाचा फटका देखील सध्या मानवनिर्मित नोकऱ्यांना होत आहे. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कपात होताना दिसत आहे. आज ही सर्व कामे आता यंत्रांकडून केली जात आहेत, असे दिसते. बहुतांश कामांमध्ये मानवी बुद्धिमत्तेचा वापर होत नाही म्हणून अशी कामे अर्थात 'रोबोटिक वर्क' हे तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहेत. म्हणूनच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर बहुतांश जणांच्या जाण्याच्या मार्गावर आहेत. तंत्रज्ञान जसे मानवी प्रगतीला पोषक असते तसे दुसऱ्या बाजूने त्याचे भयंकर तोटे देखील असतात. त्यातीलच हा एक तोटा. मग यावर मार्ग काय? अर्थात तंत्रज्ञानासोबत जगणे..  ते शिकून घेणे व त्याचा आपल्या प्रगतीसाठी वापर कसा करता येईल, हे पाहणे होय. ही वाट जोपासली तरच तंत्रज्ञान स्पर्धेच्या या जगात आपण टिकू शकू आणि प्रगतीच्या वाटेवर इतरांसोबत चालू देखील शकू. 

--- तुषार भ. कुटे.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com