Thursday, November 28, 2024

मलाला

पाकिस्तानमध्ये जेव्हा एखादी स्त्री मला स्वातंत्र्य हवं आहे असं म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की, तिला आपल्या वडिलांची, भावाची किंवा नव-याची आज्ञा पाळावयाची नाही; पण तिला स्वातंत्र्य हवं आहे…. याचा अर्थ असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की, तिला तिचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत, तिला मुक्तपणे शाळेला जायचं आहे, मुक्तपणे काम करायचं आहे. पवित्र कुराणामध्ये असं कुठंही लिहिलं नाही की, स्त्रीनं पुरुषांवर अवलंबून राहायला हवं. प्रत्येक स्त्रीनं पुरुषाचं ऐकायला हवं. हे शब्द देखील स्वर्गातून आलेले नाहीत. हे विचार आहेत सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफझाई हीचे.
“मलाला: सामान्यामधल्या असामान्यत्वाची कहाणी” या ऋतुजा बापट-काणे लिखित पुस्तकातून मलालाच्या व्यक्तिमत्त्वाची, संघर्षाची आणि विचारांची ओळख होते. पाकिस्तानमधील स्वात नदीचे खोरे म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची खाणच. या प्रदेशावर जवळच्याच अफगाणिस्तानमध्ये प्रभाव असणाऱ्या तालिबान्यांचे राज्य होतं किंबहुना आजही असेल. तालिबानी प्रशासन म्हणजे काय, हे आज सर्वांनाच समजुन आलेले आहे. इस्लामच्या नावाखाली यांचे हक्क हिरावून घेणे हेच तालिबानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सुशिक्षित लोकांची वस्ती असणाऱ्या पाकिस्तान मधील स्वात या शांत आणि सुखी प्रदेशावर तालिबानची वक्रदृष्टी पडली. आणि इथूनच हळूहळू वातावरण बदलायला सुरुवात झाली. पाकिस्तानी प्रशासनाच्या अंतर्गत हा प्रदेश असला तरी येथे तालिबांचे कायदे चालतात. म्हणूनच इस्लामच्या नावाखाली स्त्रीशिक्षणाला येथे पूर्ण बंदी घातली गेली. परंतु आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असणाऱ्या झिउद्दीन युसूफझाई मात्र डगमगले नाहीत. त्यांनी शिक्षणाचा वसा कायम चालू ठेवला. त्यांच्याच संस्कारात वाढलेली त्यांची मुलगी मलाला. वडिलांप्रमाणेच विचार आणि व्यक्तिमत्व असणारी ही मुलगी देखील शिक्षणासाठी शाळेत जाऊ लागली. वारंवार धमक्या देऊनही मुलींच्या शिक्षणामध्ये काही फरक पडला नाही. आणि अचानक अनेक एकेदिवशी तालिबानकडून शाळेच्या बसवर जीवघेणा हल्ला झाला. यातून मलाला थोडक्यात बचावली. तिला उपचारासाठी इंग्लंडमधील बरमिंगहॅम येथे देण्यात आले. आणि येथून पुढेच खरी मलालाची संघर्ष कहाणी जगापुढे यायला सुरुवात झाली. तिचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. शिक्षणाविषयीची तिच्या कार्याची दखल जग घ्यायला लागले. यानंतर शिक्षण क्षेत्रातील तिला बरेचसे पुरस्कार देखील प्राप्त झाले. परंतु त्यावेळी पाकिस्तानमधील परिस्थिती वेगळी होती. तालिबानने तिला इस्लाम विरोधी ठरवले होतेच तर बहुतांश पाकिस्तानी जनता देखील मलालाला पाश्चिमात्य देशांची बाहुली आणि इस्लामची विरोधकच मानत होते. किंबहुना आजही ती परिस्थिती बदलली नसावी. एकंदरीत तिचे विचार पाहता खूपच कमी वयात तिच्या अंगी प्रगल्भता जाणवत होती. भवतालची परिस्थिती आणि वडिलांचे संस्कार यातूनच ती तावून-सुलाखून निघालेली असावी. ती उपचारार्थ इंग्लंडमध्ये असताना देखील तालिबानने तिला दोन वेळा पत्र पाठवून मायदेशी परतण्याचे आवाहन देखील केले होते. परंतु शिक्षणापासून दूर राहून आणि बंधनात अडकवून घेण्याचे तिला मान्य नव्हते. म्हणून आजही ती आपल्या मायदेशाबाहेर राहून शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य करत आहे.
दहा वर्षांपूर्वी बालमजुरी विरोधात काम करणाऱ्या  भारताच्या कैलास सत्यार्थी यांच्यासह शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही मलाला फाउंडेशनच्या सहाय्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मलालाचे कार्य चालूच आहे.
ऋतुजा बापट-काणे यांच्या या पुस्तकातून सहज सोप्या आणि काळानुरूप लिहिलेल्या घटनांद्वारे मलालाच्या संघर्षाची एकंदरीत ओळख होते. आधुनिक पिढीतील युवकांना विशेषत: युवतींना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे.

--- तुषार भ. कुटे 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com