Saturday, March 8, 2025

मराठी दौलतीचे नारी शिल्प

जागतिक महिला दिन विशेष

मराठेशाहीच्या चारशे वर्षांच्या इतिहासामध्ये पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही पराक्रम गाजवले आहेत. अनेक प्रसंगी मराठी भूमितील महिला दीपस्तंभ म्हणून उभ्या ठाकलेल्या आहेत. कधी मसलतीच्या मैदानावर तर कधी युद्धाच्या रणांगणावर त्यांनी आपल्या पाऊलखुणा उमटविलेल्या आहेत. अशा मराठी भूमितील पराक्रमी स्त्रियांची ओळख करून देणारे हे पुस्तक “मराठी दौलतीचे नारी शिल्प”.
आपल्या रोमांचकारी आणि स्फूर्तीदायी इतिहासामध्ये अनेक स्त्रियांनी आपले नाव अजरामर केले. त्याची सुरुवात होते स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई यांच्यापासून. शिवाजी महाराजांची जडणघडण करण्यामध्ये जिजाऊ साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता. त्यांच्याच शिकवणीतून शिवरायांनी स्वराज्य घडविले, रयतेचे राज्य आणले आणि मराठा साम्राज्याची उभारणी केली. चहूबाजूंनी उभ्या ठाकलेल्या चार पादशाह्यांपासून स्वराज्य उभे झाले. याचे श्रेय राजमाता जिजाऊंना जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई आणि मोठी सून अथवा छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांनी देखील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अढळस्थान प्राप्त केलेले आहे. याशिवाय छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच पेशवाईच्या कालखंडामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणाऱ्या दर्याबाई, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाची इत्यंभूत माहिती या पुस्तकाद्वारे आपल्याला होते.
एकंदरीत पुस्तक वाचताना तीन स्त्रियांचा जीवन प्रवास हा अतिशय प्रेरणादायी वाटतो. त्यातील पहिल्या राजमाता जिजाबाई, दुसऱ्या महाराणी येसूबाई आणि तिसऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. यांच्याशिवाय मराठी मातीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही, अशी भावना मनात तयार होते. महाराणी येसूबाई यांनी हिंदवी स्वराज्य विस्तार होत असतानाच्या कालखंडातील बहुतांश मोठ्या घटना अनुभवलेल्या आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार आहेत. शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना भक्कमपणे साथ देणाऱ्या, शंभूराजांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा कारभार हाकणाऱ्या, आपल्याच माणसांनी शंभूराजांना औरंगजेबाकडे पकडून दिल्यानंतर परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या आणि योग्य वेळी हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत होण्यापासून वाचविणाऱ्या, स्वराज्यासाठी जवळपास ३० वर्षे शत्रूच्या तावडीत घालविणाऱ्या, शाहू महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत तेवत ठेवणाऱ्या खंबीर पराक्रमी येसूबाई या पुस्तकातून आपल्याला भेटतात. कधी कधी असा देखील वाटतं की महाराणी येसूबाईंनी आपल्या आत्मचरित्र लिहिलं असतं तर इतिहासातील किती घटनांची उकल आपल्याला होऊ शकली असती!
मराठेशाहीच्या इतिहासातील आणखी एक पराक्रमी स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर. एका स्त्रीने राज्यकारभार हाती घेतल्यानंतर काय होऊ शकते? याचे उत्तम उदाहरण अहिल्यादेवींनी घालून दिले. मल्हारराव होळकरांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या अहिल्याबाई यांनी सातत्याने विविध दु:खे पचवली. परंतु त्यामध्ये रयतेची आबाळ होऊ दिली नाही. एक आदर्श प्रशासक म्हणून त्या इतिहासामध्ये अजरावर झाल्या. आजही त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आपल्याला भारतभर पाहता येतात. यातूनच त्यांच्या कार्याची प्रचिती देखील येते.
मराठी मातीमध्ये घडलेल्या या आदर्श स्त्रियांची छोटीखानी संकलित चरित्रे आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देतातच तसेच भविष्यासाठी प्रेरणादायी देखील ठरतात.

— तुषार भ. कुटे

#मराठी #मराठा #महाराष्ट्र #इतिहास #पुस्तक #परीक्षण #महिला_दिवस


मोहम्मद शमीचा रोजा

रमजान महिना चालू असताना देखील भारताचा मुख्य गोलंदाज मोहम्मद शमी याने रोजा न ठेवल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. जवळपास सर्वच मराठी वृत्तपत्रांनी त्याला प्रसिद्धी दिली. शिवाय ऑल इंडिया मुस्लिम जमातच्या अध्यक्षांनीही शमीवर रोजा न ठेवल्याने आगपाखड केलेली होती. याच बातमीवर महाराष्ट्रातील मराठी मुस्लिमांनी मौलानांना चांगलेच धारेवर धरले. मराठी लोक उत्तर भारतीय लोकांपेक्षा किती प्रगल्भ आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा या बातमीवरील कमेंट्स वरून येत होती.










 

Thursday, March 6, 2025

सेतूमाधवराव पगडी यांची पुस्तके

इतिहास हा इतिहासकारांच्या नजरेतून वाचला की तो अधिक चांगला समजतो. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शास्त्रशुद्ध दृष्टी आपल्या दृष्टीत देखील बदल घडवून आणते.
त्यातही तटस्थ दृष्टी असणारे इतिहासकार विरळाच. महान इतिहासकार सेतूमाधवराव पगडी हे अशाच इतिहासकारांपैकी एक. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी लिहिलेली पुस्तके इतिहासाची रम्य सफर घडवून आणतात. आणि आपल्याला इतिहास शिकवतात देखील. अशीच काही पुस्तके मागच्या काही दिवसांमध्ये वाचनात आली. ती तुम्हाला देखील निश्चित आवडतील. शिवाय आपल्या अज्ञात पण गौरवशाली इतिहासाची ओळख देखील करून देतील.

छत्रपती शिवाजी
https://amzn.eu/d/aVbTAHs

छत्रपती नि त्यांची प्रभावळ
https://amzn.eu/d/2nPiuHy

महाराष्ट्र आणि मराठे
https://amzn.eu/d/iFsOcZr

इतिहासाचा मागोवा
https://amzn.eu/d/gQX5HaW

पानिपतचा संग्राम
https://amzn.eu/d/49epGfA

कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी
https://amzn.eu/d/bsdlcHJ

बहु असोत सुंदर
https://amzn.eu/d/2itHNys

वरंगलचे काकतीय राजे
https://amzn.eu/d/fdeN4OH

--- तुषार भ. कुटे

#मराठी #इतिहास #मराठा #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #पुस्तक #पुस्तके #महाराष्ट्र


 

मिलरचे शतक

कालच्या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयापेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या शेवटच्या चेंडूवर आलेलं शतक अधिक लक्षवेधी ठरलं. शेवटच्या तीन षटकांमध्ये ९३ धावांची गरज असताना डेविड मिलर ५२ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्यांनी जी संस्मरणीय फटकेबाजी केली त्याला तोड नाही. १८ चेंडूंमध्ये ४८ धावा काढून अखेरच्या चेंडूवर त्याने शतक पूर्ण केलं. फलंदाजीमध्ये मिलरच्याच क्रमांकावर एकेकाळी येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लूजनरची आठवण झाली. आपली हातोडारुपी बॅट घेऊन क्लूजनर थाटाने मैदानात उतरायचा. आणि बिनधास्तपणे मैदानाच्या चहुबाजूंना फटके मारायचा. दक्षिण आफ्रिकेला आपल्या फलंदाजीच्या बळावर त्याने आजवर बरेच सामने जिंकून दिलेले आहेत. मिलर हा देखील क्लूजनरच्याच वंशावळीतला. परंतु तो मैदानावर आला तोपर्यंत आफ्रिकेच्या हातातून सामना निसटून गेला होता. शेवटच्या तीन षटकांतील त्याची फटकेबाजी कोणत्याही क्रिकेट प्रेमीला निश्चितच आवडली असणार. शेवटचा चेंडू बाकी असताना मिलर ९८ धावांवर खेळत होता. शेवटचा फटका मारला आणि त्याने दोन धावांसाठी पळायला सुरुवात केली. तेव्हाच न्युझीलँडचे एकंदरीत क्षेत्ररक्षण पाहता त्यांनी चक्क मिलरचे शतक 'होऊ' दिले, हे विशेष! याला देखील 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' म्हणायला काय हरकत आहे?


 

Sunday, March 2, 2025

केशव पण्डितकृत राजाराम चरित्रम् अर्थात जिंजीचा प्रवास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरचा काळ स्वराज्यासाठी अतिशय अवघड असा काळ होता. परंतु संभाजी महाराजांनी तत्कालीन परिस्थिती व्यवस्थित हाताळल्यामुळे स्वराज्याची वाताहत झाली नाही. पुन्हा अशीच परिस्थिती इसवी सन १६८९ मध्ये तयार झाली होती. छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले. औरंगजेबाच्या छावणीमध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांची हत्या घडवण्यात आली. उत्तरेकडून दक्षिणेत उतरल्यानंतर औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य बुडवायचेच, असा निर्धार केला होता. संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने रायगडाला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य बुडणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने तत्कालीन परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. त्यांनी संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले व त्यांना रायगडावरून सुरक्षितरीत्या बाहेर जाण्यास सांगितले. येसूबाई या स्वतः रायगड लढवत होत्या. स्वराज्य अबाधित राहावे याच एकमेव हेतूने छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. दक्षिणेमध्ये अर्थात तमिळनाडूमध्ये असणारा जिंजीचा किल्ला हा सर्वात सुरक्षित किल्ला मराठी सरदारांना वाटत होता. त्याच किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी जावे, असे सर्वानुमते ठरले. रायगडावरून निघाल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या काही निवडक विश्वासू सरदारांसह प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेमध्ये उतरले व त्यांनी प्रदीर्घ प्रवासानंतर जिंजीचा किल्ला गाठला. मुघलांनी त्यांचा पाठलाग सुरु ठेवला होता. पण, ते त्यांच्या तावडीत कधीच सापडले नाहीत. अशा रीतीने पुन्हा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचा छत्रपती शत्रूच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडला होता. त्यानंतरच्या काळामध्ये मराठी स्वराज्य हळूहळू विस्तारत गेले. महाराष्ट्राच्या मातीमध्येच औरंगजेबाचा मृत्यू झाला. परंतु मराठी स्वराज्याची पताका काही खाली आली नाही.
त्यांच्या या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करणारा 'राजाराम चरित्रम्' हा ग्रंथ केशव पंडित यांनी संस्कृतमध्ये लिहिला होता. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारामध्ये केशव कवी अर्थात केशव पंडित यांना राजाश्रय होता. शिवकालातील समकालीन असणाऱ्या दुर्मिळ ग्रंथांपैकी केशव पंडित कृत 'राजाराम चरित्रम्' हा अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथ आहे. म्हणूनच तत्कालीन इतिहास बारकाईने समजून घेण्यासाठी त्याचे अध्ययन व अभ्यास महत्त्वाचा ठरतो. याच संस्कृत ग्रंथाचे इतिहासाचे भिष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी मराठी व इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. म्हणूनच हा ग्रंथ आजच्या इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी एक बहुमूल्य ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये काव्याचे पाच सर्ग असून सुमारे २७५ श्लोक आहेत. शिवकालीन इतिहास तसेच महाराष्ट्राचा एकंदर इतिहास अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक ठरेल, असाच आहे.

- तुषार भ. कुटे

अमेझॉन लिंक: https://amzn.in/d/cDkMpYb

Wednesday, February 26, 2025

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आद्याक्षर: 'इ' किंवा 'ई'

'इ' किंवा 'ई' ने सुरू होणारे मूळचे फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असणारे काही शब्द खालील पद्धतीने दिले आहेत:

    इज्जत
    • फारसी मूळ: عزت (Izzat)
    • मराठी अर्थ: मान, सन्मान

    इनाम
    • फारसी मूळ: انعام (Inʿām)
    • मराठी अर्थ: बक्षीस, पारितोषिक

    इश्क
    • फारसी मूळ: عشق (Ishq)
    • मराठी अर्थ: प्रेम, प्रणय

    इलाज
    • फारसी मूळ: علاج (Ilāj)
    • मराठी अर्थ: उपचार, औषधोपचार

    इरादा
    • फारसी मूळ: ارادہ (Irāda)
    • मराठी अर्थ: हेतू, निश्चय

    ईमान
    • फारसी मूळ: ایمان (Īmān)
    • मराठी अर्थ: विश्वास, धार्मिक श्रद्धा

या अद्याक्षराने सुरू होणारी ही यादी कदाचित परिपूर्ण नाही.  आपल्यालाही काही शब्द माहित असल्यास कमेंट मध्ये लिहावेत.

— तुषार भ. कुटे

Tuesday, February 25, 2025

बुद्धाची गोष्ट

बऱ्याच दिवसांपासून मराठीतील जुन्या लेखकांचं काही वाचलं नव्हतं म्हणून वि. स. खांडेकर यांचा “बुद्धाची गोष्ट” हा कथासंग्रह वाचायला घेतला. अर्थातच खांडेकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या कथा मनात घर करणाऱ्या अशाच आहेत. एकूण नऊ कथांपैकी पुस्तकाचे शीर्षककथा असणारी “बुद्धाची गोष्ट” म्हणजे काहीतरी खासच.
सुरुवातीला वाटतं की गौतम बुद्धांविषयी ही कथा लिहिलेली असावी. परंतु प्रत्यक्षात गौतम बुद्धांच्या जीवनावर भाषण ठोकणाऱ्या एका लहान मुलाची ही गोष्ट आहे. लहान मुलांचं मन अर्थातच निरागस असतं. एका अर्थाने प्रत्येक गोष्टीकडे ते तटस्थपणे बघू शकत असतात. त्यांचा मेंदू शिकण्याच्या अवस्थेमध्ये असतो. आणि विशेष म्हणजे त्यांची सदसदविवेकबुद्धी देखील जागृत असते. बुद्धाचे जीवन आणि आपलं जीवन यामधील फरक त्याला समजायला लागतो. त्यातूनच बुद्धदेखील कळू लागतो. तो का महान होता? त्यांनी असं का केलं? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तो स्वतःच शोधू लागतो. आणि यातूनच आपल्याला देखील बुद्ध कळतो. असा सारांशरुपी गोषवारा या कथेबद्दल सांगता येईल. याव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अवलोकन खांडेकरांनी प्रवाह, आकाश, फत्तर, वेग, पाप, अपघात, ओलावा आणि सूर्यास्त अशा विविध कथांमधून केले आहे. वाचनमग्न होत असताना आपण ही कथा समोरच पडद्यावर अनुभवत आहोत की काय, याची अनुभूती देखील येते.

--- तुषार भ. कुटे

 

Sunday, February 16, 2025

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आद्याक्षर: ‘आ’.

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आजचे आद्याक्षर आहे: ‘आ’.

आराम
• फारसी मूळ: آرام (Ārām)
• मराठी अर्थ: विश्रांती, सुख

आवाज
• फारसी मूळ: آواز (Āvāz)
• मराठी अर्थ: ध्वनी

आशिक
• फारसी मूळ: عاشق (Āshiq)
• मराठी अर्थ: प्रेमी

आलिशान
• फारसी मूळ: عالی‌شان (Ālīshān)
• मराठी अर्थ: भव्य, शानदार

आमदनी
• फारसी मूळ: آمدنی (Āmadnī)
• मराठी अर्थ: उत्पन्न

या अद्याक्षराने सुरू होणारी ही यादी कदाचित परिपूर्ण नाही. आपल्यालाही काही शब्द माहित असल्यास कमेंट मध्ये लिहावेत. 


— तुषार भ. कुटे


Wednesday, February 12, 2025

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आद्याक्षर: ‘अ’.

फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आजचे आद्याक्षर आहे: ‘अ’. 


1. अक्कल

    • फारसी मूळ: عقل (Aql)

    • मराठी अर्थ: बुद्धी, समजूत

2. अदब

    • फारसी मूळ: ادب (Adab)

    • मराठी अर्थ: शिष्टाचार, विनय

3. अमल

    • फारसी मूळ: عمل (Amal)

    • मराठी अर्थ: कृती, कार्य

4. अमीर

    • फारसी मूळ: امیر (Amir)

    • मराठी अर्थ: श्रीमंत, धनवान

5. अदालत

    • फारसी मूळ: عدالت (Adalat)

    • मराठी अर्थ: न्यायालय

6. अंदाज

    • फारसी मूळ: اندازہ (Andaza)

    • मराठी अर्थ: अटकळ

7. अमल

    • फारसी मूळ: عمل (Amal)

    • मराठी अर्थ: कृती, कार्य    

8. अदब

    • फारसी मूळ: ادب (Adab)

    • मराठी अर्थ: शिष्टाचार, विनय


या अद्याक्षराने सुरू होणारी ही यादी कदाचित परिपूर्ण नाही.  आपल्यालाही काही शब्द माहित असल्यास कमेंट मध्ये लिहावेत. 


— तुषार भ. कुटे


जिज्ञासा

संगणक तंत्रज्ञानाची पुढची आणि सर्वात अद्ययावत पायरी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान होय. मागच्या दशकातच या तंत्रज्ञानाने जगावर पाय रोवायला सुरुवात केली आणि आज ते सर्वच क्षेत्रांमध्ये अधिराज्य गाजवायला सज्ज झालेले आहे. अर्थात यातून कलाक्षेत्र देखील सुटलेले नाही. सृजनशीलता हा मानवाचा पायाभूत गुण आहे. परंतु हा गुणसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेने हळूहळू आत्मसात करायला घेतल्याचे दिसते. याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मराठीमध्ये लिहिले गेलेले हे पहिलेच पुस्तक, “जिज्ञासा”.
तंत्रज्ञान म्हणजे इंग्रजी. हेच समीकरण सर्वांना पक्के ठाऊक असते. परंतु आज तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकंदरीत माहिती दळणवळणामध्ये ४०% देखील इंग्रजीचा वापर होत नाही. अर्थात उरलेल्या ६० टक्क्यांमध्ये जगातील जवळपास सर्व भाषा येतात. यामध्ये मराठी देखील आलीच. कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये आपल्याला माहिती देऊ शकते किंवा तयार करू शकते याचा उत्तम नमुना या पुस्तकाद्वारे आपल्याला वाचायला मिळतो. संपादक विनोद शिंदे यांनी संगणकाच्या या कृत्रिम मेंदूचा वापर करून या पुस्तकात सर्वच क्षेत्रातील विविधअंगी माहिती सुटसुटीतपणे दिलेली आहे. यातून या तंत्रज्ञानाचा एकंदरीत आवाका आपल्याला ध्यानात येईल. पहिलाच लेख रतन टाटा यांच्यावर लिहिलेला आहे. मराठी भाषा, शेअर मार्केट, मोबाईल तंत्रज्ञान, कॉर्पोरेट जग, जीवनशैली, राजकारण, लोककला, मनोरंजन, महिला सुरक्षा, तणावमुक्ती, हवामान, ऑटोमोबाईल उद्योग, समाजमाध्यमे, विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, चालू घडामोडी, प्रेमकथा अशा निरनिराळ्या विषयांवर याद्वारे लिहिलेले लेख आपल्याला इथे वाचता येतात. विशेष म्हणजे ते कृत्रिमरीत्या लिहिले गेले असले तरी त्यात कृत्रिमपणा मात्र अजिबात जाणवत नाही. यातूनच या तंत्रज्ञानाची कमाल आपल्याला ध्यानात येऊ शकते.. विशेष म्हणजे एआयने लिहिलेल्या काही कविता देखील या पुस्तकाच्या शेवटी आपण वाचू शकतो. त्यामध्ये इंटरनेटद्वारेच पायरसी शोधण्याचा प्रयत्न केला तर ती जवळपास ०% येईल! अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आता उत्तम कृत्रिम सर्जनशीलता देखील होऊ लागलेली आहे, असं दिसतं! हे पुस्तक म्हणजे मानवजातीला एक उत्तम धडा आहे. याद्वारे प्रत्येक कामासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे पर्याय आहे… हे ठामपणे आपल्याला दिसून येते.
अशा विविध विषयांची आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मराठी वाचकांना ओळख करून दिल्याबद्दल संपादक विनोद शिंदे यांचे विशेष आभार. किमान एकदा तरी या पुस्तकातील मजकूर प्रत्येकाने वाचायलाच हवा, असा आहे!

— तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #परीक्षण #तंत्रज्ञान #कृत्रिम_बुद्धिमत्ता



Saturday, February 8, 2025

मातृभाषा बदलण्याचे फॅड

इतिहास असं सांगतो की प्रत्येक भाषेला स्वतःची किंमत असते. किंबहुना ती किंमत ती भाषा बोलणाऱ्यांनी ठरवलेली असते. कधीतरी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. मागील दोन हजार वर्षांच्या भाषिक इतिहासामध्ये डोकावलं की कळतं की प्रांताप्रांतागणित भाषा बदलत गेल्या. एका भाषेवर दुसऱ्या भाषेचा प्रभाव दिसून आला. शिवाय भाषांमधील आदान प्रदान देखील होत गेले. विविध भाषिकांच्या मानसिकतेमुळे काही भाषा लयास गेल्या. आणि या पुढील काळात देखील त्या जाऊ लागतील. दुसरी भाषा आपल्यापेक्षा श्रेष्ठ. आणि ती बोलली की आपल्याला भरपूर पैसा मिळेल मान मिळेल अशी अनेकांची समजूत असते. यातूनच भाषेचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आज भारतीय समाजाची मानसिकता बघितली तर याची उत्तम प्रचिती येईल अशी परिस्थिती आहे.
मातृभाषेतील शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण हे सर्वांनाच माहित आहे. पण जेव्हा मातृभाषेचे स्टेटस कमी होतं तेव्हा ती भाषा बोलणाऱ्यांचं स्टेटस देखील त्यांच्या मनात कमी होत असतं. अर्थात ही गोष्ट आपल्या मराठी भाषेला देखील लागू आहे. ज्ञानेश्वरांसारख्या महान प्रज्ञावंताची, शिवरायांसारख्या महान योद्धाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अद्वितीय व्यक्तीची भाषा म्हणजे मराठी. लोकसंख्येची आकडेवारी पाहिली तर मराठी भाषिकांची संख्या वाढते आहे. परंतु मराठीवर प्रेम करणाऱ्या आणि खरोखर मराठीमध्ये बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे वाटते.
इंटरनेट युगाचा प्रारंभ झाल्यानंतर इंग्रजी वेगाने वाढायला लागली. कारण तंत्रज्ञानाचे ज्ञान हे इंग्रजीमध्येच उपलब्ध होते. संगणकाची भाषा देखील इंग्रजी होती. आणि याच कारणास्तव इंग्रजीचे भारतातील महत्त्व देखील वाढू लागलं. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या काळात देखील इंग्रजीचं जितकं महत्त्व होतं त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक महत्त्व आज भारतामध्ये आहे. त्याचे कारण हेच. मातृभाषेतील मातृभाषेतून शिक्षण घेतलेले ९० टक्क्यांवर अधिक लोक इंग्रजी भाषेशी संबंधित व्यवसायामध्ये आज आहेत. त्यांना वाटतं इथून पुढे आता इंग्रजीत चालणार. पण आमची भाषा तर मराठी. मग आमचा वंश जगाच्या स्पर्धेत कसा टिकू शकतो? या प्रश्नाचे उत्तर नवमराठी पालक स्वतःच्या पद्धतीने शोधताना दिसत आहेत.
पुण्यामधल्या एका उद्यानामध्ये काही लहान मुले खेळत होती. त्यांना बघून जवळूनच आपल्या आई-वडिलांसोबत चालणारी एक छोटी मुलगी पळत आली. आणि तिने इंग्रजीमध्ये विचारले, ‘मी तुमच्याबरोबर खेळू का?’ मुलांना इंग्रजीतल्या त्या वाक्याचा अर्थ समजला नाही. तिने वेगळ्या पद्धतीने विचारले. ही मुलगी कुठल्या ग्रहावरून आली आहे? अशा पद्धतीचे भाव त्या मुलांच्या चेहऱ्यावर होते. तिचा अट्टाहास पाहून मुले तिथून पळून गेली. त्या मुलीच्या चेहऱ्यावर नाराजीची एक छोटीशी छटा दिसून आली. तिचे आई-वडील तिला घेऊन गेले. तेही तिच्याशी इंग्रजीतच बोलत होते. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की दोघेही आई-वडील एकमेकांशी मराठीमध्ये बोलताना दिसले. कदाचित मुलीला आपल्या आई-वडिलांच्या मातृभाषेचा अर्थात मराठीचा काहीच गंध नसावा. म्हणजे लहानपणापासूनच ते तिच्याशी फक्त इंग्रजीत बोलत असावेत असं दिसलं. शेवटपर्यंत मी त्यांचं निरीक्षण करत होतो. ती मुलगी एकही शब्द मराठीमध्ये बोलली नाही. तेव्हा माझा समज पक्का झाला.
मागे एकदा एक आजी आजोबा भेटले होते. ते आपल्या नातीबद्दल अतिशय उत्साहाने बोलत होते. आमच्या मुलीला मराठी बोलता येत नाही बरं का! असं अभिमानाने सांगत होते. खरंतर ही अभिमानाची नाही तर लाज वाटण्याची गोष्ट आहे, असं आम्ही मनातल्या मनात म्हटलं. आजी-आजोबांना याचा देखील अप्रूप वाटत होतं की आम्हाला तिच्याशी बोलण्यासाठी इंग्रजीचा वापर करावा लागतो. एकंदरीत याही मुलीची परिस्थिती पहिल्या मुलीसारखी होती. लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या मातृभाषेपासून दूर ठेवायचं म्हणजे त्यांची मातृभाषा आपोआपच इंग्रजी होईल, असं काहीसं गणित.
यामध्ये आणखी एक गंमत मला विशेषत्वाने आढळून आली. आई वडील दोघेही मराठी परंतु मुलगी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलते. ही गोष्ट अधिक हास्यास्पद वाटत होती. नंतर त्याचं कारण देखील समजलं. दोघांना फारसं इंग्रजी बोलता येत नाही. पण आपल्या मुलीला मोठ्या इंग्रजी शाळेत घातले. त्यामुळे मराठी सारखी गावठी भाषा बोलून कसं चालेल? असा विचार करून इंग्रजी येत नसल्याने ते तिच्याशी बिहारची राज्यभाषा असणाऱ्या हिंदीमध्ये बोलत होते. कधी कधी अशा गोष्टी देखील चिड आणतात. विशेष म्हणजे मुलाच्या शाळेमध्ये देखील शिक्षक त्यांच्याशी हिंदीमध्येच बोलायचे. मला इथे हिंदी आणि मराठी भाषेचं तुलना करायची नाही. पण एकंदरीत इतिहास बघितला तर समृद्धी कोणाच्या वाटेला आहे, हे तुम्हाला देखील समजेल. कोणती भाषा कोणत्या प्रकारच्या प्रांताची आहे? या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला शोधता येईल.
सांगायचं तात्पर्य असं की नवपालक आपल्या मुलाला ‘ग्लोबल सिटीझन’ करायच्या नादात आपल्या मातृभाषेला तुच्छ लेखत आहेत, याची वारंवार प्रचिती येते. इंग्रजी भाषा शिकल्याने प्रगती होते हे खर आहे. पण त्यासाठी आपली मातृभाषा बदलण्याचं जे फॅड आज दिसतय, ते खरोखर हास्यास्पद असंच आहे.

— तुषार भ. कुटे


 

अर्ली इंडियन्स

ऐतिहासिक कालखंडामध्ये जितके आपण मागे जात राहतो तितके पुरावे क्षीण आणि दुर्बल होऊन जातात. मग अशा इतिहासाची मांडणी करताना संशोधकांचा कस लागतो. यातून नवनव्या संशोधनपद्धती विकसित होतात. तर्कपद्धतीचा अवलंब केला जातो. आणि इतिहासाची मांडणी होते. भारतीयांचा ज्ञात इतिहास अडीच हजार वर्षांपासून सुरू होतो. बौद्ध-जैन धर्माचा उदय आणि मौर्य साम्राज्याची स्थापना इथून भारतीय इतिहास सुरू होतो, असे म्हणतात. परंतु भारतामध्ये पहिल्या बुद्धिमान मानवाचे अर्थात होमो सेपियन्सचे आगमन सुमारे ६५ हजार वर्षांपूर्वी झाले होते. मग या उरलेल्या ६२ हजार पाचशे वर्षांमध्ये नक्की काय झाले? याचा शोध घ्यायचा असल्यास आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करता येऊ शकतो.
अनुवंशशास्त्राच्या आधारे वानरांच्या प्रजातीतून विकसित होत असलेला किंबहुना झालेला बुद्धिमान मानव अर्थात होमो सेपियन्स आफ्रिकेतून हळूहळू बाहेर पडला, हे सिद्ध झालेले आहे. विविध मार्गांचा अवलंब करून जगाच्या इतरत्र भागामध्ये पोहोचत गेला. डार्विनपासून सुरू झालेला हा प्रवाह पुढील कित्येक दशके अनेक अनुवंशशास्त्रज्ञांनी पुढे प्रवाहित ठेवला. यातून नवनवे विचार, संशोधन पुढे आले. इतिहास उमजत गेला. तर्कवितर्क लढवले गेले. पारंपारिक समजुतींना तडे देखील बसले. परंपराच्या विरोधात संशोधनांचे तात्पर्य आल्यामुळे वादविवाद देखील झाले. परंतु संशोधकांनी सत्य शोधण्याचा आटोकात प्रयत्न केला. आजही विज्ञानाच्या आधारे सिद्ध होत असलेल्या अनेक संकल्पनांना परंपराधिष्टीत लोकांचा विरोध आहे. त्यातीलच अनेक प्रश्नांची उत्तरे टोनी जोसेफ यांनी ‘अर्ली इंडियन्स’ या पुस्तकांमध्ये विज्ञानाचा आधार घेत स्पष्टपणे मांडलेली आहेत.
एकेकाळी भारतामध्ये जगातील सर्वात प्रगत संस्कृतींपैकी एक संस्कृती आनंदाने नांदत होती. ती म्हणजे ‘हडप्पा संस्कृती’. अनेक अनुवंशशास्त्रज्ञ, पुरातत्त्ववेत्ते यांनी हडप्पावर सखोल संशोधन केले आहे. त्यातून विविध निष्कर्ष देखील काढलेले आहेत. भारतातील ही प्राचीन संस्कृती भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने पाया होती. हे देखील त्यांनी सिद्ध केले आहे. किंबहुना यावर सर्वांचेच एकमत असल्याचे दिसते. हजारो वर्षे गुण्यागोविंदाने नांदल्यानंतर हळूहळू हडप्पा संस्कृती लयास गेली. आणि भारतातील इतर भागांमध्ये संचारत गेली. हडप्पा विकसित होण्याच्या आधीदेखील भारतामध्ये मानव संस्कृती नांदत होत्या. पण हडप्पा संस्कृती ही मैचा दगड ठरली.
इराणच्या झेग्रोस परिसरातून आर्यवंशीय लोकांचे भारतामध्ये स्थलांतर झाले आणि यानंतरच हळूहळू हडप्पा संस्कृती लयाला गेली, असे म्हटले जाते. या ऐतिहासिक संकल्पनेचे विस्तृत विवेचन टोनी जोसेफ यांनी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच जीनोम म्हणजे काय, याची विस्तृत स्पष्टीकरण वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे त्यांनी दिलेले आहे. ते अगदी बारकाईने वाचावे लागते. कधी कधी काही गोष्टी डोक्यावरून देखील जाऊ शकतात. परंतु तात्पर्याने डीएनएच्या आधारे एखाद्या मानवी समूहाचा वंश काढता येऊ शकतो, असं टोनी जोसेफ यांनी सिद्ध केले आहे.
या पुढील प्रकरणामध्ये भारताच्या विविध भागांमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचा अभ्यास करून येथे मानवाचा वावर किती प्राचीन होता, याचे विस्तृत विवेचन वाचायला मिळते. पुस्तकाच्या जवळपास निम्म्या भागामध्ये हडप्पा संस्कृती वरील विस्तृत संशोधन लेखकाने मांडलेले आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेल्या हडप्पा, मोहेंजोदारो, राखीघडी, धोलाविरा, कालीबंगन, मेहरगड अशा विविध स्थळांचा अभ्यास केलेला दिसतो. या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंद्वारे त्या काळाची संस्कृती कशी होती, तसेच त्यांचा अन्य भागांशी व्यापार कशा पद्धतीने होत होता? याची देखील माहिती मिळते. तत्कालीन भौगोलिक रचनेचा तसेच वातावरणाचा अभ्यास करून हडप्पा संस्कृतीची एकंदरीत प्रगती लेखकाने मांडलेली आहे. काही गोष्टी तर्काच्या आधाराने तर काही विज्ञानाने सिद्ध केलेल्या दिसतात. भारतामध्ये सध्या वापरात असलेल्या चार प्रकारच्या भाषांपैकी इंडो-युरोपियन आणि द्रविडी भाषांमधील फरक अथवा साम्य तसेच हडप्पा लिपी आणि द्रविडी लिपी मधील साम्य यावरून विविध तर्क लेखकाने येथे विस्तृतपणे मांडलेले आहेत. हडप्पाची लिपी आजही कोणत्याही संशोधकाला वाचता आलेली नाही. अनेक संशोधकांनी आपल्या हयातीत बरेच परिश्रम करून देखील त्यांना हडप्पा चित्रलिपीचा अर्थ लावता आलेला नाही. कदाचित हडप्पाचा बहुतांश इतिहास हे चित्रलिपी वाचला वाचता आल्यानंतरच उर्वरित जगाला समजेल, असे दिसते. म्हणजेच एका अर्थाने अजूनही हडप्पाकालीन भारतीयांचा परिपूर्ण इतिहास आपल्याला ज्ञात नाहीच.
जनुकशास्त्राचा आणि रसायनशास्त्राचा आधार घेऊन लेखकाने हडप्पा संस्कृतीतील लोकांविषयी विविध तर्क मांडलेले आहेत. शिवाय आर्य खरोखर भारताबाहेरून भारतामध्ये आले होते का? याचे देखील सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेले आहे. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय फरक देखील यात मांडलेला दिसतो.
सरस्वती नदीची गोष्ट आणि हडप्पाकालीन चित्रलिपी याविषयी बहुतांश इतिहास अभ्यासकांना उत्सुकता असते. ही उत्सुकता शमवण्याचे काम देखील पुस्तकातील काही प्रकरणांमध्ये होते. एकंदरीत सव्वादोनशे पानांचे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने केलेला विस्तृत अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे. भारतीय इतिहासाला एक वेगळी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो.

— तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #परीक्षण #पुस्तक_परीक्षण


 

Tuesday, February 4, 2025

हो चि मिन्ह

विसाव्या शतकामध्ये देशादेशांमधील लढायात अनेक घटना घडल्या. जगामध्ये दोन महायुद्ध झाली. परंतु कोणत्याही महायुद्धामध्ये थेट सहभाग न घेतल्याने अमेरिका प्रगतीच्या पायऱ्या चढू लागली, असं म्हणतात. हळूहळू त्यांना वर्चस्वाची नशा चढू लागली. आणि याच कारणास्तव बहुतांश देशांवर राज्य करण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले. परंतु अन्य देशांवर हल्ला करत असताना काही देशांनी अमेरिकेला देखील जेरीस आणले होते. त्यातील पहिला देश म्हणजे क्युबा आणि दुसरा व्हिएटनाम. व्हिएटनाम या देशाने गनिमी कावा अर्थात गुरिल्लावॉरचे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतले, असे अनेक लेखक लिहितात. याविषयी निश्चित माहिती नाही. पण या तंत्राचा वापर करून व्हिएटनामने अमेरिका सारख्या देशाला देखील नमवले, हे ऐतिहासिक तथ्य आहे. अर्थात यामागे भक्कम नेतृत्वाचा पाठिंबा होता, हे सत्य देखील नाकारायला नको.
आजच्या व्हिएटनामचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे हो चि मिन्ह यांचे हे छोटेखाणी चरित्रात्मक पुस्तक. याद्वारे हो चि मिन्ह यांच्या एकंदरीत कारकीर्दीचा अंदाज बांधता येऊ शकतो. एकेकाळी इंडोचायना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई भागामध्ये व्हिएटनामची शेजारच्या प्रबळ देशांकडून गळचेपी होत होती. अर्थातच मागील शतकामध्ये सातत्याने स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या शेकडो देशांपैकी व्हिएटनाम हा देखील एक देश होता. अर्थात स्वातंत्र्याच्या दृष्टीने पाऊले टाकत असताना लोक चळवळ होणे अत्यंत गरजेचे होते. याच लोक चळवळीतून व्हिएटनाममध्ये राष्ट्रप्रेमी युवकाचा उदय झाला. त्यानेच विविध मार्गांचा अवलंब करत देशवासियांना एकत्र केले आणि. नवा व्हिएटनाम उभारला. शिवाय इंडोचायना मधील आपल्या जवळच्या कंबोडिया आणि लाओस या देशांमध्ये देखील समविचारी सरकारे सत्तेत आणली. त्याचीही गोष्ट या पुस्तकामध्ये वाचता येते.

--- तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #पुस्तक_परीक्षण


 

Sunday, February 2, 2025

सीबीएसई आणि महानगरपालिका

मराठी भाषेतील शिक्षण म्हणजे अतिशय फालतू आणि दुय्यम दर्जाचं, अशा अंधश्रद्धा मागच्या काही वर्षांपासून वेगाने फोफावत आहेत. आणि आता शासकीय यंत्रणा देखील त्याला पद्धतशीरपणे खतपाणी घालताना दिसत आहेत. पैशावाल्याचं पोरग इंग्रजीतून शिकणार आणि गरिबाचं पोरगं मराठीतून शिकणार, ही समाजाची मानसिकता बनत चाललेली आहे. मातृभाषेतील शिक्षण केव्हाही श्रेष्ठच जे हृदयापर्यंत भिडतं असं जवळपास प्रत्येक भाषा तज्ञाचे मत आहे. परंतु आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही. वारेमात पैसा ओतून मिळवलेलं सीबीएसईतील इंग्रजी भाषेतील शिक्षण म्हणजेच श्रेष्ठ, असं अनेकांना वाटतं. त्यातूनच आता महानगरपालिका देखील तथाकथित गरीब मुलांसाठी इंग्रजी भाषेतलं सीबीएससीतल शिक्षण देण्यासाठी सज्ज होत आहेत.
या शाळांमध्ये आता क्रीडा कक्ष, संगीत खोली, इलेक्ट्रिक खोली, नृत्य कला, हस्तकला, सामान्य विज्ञान, जीवशास्त्र भौतिकशास्त्र, संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय अशा सुविधा महानगरपालिका करून देणार आहे. अशा वेळी एक प्रश्न पडतो की, या शाळा सध्याच्या मराठी शाळांमध्ये त्यांना देता येत नाहीत का? ज्यांनी कोणी या निर्णयासाठी हातभार लावला असेल ते सर्वच जण आपल्या मातृभाषेतून शिकलेले असावेत, याची मला शंभर टक्के खात्री आहे. पण तरी देखील नवीन पिढीला इंग्रजीतून शिकण्याचा हट्टहास का? हा गहण प्रश्न आहे. इंग्रजीतून शिकणं आणि इंग्रजी शिकणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. ज्यांची सांगड आपल्या समाजाला कदाचित अजूनही घालता येत नाही. त्यातूनच शासकीय यंत्रणांची देखील अशी भयानक मानसिकता तयार होते. एखाद्या परकीय भाषेतून शिक्षण घेणं किती अवघड असतं तेही अतिशय लहान मुलाला…  याची कल्पना कदाचित महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याला नसावी. मातृभाषेतूनच उत्तम शिक्षण दिलं, इंग्रजीचेही धडे दिले तर मूल चांगली प्रगती करू शकेल. परंतु याचा विचार कोणालाही करायचा नाही. स्वतःची उदो उदो करण्याच्या नादात शिक्षण क्षेत्राचे वाटोळं करायला बहुतांश मंडळी टपलेली आहेत असंच दिसतं. मागील बऱ्याच वर्षांपासून अनेक पालकांनी इंग्रजीतून शिक्षण अतिशय अवघड जातं म्हणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमांमध्ये टाकल्याची असंख्य उदाहरणे आहेत. या मागची नक्की कारणे काय? याचे उत्तर महानगरपालिकेच्या तथाकथित शिक्षण तज्ञांनी घ्यायला हवीत. त्यावर विचार करायला हवा. आत्ताची शिक्षणयंत्रणा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन व्हायला हवे. मराठी शाळेतील शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात? शिवाय त्यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे? याचा विचार व्हायला हवा. जर मराठी भाषेतूनच शिक्षकांना समस्या असतील तर इंग्रजीतून काय होणार? या प्रश्नाचे देखील उत्तर शोधायला हवे. शाळा इंग्रजी केली आणि सीबीएससी बोर्डाला जोडली की शिक्षण दर्जेदार होत नाही. फक्त स्वतःचा उदो उदो होतो. यातून महानगरपालिका काही शिकेल, याची सध्यातरी शाश्वती वाटत नाही.

--- तुषार भ. कुटे

#मराठी #शिक्षण #इंग्रजी #मातृभाषा

Saturday, February 1, 2025

जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं

प्रत्येक शतकाचा कालखंड हा वेगवेगळ्या घटनांनी तसेच निरनिराळ्या साम्राज्यांच्या इतिहासकथांनी व्यापलेला आहे. या प्रत्येक कालखंडामध्ये निरनिराळ्या देशांनी, संस्कृतींनी आपला ठसा उमटवला. कोणताच एक देश अथवा खंड सातत्याने जगावर राज्य गाजवू शकला नाही किंवा तेथील साम्राज्यांनी वाटसरुंनी अथवा बुद्धिमंत्तांनी देखील सातत्याने एकाच प्रदेशातून प्रगती केली नाही. आज जरी युरोप-अमेरिकासारखे खंड प्रगतीच्या वाटेवर पहिल्या स्थानावर असले तरी कोणी एकेकाळी आशिया खंड म्हणजे जगाच्या समृद्धीचा आणि भरभराटीचा प्रदेश होता. त्याचीच गोष्ट सांगणारा हा ग्रंथ म्हणजे डॉ. स्टुअर्ट गार्डन लिखित ‘जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं’.
माध्यमिक शिक्षणामध्ये इतिहासाच्या पुस्तकांमधून मध्ययुगीन मला जगाचं दर्शन झालं. यात अनेक प्रवासी आणि साम्राज्याची माहिती होती. परंतु ती त्रोटक आणि तुरळकच. उदाहरण घ्यायचं झालं तर चिनी प्रवासी फहियान आणि ह्युएनत्संग यांचे देता येईल. ह्युएनत्संग याने प्रवासाचा भला मोठा टप्पा गाठत भारत भ्रमंती केली होती. अनेक ठिकाणी भेटी देऊन नोंदी केल्या होत्या. यातून तत्कालीन भारत व इथली राज्यव्यवस्था कशी होती याची माहिती मिळते. इसवी सन ५०० ते १५०० या कालखंडामध्ये आशिया हा एक विस्मयजनक एकसंध आणि विविध शोधांनी गजबजलेला होता! जगभरातील पाच मोठी शहरे ही इथल्या पाच वेगवेगळ्या साम्राज्यांच्या राजधान्या होत्या. समृद्धी आणि भरभराटी याचेच दुसरे नाव म्हणजे आशिया खंड होते. भारतीय आणि चिनी संस्कृती तसेच अरब जगत याच्या केंद्रस्थानी होते. याच काळामध्ये गणिताची, भूमितीची आणि विज्ञानाच्या विविध शाखांची प्रगती आशिया खंडातून होत गेली. अनेक तत्त्वज्ञाने, विचारधारा तयार झाल्या. साहसी वाटसरूंनी, प्रवाशांनी जग धुंडाळले आणि यातूनच विचारधारांचा प्रसार विविध देशांमध्ये होत गेला. या कालखंडात जीवन व्यतीत केलेल्या माणसांच्या संशोधनावर प्रत्येक प्रकरण आधारित आहे. ह्युएनत्संग, इब्न फदलान, इब्न सीना, इब्न बतुता, मा हुआन, बाबर, टोमे पिरेस अशा विविध व्यक्तींच्या चित्रणातून हे पुस्तक क्रमाक्रमाने साकारलेले आहे. यातील बहुतांश जणांची चरित्रे ही प्रेरणादायी आणि आशा-आकांक्षांनी भरलेली आहेत, ज्यामुळे आपण वाचताना आश्चर्यचकित होऊन जातो!

--- तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #इतिहास #परीक्षण #पुस्तक_परीक्षण


 

साहित्यिकांची वंशज आणि इंग्रजी

मागच्या आठवड्यामध्ये बहुतांश मराठी वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. मराठीतील एका सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या वंशजाने लहान वयातच स्वतःचा इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित केला. आणि त्याचे भरभरून कौतुक अनेक मान्यवरांकडून करण्यात आले होते. ही बातमी वाचून अतिशय वाईट वाटले. आपल्या मराठी भाषेला ज्यांनी समृद्ध केले त्यांचेच वंशज आता इंग्रजीची कास धरण्यास व्यस्त होत आहेत. मायबोलीची वाट सोडून स्वतःला ग्लोबल सिद्ध करण्यासाठी आंग्लभाषेची गोडवी गात आहेत. ही बाब कोणत्याही मराठीप्रेमीसाठी निश्चितच  राग आणणारी आहे. अनेकांना वाटतं की, आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकत असली तरी आम्ही त्यांच्याशी मराठीत बोलतो म्हणजे आपल्या भाषेचा ऱ्हास होणार नाही. ही बाब कितपत सत्य मानायची? हे वरील उदाहरणावरून लक्षात येईलच. या भाषेमध्ये आपण बोलतो त्याच भाषेतील ज्ञान आपल्याला व्यवस्थित समजते, हृदयापर्यंत जाते. परंतु परकीय भाषेतून शिकल्यानंतर स्वभाषेचा कितपत आपण विचार करतो? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. इंग्रजीतून शिकत असलेल्या ९९% मुलांना मराठी भाषेचे काहीही घेणे देणे नाही. हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे स्वतःचं स्टेटस वाढवण्याच्या नादात, स्वतःला ‘ग्लोबल सिटीझन’ सिद्ध करण्याच्या नादात आणि ‘इंग्रजीशिवाय काही खरं नाही’ या अंधश्रद्धेपोटी आपण मराठी भाषेचा आणखी वेगाने ऱ्हास करू, हे मात्र निश्चित.

--- तुषार भ. कुटे


#मराठी #शिक्षण #marathi 




Sunday, January 12, 2025

राष्ट्रभाषेचं गुणगान

“हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही तर केवळ अधिकृत भाषा आहे.” असे परखड आणि खरे मत नुकताच निवृत्त झालेला भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केले. आणि त्याचबरोबर समाजमाध्यमांवर याविषयी विविध प्रतिक्रिया प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. या प्रतिक्रियांद्वारे भारतीय जनमानस ‘राष्ट्रभाषा’ या संकल्पनेला कोणत्या दृष्टीने पाहते, याचा निश्चितपणे प्रत्यय आला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीनही प्रकारच्या वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी या बातमीला ठळकपणे प्रसिद्धी दिली. त्यांनाही माहित होते की, या बातमीला मोठ्या प्रमाणात लाईक, शेअर्स आणि कमेंट्सचा पाऊस पडणार आहे. आणि झाले देखील तसेच.
मराठी वृत्तपत्रांच्या समाजमाध्यमांवर या बातमीला ठळकपणे प्रसिद्धी दिली होती. विशेष म्हणजे त्यांनी अश्विनच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे, असं देखील म्हटलं होतं. खरंतर भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या गोष्टी वादाच्या कशा होऊ शकतात? हा मोठा प्रश्न आहे. परंतु समाजमाध्यमांवर लोकांची गर्दी खेचण्यासाठी वर्तमानपत्रे कशा पद्धतीने बातम्या देऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण यातून समोर आले. भारताला कोणत्याही प्रकारची राष्ट्रभाषा नाही, हे शंभर टक्के सत्य आहे. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये उत्तर भारतातील हिंदी या भाषेला तिथल्या राजकारण्यांनी राष्ट्रभाषा म्हणून सातत्याने पुढे आणले. शासकीय व्यवहाराची भाषा अर्थात राजभाषा हा दर्जा हिंदीला आधीच मिळालेला होता. त्याचा अर्थ राष्ट्रभाषा असा लावत उत्तर भारतासह पश्चिम आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील हिंदीला त्रिभाषा सूत्राद्वारे सातत्याने अहिंदी राज्यांमध्ये प्रसारित केले गेले. महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर मराठी ही आपली राजभाषा तिची आणि हिंदीची लिपी एकच अर्थात देवनागरी आहे. शिवाय व्याकरणामधील आणि शब्दांमधील साम्यामुळे मराठी लोक हिंदी भाषा लवकर अवगत करतात. याचा महाराष्ट्रात हिंदीचा प्रसार होण्यासाठी चांगला उपयोग झाला. मागच्या ७५ वर्षांचा आढावा घेतला तर आपल्या देशाचे बहुतांश पंतप्रधान हे उत्तर भारतातीलच होते. आत्तापर्यंत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या मोठ्या आणि प्रगत राज्यांना कधीही देशाचे पंतप्रधानपद मिळाले नाही. सार्वत्रिक निवडणुकांमधून निवडून आलेल्या सर्वच राजकारण्यांनी हिंदीचा प्रामुख्याने प्रचार करायला सुरुवात केली. आणि नकळतपणे अधिकृतपणे नसले तरी हिंदी लोकांच्या मनावर राष्ट्रभाषा म्हणून बिंबवण्यात बहुतांशी ते यशस्वी झाले. १०० वर्षांपूर्वी आपल्या देशात हिंदीचा फारसा बोलबाला नव्हता. परंतु मागील काही वर्षांमध्ये उत्तर भारतातील अनेक भाषा गिळंकृत करून हिंदी वाढत गेली. हळूहळू उत्तर भारतीय बोलींचा प्रभाव संपला. आज ४०% पेक्षा अधिक लोकांना हिंदी आमची मातृभाषा आहे, असे वाटते! याच कारणास्तव जी भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते तीच या देशाची राष्ट्रभाषा आहे, असे उत्तर भारतीयांनी उर्वरित भारतीयांच्या मनावर ठसवायला सुरुवात केली. आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरी भागामध्ये जा, बाहेरून आलेले प्रामुख्याने उत्तर भारतीय लोक त्यांची हिंदी भाषा अगदी सहजपणे बोलतात. कारण त्यांनीच उर्वरित भारताला आमची भाषा हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे अप्रत्यक्षपणे ठणकावून सांगितले आहे.
मराठी वर्तमानपत्रांच्या बातम्यांवर मराठी लोकांनी दिलेल्या कमेंट्स वाचताना बहुतांश लोक हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असेच म्हणत होते. ही समाधानाची बाब. परंतु राष्ट्रभाषेच्या अंधश्रद्धेला अजूनही काही मराठी लोक बळी पडत आहेत. हिंदूंची भाषा हिंदी, असंही अनेकांना वाटते. ही चिंतेची गोष्ट आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला केवळ एकच भाषा असावी, हे पूर्णपणे चुकीचे आहे. उत्तर भारतातली एकही भाषा ही अभिजात नाही. याउलट दक्षिण भारतातल्या सर्वच भाषा दीड ते दोन हजार वर्षांपासून प्रचलित आहेत. एका अर्थाने त्या समृद्ध आहेत. परंतु ही समृद्धी नष्ट करण्यासाठी उत्तर भारतातून हिंदी हळूहळू दक्षिण भारतावर अतिक्रमण करताना दिसते आहे.
आज-काल सर्वच लोक आपल्या मुलांना सीबीएसई तसेच आयसीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवतात. या सर्वच शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य आहे. आणि विशेष म्हणजे तिथले शिक्षक आणि विद्यार्थी देखील एकमेकांशी हिंदीमध्ये बोलतात. याच कारणास्तव मुले आपली मातृभाषा विसरत चाललेले आहेत. त्यांना मातृभाषेचे मोलदेखील राहिलेले नाही. अशीच परिस्थिती चालू राहिली तर हळूहळू पुढील काही दशकांमध्ये मराठीसह अन्य भाषा गिळंकृत करण्यास हिंदी सफल होईल. यामुळे भाषा नष्ट होऊन संस्कृती देखील लयाला जाण्याचा धोका संभवतो.
उत्तर भारत हा भारतातील सर्वात अप्रगत भाग आहे. म्हणून नोकरीच्या निमित्ताने अथवा व्यवसायासाठी इथले लोक दक्षिणेच्या दिशेने धाव घेतात. सरासरी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून सर्वात जास्त स्थलांतर होते. परंतु या स्थलांतरातून उत्तर भारतीय लोक आपली भाषा देखील घेऊन येतात. अप्रत्यक्षपणे राष्ट्रभाषेचा स्टॅम्प लावून ती इथल्या लोकांवर लादायचा प्रयत्न करतात. आणि विशेष म्हणजे मराठी लोकांना देखील याचे फारसे काही वाटत नाही. याबाबतीत तमिळ नागरिकांचा आदर्श घेण्यासारखा आहे. तमिळ ही भारतातील सर्वात प्राचीन भाषा. आणि विशेष म्हणजे इथल्या लोकांना देखील त्याचा सार्थ अभिमान आहे. आपण जर आपली भाषा सोडली तर आपली संस्कृती देखील लयाला जाईल, याची पुरेपूर जाणीव तमिळ लोकांना आहे. म्हणूनच त्यांच्या विरोधामुळेच आज हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. परंतु ही गोष्ट मराठी भाषिक लोकांना कधी समजणार? हा मोठा प्रश्न आहे.
एखाद्याने हिंदीला विरोध केला की या लोकांच्या लेखी तो लगेचच देशद्रोही होतो. हिंदी वृत्तवाहिन्यांच्या कमेंटवर तर अश्विनला देखील हिंदी लोकांनी देशद्रोही ठरवले होते! मागच्या महिनाभरातील महाराष्ट्रात घडलेल्या घटना पाहता बाहेरून आलेले लोक सातत्याने मराठी लोकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. राजकारणी लोकांना याचे काहीच वाटत नाही. अर्थात मराठी लोकांचा ‘कणा’ त्यांना ठाऊक आहे. शिवाय बाहेरून आलेल्या लोकांमुळे त्यांची मतपेढी देखील मजबूत होते. म्हणूनच यावर मूग गिळून गप्प बसल्याशिवाय त्यांना पर्याय उरत नाही. अशा राजकारण्यांकडून कोणतीही कृती होणे, हे मराठी माणसाला अपेक्षित नाहीच!
आजकाल उत्तर भारतीय भाषेचे महाराष्ट्रावर होणारे अतिक्रमण धोकादायक वाटत नसले तरी त्याची वळणे मात्र धोक्याच्या दिशेने जाताना दिसत आहेत. परंतु याचे आम्हा मराठ्यांना काहीच नाही, ही जास्त चिंतेची बाब. इतिहासामध्ये डोकावले तर लक्षात येते की यापूर्वीही उत्तरेतून बरीचशी स्थलांतरित महाराष्ट्रामध्ये झाली. परंतु त्या लोकांनी इथलीच भाषा आत्मसात केली. आज अमराठी आडनावे असणाऱ्या अनेक कुटुंबांची मातृभाषा मराठी आहे. परंतु इथून पुढे ही परिस्थिती राहील की नाही यात शंका वाटते. अर्थात राष्ट्रभाषा या गोंडस नावाखाली हिंदी सहजतेने आत्मसात करणाऱ्या मराठी लोकांची यामध्ये पूर्णतः चुकी आहे. याकरता भाषेविषयी प्रबोधन करण्याची अतिआवश्यकता वाटते.
आपल्या मनातील इंग्रजीच्या न्यूनगंडाला हिंदी बोलून मराठी लोक वाट करून देतात. म्हणूनच  बिगरमराठी लोकांनी मराठ्यांना भाषेच्या बाबतीत गृहीत धरलेले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते. मराठी बोलीभाषेचा विचार केला तर मुंबई-नागपूर आधीच हाताबाहेर गेलेली शहरे आहेत. त्यांच्या पंक्तीमध्ये आता हळूहळू महाराष्ट्राची आयटी नागरी पुणे देखील सामील होताना दिसते. ही परिस्थिती कधी बदलेल सांगू शकत नाही. परंतु मराठी लोकांना आपली संस्कृती आणि भाषा वाचवायची असेल तर राष्ट्रभाषा या संकल्पनेला तिलांजली देणे योग्य ठरेल. आपल्या धर्म आणि जातीपेक्षा भाषेला महत्त्व दिले तरच महाराष्ट्र टिकून राहील. नाहीतर पुढच्या काही दशकांमध्ये आपल्या पिढ्या ‘हमरे को, तुमरे को’ करतच वाटचाल करताना दिसतील.

--- तुषार भ. कुटे

#मराठी #राष्ट्रभाषा #भारतीय #भारत 




पसायदान

मराठीतील दुर्लक्षित असलेल्या ‘घुमा’ या चित्रपटामध्ये संत ज्ञानेश्वरांचे पसायदान एका वेगळ्या रूपामध्ये ऐकायला मिळते. पाश्चिमात्य संगीत आणि मराठी बोल यांचा सुरेख संगम या गीतामध्ये झालेला आहे. ऐकताना हे संगीत भावनिक करून सोडते. ज्ञानेश्वरांची ही विश्वप्रार्थना खरोखर वेगळ्या रंगात ऐकायला मिळणे, हा एक सुंदर अनुभव आहे. युट्युबवर याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. एकदा डोळे बंद करून ज्ञानोबांचे हे आगळे पसायदान नक्की ऐका….

https://www.youtube.com/watch?v=-hzWI_WthUw 



Wednesday, January 8, 2025

द रॅबिट हाऊस

चित्रपटाची सुरुवात होते हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका गाडीने. एक नवविवाहित जोडपे आपल्या मधुचंद्रासाठी हिमालयाच्या कुशीतील एका छोट्याशा गावाच्या दिशेने निघालेले आहे. परंतु नवीन जीवनाची सुरुवात करत असताना जो आनंद, उत्साह चेहऱ्यावर दिसायला हवा तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ‘तो’ सतत वैतागलेला, त्रासलेला आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारा विक्षिप्त मनुष्य आहे. याउलट ‘ती’ मात्र शांत आणि सोज्वळ. अखेरीस दोघे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात. हिमालयाच्या कुशीतील एका ‘होमस्टे’मध्ये त्यांच्या राहण्याची सोय केलेली असते. हा होमस्टे म्हणजे वेगवेगळ्या दरवाजांचे घातलेले एक कोडेच आहे. कुठून आत जावं आणि कुठून बाहेर यावं? हे नवीन माणसाला लवकर कळणार नाही. अशा ठिकाणी ते नवविवाहित जोडपे राहू लागते. हळूहळू एकेका प्रसंगामधून त्याचा विक्षिप्त आणि रागीट स्वभाव तिला कळायला लागतो. तिच्याशी बोलण्याऐवजी तो बहुतांश वेळ मोबाईलमधील गेममध्येच घालवत राहतो. ती देखील त्याला घाबरायला लागते. याच्यासोबत पुढील आयुष्य कसे घालवावे? हा ग्रहण प्रश्न तिला पडतो. लवकरच तिची घुसमट व्हायला लागते. परंतु तिच्याकडे त्याचे बिलकुलच लक्ष नसते. डोंगरदर्‍यांच्या त्या परिसरामध्ये ते फिरत असतात परंतु त्यांच्यात नवविवाहित जोडप्यासारखा कुठलाही संवाद होत नाही. अनेकदा ती एकांतामध्ये रडते देखील. तिची ही घुसमट या होमस्टेचा केअर टेकर अर्थात जो मालकाचा मुलगा देखील आहे, ‘मोहित’ पाहत असतो. त्यामुळे त्याची देखील चिडचिड होत राहते. अखेरीस दोन-तीन दिवसांनी तिने जवळच्याच एका खोल दरीमध्ये उडी मारण्याचे समजते. अर्थात यामुळे ‘तो’ हादरून जात नाही. त्या दरीमध्ये जाऊन मृतदेह खरोखर आहे की नाही, हे पाहण्याचे धाडस पोलीसदेखील करत नाहीत. आणि या घटनेला अपघाताचे नाव देऊन केस बंद केली जाते.
ही कथेची मुख्य पार्श्वभूमी. परंतु मध्यंतरानंतर कथा एका वेगळ्या वळणावर वाटचाल करू लागते. तिने खरोखर आत्महत्या केली आहे का? की तिला त्याने दरीमध्ये ढकलून दिले होते? तिचा आत्मा व भूत या ठिकाणी वावरत आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हळूहळू मिळू लागतात.
एक वेगळ्या प्रकारची कथा असलेला हा चित्रपट “द रॅबिट हाऊस”. याचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा हा चित्रपट थ्रिलर किंवा भयपट प्रकारातील असावा, असे वाटले. परंतु प्रत्यक्ष चित्रपट हा निराळ्या प्रकारचा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सुद्धा मी तो पूर्ण पाहिला नव्हता. युट्युब व्हिडिओवरील कमेंट वाचून असे समजले की, दिग्दर्शकाने पूर्ण चित्रपटच ट्रेलरमध्ये दाखवलेला आहे. खरं तर असं काही वाटत नाही. ट्रेलरमध्ये प्रत्यक्ष मध्यंतरापर्यंतचा भाग दाखवलेला आहे. संपूर्ण कथेची उलगड ही शेवटच्या काही मिनिटांमध्ये होते.
कलाकारांच्या बाबतीत सांगायचं तर सर्वांचीच कामे उत्तम झालेली आहेत. सुरुवातीची काही मिनिटे कथा संथ चालली असल्याचे दिसते. परंतु एकदा तिने वेग पकडला की, आपण देखील त्यामध्ये गुंतत राहतो. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हातातील कॅमेराने केले आहे, असे जाणवते. कदाचित ती कथेची गरज असावी. आणि त्याचमुळे विविध दृश्यांमध्ये परिणामकारकता जाणवते. पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शनदेखील उत्तम झालेले आहे. असे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहिले तरच उत्तम.

— तुषार भ. कुटे


 

Saturday, January 4, 2025

इतिहासातील रेकॉर्ड केलेला सर्वात मोठा आवाज

आजवरच्या इतिहासातील रेकॉर्ड केलेला सर्वात मोठा आवाज ३,००० मैल (४,८०० किमी) दूर ऐकला गेला होता.
इतिहासातील हा सर्वात मोठा आवाज हा २७ ऑगस्ट १८८३ रोजी क्रकाटोआचा ज्वालामुखीच्या उद्रेकातून आलेला होता, ज्याची अंदाजे तीव्रता ३१० डेसिबल इतकी होती.
तो आवाज एवढा मोठा होता की, त्यामुळे आजूबाजूच्या अनेकांचे कर्ण बधिर झाले. त्याच्या ध्वनीलहरी अनेक वेळा पृथ्वीभोवती फिरत होत्या आणि हवामान केंद्रांनी पाच दिवस दाब वाढण्याची नोंद केली होती.
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याने २००-मेगाटन बॉम्बच्या समतुल्य शक्तीची निर्मिती केली आणि विशेष म्हणजे मानवाने तयार केलेल्या सर्वात मोठा थर्मोन्यूक्लियर स्फोटापेक्षा अर्थात झार बॉम्बपेक्षा तो चारपट अधिक शक्तिशाली होता.

 


Friday, January 3, 2025

वरूण ते बहिर्जी: शोध प्राचीन हेरगिरीचा

एखादी राज्यव्यवस्था अथवा प्रशासनव्यवस्था यशस्वी होण्यामागे उत्तम हेरव्यवस्था कारणीभूत असते. कोणत्याही महान  साम्राज्याचा गुप्तहेर हा कणाच असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा प्राचीन गुप्तहेरयंत्रणेचा सखोल आणि सविस्तर आढावा घेणारे हे पुस्तक, “वरूण ते बहिर्जी: शोध प्राचीन हेरगिरीचा”.
भारतीय लिखित साहित्यामध्ये हेरगिरीचा पहिला संदर्भ सापडतो तो ऋग्वेदामध्ये वरूण याच्या रूपाने. त्यानंतर विविध राज्यव्यवस्थांनी हेरगिरीचा वापर करून आपला साम्राज्यविस्तार केला. अर्थात याविषयी अतिशय तुरळक पुरावे इतिहासामध्ये उपलब्ध आहेत. हेरगिरीचे पुरावे सापडतील ती उत्तम हेरगिरी कसली? भारतीय राजनीतीशास्त्रामध्ये हेरगिरीचा इतिहास बऱ्यापैकी प्राचीन आहे. ऋग्वेदकाळापासून सुरू झालेला हा प्रवाह व्यास, वाल्मिकी, शुक्राचार्य, भारद्वाज, कौटिल्य अर्थात चाणक्य, कामंदक, तिरुवल्लुवर यांच्यापासून शिवकाळातील बहिर्जी नाईक यांच्यापर्यंत आहे. या प्रदीर्घ हेरगिरीचा संशोधनात्मक आढावा घेणारे पुस्तक लेखक रवी आमले यांनी असंख्य ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिल्याचे दिसते. त्याची सुरुवात अर्थातच ऋग्वेद काळापासून होते. तदनंतर रामायण महाभारतामधील हेररचनेचा आढावा त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे. गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीवर तसेच शासनव्यवस्थेमध्ये गुप्तहेर व्यवस्था कशी असावी, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक कौटिल्यांनी लिहिले. त्यातील गुप्तहेरव्यवस्थेची रचना व मांडणी राज्यव्यवस्थेला कशी पूरक असावी अथवा तिने कार्य कसे करावे, याविषयी माहिती कोणत्याही सम्राटाला असायला हवीच अशी आहे. मराठा साम्राज्याची स्थापना करताना छत्रपती शिवरायांचे विचार आणि कौटिल्याचे विचार हे जवळपास जुळत असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम शासनकर्त्यांचे पहिले आगमन अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने झाले. तेराव्या शतकाच्या अखेरीस खिलजीने अनपेक्षितपणे देवगिरीवर हल्ला केला. खरंतर हे देवगिरीच्या गुप्तहेर यंत्रणेचे सर्वात मोठे अपयश होते, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. याच क्षणापासून कित्येक शतके महाराष्ट्रावर इस्लामी राजसत्ता राज्य करत होत्या.
पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये हेरव्यवस्थेच्या वरील ऊहापोहासोबतच मुस्लिम हेरसंस्थांविषयी देखील लेखकाने विस्तृतपणे लिहिलेले आहे. शिवाय भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे मुघल व त्यांची हेरव्यवस्था कशी होती, याचे देखील वर्णन आपल्याला वाचायला मिळते. अगदी बाबर ते औरंगजेबापर्यंत गुप्तहेरांनी कित्येक कारस्थाने तडीस नेली होती, हे देखील समजते. पुस्तकातील दुसरा भाग पूर्णतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर व त्यांच्या हेरव्यवस्थेवर प्रकाश टाकणार आहे. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख. परंतु ऐतिहासिक पुराव्यांमध्ये त्यांच्याविषयी अतिशय तुरळक माहिती दिसून येते. एका अंगाने हे गुप्तहेर यंत्रणेचे सर्वोत्तम यश आहे, असेच मानायला हवे. परंतु याच कारणास्तव बहिर्जी नाईक व त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेविषयी ठोस माहिती कोणत्याही इतिहासकाराला आजवर सांगता आलेली नाही. तरी देखील रवी आमले यांनी उपलब्ध पुराव्यांचा आधार घेऊन तसेच अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ चाळून शिवाजी महाराजांच्या विविध योजनांमध्ये गुप्तहेर यंत्रणेचा किती मोठा वाटा होता किंबहुना त्यांच्या अनेक योजना केवळ सक्षम गुप्तहेर यंत्रणेमुळेच यशस्वीपणे पार पडल्या, हे सिद्ध केले आहे. शिवरायांना खऱ्या अर्थाने गनिमी काव्याच्या चाली खेळताना गुप्तहेर यंत्रणा किती महत्त्वाची आहे, हे समजले होते. कदाचित आजवर अन्य कोणत्याही राजाने शिवरायांनी इतका हेरसंस्थेचा अचूक वापर केला नसावा. अतिशय कमी कालावधीमध्ये आणि मोजक्याच सहकाऱ्यांच्या साह्याने अचूक लक्ष्यवेध करताना शिवरायांना त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेचे कशा पद्धतीने सहाय्य मिळाले असावे, याचे विस्तृत विवेचन या पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. अफजलखानाच्या फौजेशी जावळीच्या खोऱ्यात झालेली लढाई असो किंवा औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याची पुण्यात बोटे छाटून केलेली फजिती असो. यामध्ये गुप्तहेर यंत्रणेचा बहुमोल वाटा होता. शिवाय शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा टाकलेल्या छाप्याची यशस्विता देखील गुप्तहेर यंत्रणेवरच आधारलेली होती. अशा अनेक योजना सफलपणे पार पाडण्यासाठी शिवाजी महाराजांनी अतिशय छोट्या छोट्या बाबींचा सखोल अभ्यास केल्याचे दिसते. शिवाजी महाराज हे केवळ राज्यकर्ते नव्हते तर ते एक कुशल सेनानी आणि मराठ्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचे जनक देखील होते, हीच भावना आपल्या मनात तयार होते. अर्थात यामागे बहिर्जी नाईकांनी मराठ्यांच्या मुलखामध्ये तसेच शत्रूच्या गोटामध्ये देखील तयार केलेली सक्षम हेरयंत्रणा कारणीभूत होती, ही गोष्ट सिद्ध होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोमंतक भूमी गनिमी काव्याने हस्तगत करण्याची शिवरायांची योजना असफल ठरली. ही बाब वगळता शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचे कोणतेही अपयश इतिहासामध्ये प्रकर्षाने जाणवत नाही.
बहिर्जी नाईक यांच्यावर संशोधनात्मक दृष्ट्या लिहिलेले हे कदाचित मराठीतील पहिलेच पुस्तक असावे. अतिशय तुरळक माहिती असलेल्या शिवरायांच्या या मावळ्याविषयी अभ्यास करून संशोधनात्मक ग्रंथ सादर करणे अतिशय अवघड कार्य होते. त्यामुळेच लेखकाच्या एकंदरीत मेहनतीला दंडवत करावा, असेच हे पुस्तक आहे. बहिर्जी नाईक यांच्या विषयी आज-काल समाजमाध्यमांद्वारे जनमानसात पसरत असलेल्या स्वयंघोषित व्याख्यातांद्वारे दिली झालेली चुकीची माहिती नक्की कोणती व त्याचा स्त्रोत काय, याचा देखील ऊहापोह या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणांमध्ये आपल्याला वाचता येतो. शिवरायांचे हेर हे त्यांचे तृतीय नेत्र म्हणूनच काम करत होते, याची प्रचिती येते. इतिहासाच्या पानांमध्ये कोणताही पुरावा न सोडणारी शिवाजी महाराजांची हेरयंत्रणा किती सक्षमपणे कार्य करत होती, याची देखील माहिती होते.
हे पुस्तक म्हणजे कादंबरी नाही. परंतु  गुप्तहेरांच्या इतिहासाला वैज्ञानिक दृष्टी देणारा एक शास्त्रीय ग्रंथ आहे, असे मानायला काही हरकत नाही.

— तुषार भ. कुटे.



Thursday, January 2, 2025

२०२५ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तंत्रज्ञानाची पुढची पातळी गाठून मानवाला प्रगतीच्या पावलावर वेगाने धावायला लावणारे तंत्रज्ञान आणि तितकेच भविष्याच्या दृष्टीने मनात धडकी बनवणारे तंत्रज्ञान. मागील वर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेने विविध उत्पादने आपल्याला दाखवली. एआयच्या प्रगतीचा हाच वेग २०२५ मध्येही असाच कायम राहील, असा तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांचाच अंदाज आहे. यावर्षी मात्र त्याची व्याप्ती अधिक व्यापक होईल अर्थात जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान उभे ठाकलेले दिसेल, असा बहुतांश तंत्रज्ञांचा अंदाज आहे. एकंदरीत सांगायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिवाय यापुढे पर्याय नाही, असंच म्हणता येईल. मागील काही वर्षांमध्ये एआयमुळे नोकऱ्यांची वाताहत होताना दिसते आहे. परंतु त्यामुळे नवीन नोकऱ्या देखील तयार झालेल्या आहेत. अर्थात हे तंत्रज्ञान आत्मसात करणे, ही जवळपास प्रत्येक क्षेत्रातील नोकरदारांची गरज असणार आहे. विशेषता जनरेटिव्ह एआय अर्थात सर्जनशील कृत्रिम बुद्धिमत्ता यावर विशेषत्वाने लक्ष देण्याची आवश्यकता वाटते.

--- तुषार भ. कुटे 



Wednesday, January 1, 2025

२०२४ मधील पाहिलेले चित्रपट

यावर्षी सलग दुसऱ्यांदा चित्रपट पाहण्याची शंभरी पार केली. यावर्षी पाहिलेल्या एकूण चित्रपटांपैकी १०० चित्रपट मराठी, एक द्विपर्वीय मराठी भाषांतरित वेबसिरीज, सहा हिंदी चित्रपट, दोन दक्षिण भारतीय चित्रपट आणि तीन पर्व असणारी एक हिंदी वेबसिरीज होती.

मराठी चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं तर आपला चित्रपट बदलतो आहे. सामाजिक आशय हा मराठी चित्रपटांचा मुख्य गाभा. तो मराठी चित्रपटांनी सोडलेला नाही. परंतु त्यासोबतच अधिकाधिक मनोरंजक बनवण्याकडे देखील बहुतांश दिग्दर्शकांचा भर राहिलेला दिसतो. नेहमीप्रमाणेच रहस्यपट, भयपट, प्रेमपट या सर्वच प्रकारांमध्ये मराठी चित्रपट उत्तमरीत्या बनवले जात आहेत. अपवाद आहे फक्त विनोदी चित्रपटांचा. एकेकाळी म्हणजेच मागील शतकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवला. परंतु आज मराठी विनोदी चित्रपट जवळपास रसातळालाच गेल्याचे दिसते. ही गोष्ट वगळली तर आपल्या चित्रपटांची गुणवत्ता कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या गुणवत्तेइतकीच आहे. फक्त मराठी प्रेक्षक नेहमीप्रमाणे आपल्या भाषेच्या बाबतीत उदासीन झाल्याचा दिसतो. निदान २०२५ मध्ये ही उदासीनता कमी होईल याची खात्री बाळगूयात.


  1. नाच गं घुमा *

  2. ओले आले *

  3. अलीबाबा आणि चाळिशीतले चोर

  4. फुलवंती *

  5. खेळ मांडला *

  6. हाक *

  7. घोडा *

  8. होऊ दे जरासा उशीर

  9. दमलेल्या बाबाची कहाणी

  10. झंगाडगुत्ता

  11. छापा काटा

  12. एकदा येऊन तर बघा

  13. आलंय माझ्या राशीला

  14. हाफ तिकीट *

  15. रणांगण *

  16. लाल इश्क*

  17. तू हि रे *

  18. लंडन मिसळ

  19. रमा माधव *

  20. सापळा *

  21. खोपा *

  22. तू तिथे असावे

  23. आम्ही दोघी *

  24. आईच्या गावात मराठीत बोल

  25. मिरांडा हाऊस

  26. गर्ल्स

  27. असा मी तसा मी

  28. व्ही.आय.पी गाढव *

  29. बापजन्म *

  30. मंडळी तुमच्यासाठी काय पण

  31. गोंद्या मारतंय तंगड

  32. बळी *

  33. भुताचा हनिमून

  34. रमाबाई आंबेडकर *

  35. प्रेमाची गोष्ट

  36. व्हिक्टोरिया

  37. गुरु पौर्णिमा *

  38. लव्ह यु जिंदगी *

  39. जयंती *

  40. कशाला उद्याची बात *

  41. सत्यशोधक *

  42. एका ब्रेकअप ची गोष्ट

  43. बलोच

  44. गुलाम बेगम बादशाह

  45. मायलेक *

  46. तिरसाट

  47. प्रीतम *

  48. का रं देवा

  49. उंडगा

  50. यारी दोस्ती

  51. कौल मनाचा

  52. आयटमगिरी

  53. भय *

  54. बापल्योक *

  55. जुनं फर्निचर*

  56. नाळ २*

  57. एकदा काय झालं *

  58. होय महाराजा

  59. झोलीवूड

  60. मंकी बात

  61. बोल बेबी बोल

  62. हिप हिप हुर्रे

  63. श्यामची आई *

  64. स्वरगंधर्व सुधीर फडके *

  65. ८ २ ७५

  66. मस्का *

  67. लेक असावी तर अशी

  68. विशू

  69. घरत गणपती *

  70. बाई गं

  71. जरब

  72. सुराज्य *

  73. सरी *

  74. अष्टवक्र

  75. जाणिवा

  76. ऑनलाईन बिनलाईन *

  77. सतरंगी रे *

  78. घुमा *

  79. इष्क वाला लव्ह

  80. बॉईझ ४

  81. नवरा माझा नवसाचा २

  82. लाईक आणि सबस्क्राईब *

  83. छत्रपती शासन

  84. मराठी टायगर्स

  85. ड्राय डे

  86. रॉकी

  87. मन्या : द वंडर बॉय *

  88. एक तारा *

  89. जजमेंट *

  90. रंगकर्मी *

  91. अजिंठा *

  92. झेंटलमन

  93. काकण *

  94. भयभीत *

  95. गेट टुगेदर

  96. गर्लफ्रेंड *

  97. टकाटक

  98. प्रेमसूत्र

  99. पाणी*

  100. अंगारकी


मराठी भाषांतरित:

  1. असुर १ आणि २ (वेब सिरीज)


हिंदी चित्रपट:

  1. तेरी बातो में ऐसा उलझा जिया

  2. १२th फेल

  3. मुंज्या

  4. आर्टिकल १५

  5. क्र्यु

  6. डॉक्टरजी 


दक्षिण भारतीय चित्रपट:

  1. लकी भास्कर

  2. महाराजा


टीप: ज्या चित्रपटांच्या पुढे चांदणी केलेली आहे ते चित्रपट  कोणत्याही चित्रपट प्रेमीने नक्की पहावे असेच आहेत. 


यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी पहिले पाच निवडायचे झाले तर माझ्या दृष्टीने ते असे असतील:

१.  फुलवंती २. लाईक आणि सबस्क्राईब ३. नाच गं घुमा. ४. घरत गणपती ५. ओले आले. 

  

  • तुषार भ. कुटे.