जागतिक महिला दिन विशेष
मराठेशाहीच्या चारशे वर्षांच्या इतिहासामध्ये पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही पराक्रम गाजवले आहेत. अनेक प्रसंगी मराठी भूमितील महिला दीपस्तंभ म्हणून उभ्या ठाकलेल्या आहेत. कधी मसलतीच्या मैदानावर तर कधी युद्धाच्या रणांगणावर त्यांनी आपल्या पाऊलखुणा उमटविलेल्या आहेत. अशा मराठी भूमितील पराक्रमी स्त्रियांची ओळख करून देणारे हे पुस्तक “मराठी दौलतीचे नारी शिल्प”.
आपल्या रोमांचकारी आणि स्फूर्तीदायी इतिहासामध्ये अनेक स्त्रियांनी आपले नाव अजरामर केले. त्याची सुरुवात होते स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई यांच्यापासून. शिवाजी महाराजांची जडणघडण करण्यामध्ये जिजाऊ साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता. त्यांच्याच शिकवणीतून शिवरायांनी स्वराज्य घडविले, रयतेचे राज्य आणले आणि मराठा साम्राज्याची उभारणी केली. चहूबाजूंनी उभ्या ठाकलेल्या चार पादशाह्यांपासून स्वराज्य उभे झाले. याचे श्रेय राजमाता जिजाऊंना जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई आणि मोठी सून अथवा छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांनी देखील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अढळस्थान प्राप्त केलेले आहे. याशिवाय छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच पेशवाईच्या कालखंडामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणाऱ्या दर्याबाई, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाची इत्यंभूत माहिती या पुस्तकाद्वारे आपल्याला होते.
एकंदरीत पुस्तक वाचताना तीन स्त्रियांचा जीवन प्रवास हा अतिशय प्रेरणादायी वाटतो. त्यातील पहिल्या राजमाता जिजाबाई, दुसऱ्या महाराणी येसूबाई आणि तिसऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. यांच्याशिवाय मराठी मातीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही, अशी भावना मनात तयार होते. महाराणी येसूबाई यांनी हिंदवी स्वराज्य विस्तार होत असतानाच्या कालखंडातील बहुतांश मोठ्या घटना अनुभवलेल्या आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार आहेत. शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना भक्कमपणे साथ देणाऱ्या, शंभूराजांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा कारभार हाकणाऱ्या, आपल्याच माणसांनी शंभूराजांना औरंगजेबाकडे पकडून दिल्यानंतर परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या आणि योग्य वेळी हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत होण्यापासून वाचविणाऱ्या, स्वराज्यासाठी जवळपास ३० वर्षे शत्रूच्या तावडीत घालविणाऱ्या, शाहू महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत तेवत ठेवणाऱ्या खंबीर पराक्रमी येसूबाई या पुस्तकातून आपल्याला भेटतात. कधी कधी असा देखील वाटतं की महाराणी येसूबाईंनी आपल्या आत्मचरित्र लिहिलं असतं तर इतिहासातील किती घटनांची उकल आपल्याला होऊ शकली असती!
मराठेशाहीच्या इतिहासातील आणखी एक पराक्रमी स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर. एका स्त्रीने राज्यकारभार हाती घेतल्यानंतर काय होऊ शकते? याचे उत्तम उदाहरण अहिल्यादेवींनी घालून दिले. मल्हारराव होळकरांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या अहिल्याबाई यांनी सातत्याने विविध दु:खे पचवली. परंतु त्यामध्ये रयतेची आबाळ होऊ दिली नाही. एक आदर्श प्रशासक म्हणून त्या इतिहासामध्ये अजरावर झाल्या. आजही त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आपल्याला भारतभर पाहता येतात. यातूनच त्यांच्या कार्याची प्रचिती देखील येते.
मराठी मातीमध्ये घडलेल्या या आदर्श स्त्रियांची छोटीखानी संकलित चरित्रे आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देतातच तसेच भविष्यासाठी प्रेरणादायी देखील ठरतात.
— तुषार भ. कुटे
#मराठी #मराठा #महाराष्ट्र #इतिहास #पुस्तक #परीक्षण #महिला_दिवस
Saturday, March 8, 2025
मराठी दौलतीचे नारी शिल्प
मोहम्मद शमीचा रोजा
Thursday, March 6, 2025
सेतूमाधवराव पगडी यांची पुस्तके
इतिहास हा इतिहासकारांच्या नजरेतून वाचला की तो अधिक चांगला समजतो. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शास्त्रशुद्ध दृष्टी आपल्या दृष्टीत देखील बदल घडवून आणते.
त्यातही तटस्थ दृष्टी असणारे इतिहासकार विरळाच. महान इतिहासकार सेतूमाधवराव पगडी हे अशाच इतिहासकारांपैकी एक. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी लिहिलेली पुस्तके इतिहासाची रम्य सफर घडवून आणतात. आणि आपल्याला इतिहास शिकवतात देखील. अशीच काही पुस्तके मागच्या काही दिवसांमध्ये वाचनात आली. ती तुम्हाला देखील निश्चित आवडतील. शिवाय आपल्या अज्ञात पण गौरवशाली इतिहासाची ओळख देखील करून देतील.
छत्रपती शिवाजी
https://amzn.eu/d/aVbTAHs
छत्रपती नि त्यांची प्रभावळ
https://amzn.eu/d/2nPiuHy
महाराष्ट्र आणि मराठे
https://amzn.eu/d/iFsOcZr
इतिहासाचा मागोवा
https://amzn.eu/d/gQX5HaW
पानिपतचा संग्राम
https://amzn.eu/d/49epGfA
कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी
https://amzn.eu/d/bsdlcHJ
बहु असोत सुंदर
https://amzn.eu/d/2itHNys
वरंगलचे काकतीय राजे
https://amzn.eu/d/fdeN4OH
--- तुषार भ. कुटे
#मराठी #इतिहास #मराठा #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #पुस्तक #पुस्तके #महाराष्ट्र
मिलरचे शतक
कालच्या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयापेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या शेवटच्या चेंडूवर आलेलं शतक अधिक लक्षवेधी ठरलं. शेवटच्या तीन षटकांमध्ये ९३ धावांची गरज असताना डेविड मिलर ५२ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्यांनी जी संस्मरणीय फटकेबाजी केली त्याला तोड नाही. १८ चेंडूंमध्ये ४८ धावा काढून अखेरच्या चेंडूवर त्याने शतक पूर्ण केलं. फलंदाजीमध्ये मिलरच्याच क्रमांकावर एकेकाळी येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लूजनरची आठवण झाली. आपली हातोडारुपी बॅट घेऊन क्लूजनर थाटाने मैदानात उतरायचा. आणि बिनधास्तपणे मैदानाच्या चहुबाजूंना फटके मारायचा. दक्षिण आफ्रिकेला आपल्या फलंदाजीच्या बळावर त्याने आजवर बरेच सामने जिंकून दिलेले आहेत. मिलर हा देखील क्लूजनरच्याच वंशावळीतला. परंतु तो मैदानावर आला तोपर्यंत आफ्रिकेच्या हातातून सामना निसटून गेला होता. शेवटच्या तीन षटकांतील त्याची फटकेबाजी कोणत्याही क्रिकेट प्रेमीला निश्चितच आवडली असणार. शेवटचा चेंडू बाकी असताना मिलर ९८ धावांवर खेळत होता. शेवटचा फटका मारला आणि त्याने दोन धावांसाठी पळायला सुरुवात केली. तेव्हाच न्युझीलँडचे एकंदरीत क्षेत्ररक्षण पाहता त्यांनी चक्क मिलरचे शतक 'होऊ' दिले, हे विशेष! याला देखील 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' म्हणायला काय हरकत आहे?
Sunday, March 2, 2025
केशव पण्डितकृत राजाराम चरित्रम् अर्थात जिंजीचा प्रवास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरचा काळ स्वराज्यासाठी अतिशय अवघड असा काळ होता. परंतु संभाजी महाराजांनी तत्कालीन परिस्थिती व्यवस्थित हाताळल्यामुळे स्वराज्याची वाताहत झाली नाही. पुन्हा अशीच परिस्थिती इसवी सन १६८९ मध्ये तयार झाली होती. छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले. औरंगजेबाच्या छावणीमध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांची हत्या घडवण्यात आली. उत्तरेकडून दक्षिणेत उतरल्यानंतर औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य बुडवायचेच, असा निर्धार केला होता. संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने रायगडाला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य बुडणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने तत्कालीन परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. त्यांनी संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले व त्यांना रायगडावरून सुरक्षितरीत्या बाहेर जाण्यास सांगितले. येसूबाई या स्वतः रायगड लढवत होत्या. स्वराज्य अबाधित राहावे याच एकमेव हेतूने छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. दक्षिणेमध्ये अर्थात तमिळनाडूमध्ये असणारा जिंजीचा किल्ला हा सर्वात सुरक्षित किल्ला मराठी सरदारांना वाटत होता. त्याच किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी जावे, असे सर्वानुमते ठरले. रायगडावरून निघाल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या काही निवडक विश्वासू सरदारांसह प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेमध्ये उतरले व त्यांनी प्रदीर्घ प्रवासानंतर जिंजीचा किल्ला गाठला. मुघलांनी त्यांचा पाठलाग सुरु ठेवला होता. पण, ते त्यांच्या तावडीत कधीच सापडले नाहीत. अशा रीतीने पुन्हा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचा छत्रपती शत्रूच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडला होता. त्यानंतरच्या काळामध्ये मराठी स्वराज्य हळूहळू विस्तारत गेले. महाराष्ट्राच्या मातीमध्येच औरंगजेबाचा मृत्यू झाला. परंतु मराठी स्वराज्याची पताका काही खाली आली नाही.
त्यांच्या या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करणारा 'राजाराम चरित्रम्' हा ग्रंथ केशव पंडित यांनी संस्कृतमध्ये लिहिला होता. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारामध्ये केशव कवी अर्थात केशव पंडित यांना राजाश्रय होता. शिवकालातील समकालीन असणाऱ्या दुर्मिळ ग्रंथांपैकी केशव पंडित कृत 'राजाराम चरित्रम्' हा अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथ आहे. म्हणूनच तत्कालीन इतिहास बारकाईने समजून घेण्यासाठी त्याचे अध्ययन व अभ्यास महत्त्वाचा ठरतो. याच संस्कृत ग्रंथाचे इतिहासाचे भिष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी मराठी व इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. म्हणूनच हा ग्रंथ आजच्या इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी एक बहुमूल्य ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये काव्याचे पाच सर्ग असून सुमारे २७५ श्लोक आहेत. शिवकालीन इतिहास तसेच महाराष्ट्राचा एकंदर इतिहास अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक ठरेल, असाच आहे.
- तुषार भ. कुटे
अमेझॉन लिंक: https://amzn.in/d/cDkMpYb